नंदुरबार – नंदुरबारसारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यात वर्षभरात 12 ठिकाणी पोलिसांनी गांजाची शेती नष्ट केली. पोलिसांनी 11 महिन्यांत 10 हजार किलो गांजा जप्त करत दोन कोटीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 28 जणांना अटक केली आहे. मात्र, नंदुरबारच्या दुर्गम भागात गांजाची शेती होत असल्याने अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
गेल्या वर्षभरापासून नंदुरबार जिल्ह्यात पोलिसांनी अमली पदार्थांच्या विरोधात जोरदार मोहीम सुरु केली आहे. पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश सर्व प्रकरणात दिले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस ठाण्यांनी या कारवाया केल्या आहेत. यात 11 महिन्यात 12 ठिकाणी होणारी गांजा शेती नष्ट केली. त्यातून जप्त करण्यात आलेल्या 10 हजार 398 किलो गांजा जप्त केला असून 28 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी विशेष मोहीम सुरु केली आहे. अशा प्रकारच्या आणखी कारवाया करण्यात येतील, अशी माहिती पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी दिली आहे.
अमली पदार्थांची लागवड अतिदुर्गम भागात केली जात आहे. त्या ठिकाणी संपर्काची साधने नसल्याने आता या भागात ड्रोनच्या मदतीने तपासणी केली जाणार आहे. पूर्णपणे आधुनिक तंत्राच्या मदतीने अमली पदार्थांची शेती नष्ट केली जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली आहे.