वाराणसी – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतील अखेरच्या दोन टप्प्यांना राजकीयदृष्ट्या वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्या टप्प्यांमध्ये भाजप आणि समाजवादी पक्ष (सप) या प्रमुख प्रतिस्पर्ध्यांच्या मित्रपक्षांचा कस लागणार आहे.
उत्तर प्रदेशातील एकूण सातपैकी सहाव्या टप्प्यात 57 जागांसाठी गुरुवारी मतदान झाले. आता 7 मार्चला 54 जागांसाठी मतदान होईल. त्या टप्प्यांत भाजप आणि सपच्या मित्रपक्षांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
अपना दल आणि निषाद पार्टी हे भाजपचे मित्रपक्ष अनुक्रमे 17 आणि 16 जागा लढवत आहेत. त्यातील बहुतांश मतदारसंघ अखेरच्या दोन टप्प्यांत मतदानाला सामोरे जात आहेत. सुहेलदेव भारतीय समाज पक्षाने (सुभासप) भाजपबरोबरची मैत्री तोडून यावेळी सपशी हातमिळवणी केली.