राष्ट्रवादीतून गेलेल्या आमदारांनी घेतली शरद पवारांची भेट
मुंबई (प्रतिनिधी) – निवडणुकीपूर्वी मेगाभरती करणाऱ्या भाजपला आता मेगा उतरतीकळा लागणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडून गेलेले आणि भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या आमदारांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली, असा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते आमदार नवाब मलिक यांनी शनिवारी येथे केला. या आमदारांना पक्षात प्रवेश देण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
निवडणुकीआधी भाजपने राष्ट्रवादीच्या आमदारांना धमकावले होते तसेच आमिष दाखवले होते. आता हे आमदार पुन्हा पक्षात येण्याच्या तयारीत आहेत, असे मलिक म्हणाले. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचे संयुक्त सरकार आल्याने भाजपचे डझनभर आमदार लवकरच पक्षातून बाहेर पडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या चर्चेला मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत दुजोरा दिला.
नेत्यांची प्रतिमा मलीन करण्यासाठीच सिंचन घोटाळ्याचा आरोप
सिंचन घोटाळ्यात पक्षाचे नेते अजित पवार यांच्यावर आरोप करून भाजपने त्यांना नाहक बदनाम केल्याची टीका मलिक यांनी केली. विदर्भ पाटबंधारे विकास मंडळाच्या अमरावती विभागातील नऊ सिंचन प्रकल्पांची खुली चौकशी बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून अजित पवार यांच्यावर कोणत्याही स्वरूपाची फौजदारी जबाबदारी निश्चित होत नसल्याचे सांगितले. या प्रतिज्ञापत्रामुळे अजित पवार यांच्यावरील आरोप निराधार ठरले आहेत.राष्ट्रवादीची आणि नेत्यांची प्रतिमा मलीन करण्यासाठीच भाजपने आरोप केले होते, असे मलिक म्हणाले.