सरसकट वीज बिले देऊन ग्राहकांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू
पिंपरी – केंद्राकडून लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर मार्च पासून ते 31 जुलै दरम्यान, जवळपास सर्वच उद्योगधंदे, शाळा, कॉलेज, व्यवसाय बंद होते. थोडा फार विजेचा वापर झाला असेल मात्र रिडिंग न घेताच सरसकट वीज बिलाची आकारणी केली जात असतानाच आता भरलेले बिल वजा न करता पुन्हा तीच ती बिले पाठवून ग्राहकांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप भोसरी विधानसभेच्या शिवसेना महिला आघाडी समन्वयक ऍड. कोमल साळुंखे (ढोबळे ) यांनी केला आहे.
कोमल साळुंखे यांनी महावितरणच्या भोसरी कार्यालयात याबाबत निवेदन दिले आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्वच नागरिकांचे घरगुती, व्यावसायिक वीज बिल नेहमीपेक्षा जास्त आले असल्याने महावितरण विभागाबद्दल संताप व्यक्त होत आहे. अशातच आता सदोष बिले येण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. ही एक नवीनच डोकेदुखी सुरू झाली असल्याचे ऍड. साळुंखे यांनी निवेदनात म्हटले आहे.
गेल्या चार महिन्यांपासून लोक घरातच बसून आहेत. लोकांना काहीच काम नसल्याने पैसाही नाही. अशा परिस्थितीत त्यांनी हे वाढीव बिल अडचणीतूनही भरले असताना आता भरलेले बिल वजा न करताच पुन्हा तीच ती बिले पाठवून ग्राहकांना वेठीस धरले जात आहे. त्यामुळे अशा प्रकारे आकारलेले बिल माफ करून ग्राहकांना योग्य तो न्याय द्यावा, अशी मागणीही ऍड. साळुंखे यांनी केली आहे.