उस्मानाबादेत 12.5 अंश सेल्सिअस किमान तापमान
पुणे – शहरासह राज्यात बोचऱ्या थंडीची चाहूल लागली असून, अजूनही कडाका वाढलेला नाही. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही शहरांमधील किमान तापमानात किंचीत वाढ झाली आहे. त्यामुळे गेल्या 24 तासांत उस्मानाबाद येथे सर्वात कमी 12.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. तर रत्नागिरी येथे सर्वाधिक 34.9 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
गेल्या 24 तासांत मध्य महाराष्ट्रातील काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण-गोवा, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत तर, मध्य महाराष्ट्राच्या उर्वरीत भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. ऋतुमानाप्रमाणे ऑक्टोबर हिट संपल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात बोचऱ्या थंडीला सुरवात होते. मात्र, यंदा ऑक्टोबर “हिट’ नाही तर पावसाळा अनुभवावा लागला. तर नोव्हेंबर महिना संपत आला तरीही थंडीचा कडाका वाढलेला नाही. दिवसभर ऊन आणि रात्री थंडी अशी परिस्थिती राज्यात अनुभवायला मिळत आहे.
दरम्यान, पुणे शहरात बुधवारी दिवसभरात किमान तापमानात किंचीत वाढ झाली आहे. दुपारी ढगाळ वातावरण होते. तर रात्री बोचरी थंडी होती. शहरात पुढील दोन दिवस कमाल व किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील थंडी पुन्हा कमी होणार आहे.
प्रमुख शहरातील किमान तापमान
उस्मानाबाद 12.5, महाबळेश्वर 14.4, नागपूर 14.6, पुणे 14.9, वर्धा 15.4, सातारा आणि गोंदिया 15.5, औरंगाबाद आणि अमरावती 15.6, ब्रह्मपुरी 15.9, अकोला आणि वर्धा 16, परभणी आणि वाशिम 16.2, नांदेड, जळगाव 17.