Radhakrishna Vikhe : सांगोला येथे आज बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमात बोलताना राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, महाराष्ट्र ज्यांना जाणता राजा म्हणत होता, त्यांनी कायम दुष्काळी भागाला पाणी देणे खर्चात बसत नसल्याची उत्तरे दिली होती. आता देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने दुष्काळ मुक्तीसाठी काम करत आहेत, ते पाहता नुसत्या तुताऱ्या फुकून काही होत नसतं असा टोला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला.
तसेच सध्या राज्यात जवळपास दोन लाख कोटीचे सिंचन प्रकल्प व नदीजोड प्रकल्पाची कामे सुरू आहेत. पुढील पाच वर्षात महाराष्ट्र दुष्काळमुक्त करायचे स्वप्न आम्ही पहात असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. या कार्यक्रमाला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह मंत्री जयकुमार गोरे, माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजी बापू पाटील, दीपक साळुंखे उपस्थित होते.
संजय राऊत मनोरुग्ण : विखे पाटील
यावेळी संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले संजय राऊत हे मनोरुग्ण आहेत. त्यांची जागा मेंटल हॉस्पिटलमध्ये आहे. आता त्यांच्या नेत्यांनीच ते पहावे अन्यथा जनता त्यांना जागा दाखवेल अशी टीका विखे पाटलांनी राऊतांवर केली. संजय राऊत यांनी संतोष देशमुख हत्येमागे भाजप आहे का? असा सवाल उपस्थित केला होता. यावर बोलताना विखे पाटील यांनी टीका केली. विरोधकांना महायुतीने मिळविलेला विराट विजय पचनी पडला नाही. त्यामुळं कोण काय बोलते याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचा टोला विखे पाटील यांनी लगावला.