टाळेबंदीत काही फायदेही दिसून आले, यातील पर्यावरणाच्या दृष्टीने झालेल्या फायद्यांचा उहापोह बराच झाला; पण त्याबरोबरीनेच देशात होणाऱ्या एकूण मृत्यूंमध्ये मोठा वाटा असणाऱ्या रस्तेअपघातांची चर्चा फारशी झाली नाही. दिवसाकाठी साधारणतः 400 ते 500 जणांचा मृत्यू रस्तेअपघातात होत होता. म्हणजेच आज करोनाने होणाऱ्या मृत्यूच्या आकड्यांपेक्षा कैकपटींनी अधिक ही मृत्यूसंख्या होती.
रस्ते अपघातात बळी जाणाऱ्या संख्येत भारताचा जगात तिसरा नंबर लागतो. देशभरात रोज होणाऱ्या रस्ते अपघातांच्या आकडेवारीत मुंबई पाचव्या क्रमांकावर होती, तर दिल्ली पहिल्या क्रमांकावर.
एका पाहणीनुसार, देशात दर तासाला 19 व्यक्तींचा अपघातामुळे रस्त्यावर मृत्यू होतो आणि दर 3 मिनिटाला एक जीव गमावला जातो. या अपघातांचे प्रमुख कारण म्हणजे बेदरकारपणा आणि निष्काळजीपणा. लॉकडाऊनच्या काळात रस्ते वाहतूक व एकंदरीतच जनजीवन ठप्प असल्यामुळे हे अपघातांचे प्रमाण नीचांकी पातळीवर आले; पण थांबले नाही! एकट्या एप्रिल महिन्यामध्ये राज्यभरात 576 अपघातांच्या घटना घडल्या असून त्यामध्ये 300 हून अधिक जणांचा मृत्यू झाला.
मुंबई, ठाणे, नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे ही शहरे यामध्ये आघाडीवर आहेत. देशात होणाऱ्या रस्तेअपघातांवर काम करणाऱ्या सेव्ह लाइफ फाउंडेशनच्या ताज्या अहवालानुसार, देशभरात महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, आसाम, केरळ, कर्नाटक, पंजाब, तमिळनाडू आणि राजस्थान या राज्यांनी टाळेबंदीच्या काळातील अपघातात “बाजी’ मारली. या अपघातांचे कारण ओव्हरस्पीडींग म्हणजेच अतिवेगवानपणा हे असल्याचे हा अहवाल सांगतो.
लॉकडाऊनच्या काळात आपल्या घरी जाणाऱ्यांचे प्रमाणही मोठे होते. पण यातील अनेकांवर गाव गाठण्यापूर्वीच काळाने घाला घातला. गावची वेस, गावचे घर पाहणेही त्यांच्या नशिबी आले नाही. गेल्या आठ दिवसांत 75 हून अधिक मजुरांचा अपघातात मृत्यू झाला आहे, ही बाब अत्यंत खेदजनक आहे.
आधीच आपल्याकडे वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यापेक्षा ते मोडण्यासाठी अहमहमिका लागलेली असते; तशातच आता रस्त्यांवर वाहनांची गर्दीही नाही आणि पोलीसही नाहीत म्हटल्यावर नियम मोडून उलट दिशेने प्रवास करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. मोबाइलवर बोलत वाहन चालवणे यात वाटणारा आत्मप्रौढीपणाला तर आता चांगलाच बहर आला आहे. अशा वेळी एखादा प्राणी जरी आडवा आला तरी चालकाची भंबेरी उडते आणि त्याला चुकवण्याच्या नादात गाडी कुठे तरी आदळते आणि अपघात घडतो.
चूक एकाची आणि भुर्दंड दुसऱ्याला हे अपघाताचे भीषण वास्तव आहे. वाहनचालकाच्या चुकीमुळे आजवर कित्येक निष्पापांचा बळी जाऊनही आपल्यावरील जबाबदारीची जाणीव का होत नाही, हे एक न उलगडणारे कोडे आहे. देशात दरवर्षी वाहतूक सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. या सप्ताहाच्या काळात वाहन चालकांचे प्रबोधन, वाहतुकीचे नियम सांगणे, चालकांची आरोग्य तपासणी करणे, मद्यप्राशन करून वाहन न चालविण्याविषयीचे आवाहन करणे असे जनजागृतीचे अनेक उपक्रम राबवले जातात. काही महिन्यांपूर्वी वाहतुकीच्या नियमांत बदल करून नियमभंग करणाऱ्यांना होणाऱ्या शिक्षेचा कठोरपणाही वाढवण्यात आला.
तरीही चालकांचा निष्काळजीपणा, नादुरुस्त वाहने, लवकर पुढे जाण्याची स्पर्धा, वाहनाचा अंदाज न येणे यांसारख्या कारणांमुळे रस्तेअपघातांत मरण पावणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसत नाही. अपघातांचे सर्व खापर वाहनचालकांवरच फोडता येणार नाही. कित्येकदा पादचाऱ्यांचा बेजबाबदारपणाही यास कारणीभूत असतो. रेल्वेरुळांवर, क्रॉसिंगवर कानात हेडफोन घालून निवांतपणाने जाणारे महाभाग आपण पाहत असतो. महामार्गांवरच नव्हे तर शहरांमधील अंतर्गत रस्त्यांवरूनही अनेक जण अत्यंत बेदरकारपणे आणि वेगाने गाडी चालवत जाताना दिसतात.
खरे म्हणजे, लॉकडाऊनमुळे वाहतुकीची गर्दी कमी असल्यामुळे, ट्रॅफिक जामचा प्रश्नच उरला नसल्यामुळे संयमीपणाने, नियंत्रित वेगमर्यादेत वाहन चालवत नेल्यास नेहमीपेक्षा कमी वेळात आपण निर्धारित स्थळी जाऊ शकतो. पण मोकाटपणा हा अनेकांचा स्थायीभाव असतो. नियम हे आपल्याच सुरक्षिततेसाठी असतात याचे भान त्यांना नसते. उलट नियमांच्या भिंती त्यांना कारागृहाच्या भिंतींसारख्या वाटतात. त्यामुळेच नियमांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा नाहीये असे लक्षात येताच त्यांच्यातील मोकाटपणाला बहर येतो आणि आपसूकच त्यांची पावले अनर्थाच्या दिशेने जातात.
आता रस्त्यावरील वाहनांची वर्दळ वाढत जाणार आहे. अशा वेळी नियमांचे पालन करत, नियंत्रित वेगाने वाहन चालवणे ही प्रत्येक वाहनचालकाची जबाबदारी असणार आहे, नव्हे ते कायद्याने बंधनकारकही आहे आणि आपले कर्तव्यही आहे. अन्यथा पुन्हा एकदा अपघातांच्या राजधानीचा मुकुट आपल्या देशाच्या माथी येणार आहे. ते टाळण्यासाठी वाहनांना स्पीडलॉक असणे गरजेचे आहे. याखेरीज दारू पिऊन गाडी चालवणे, मोबाइलवर बोलत वाहन चालवणे या जुन्या सवयी आता सोडून द्यायला हव्यात.
रस्त्यावर जागोजागी असलेल्या सूचना फलकांचे पालन करायला हवे. वाहनांची दुरुस्ती वेळेवर करून घेणे, ब्रेक नसलेल्या स्थितीत वाहन न चालवणे अशा किरकोळ गोष्टींचीही खबरदारी घ्यायलाच हवी. कारण आपल्या एका चुकीमुळे केवळ आपलेच नव्हे तर अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकते. त्यामुळे करोनानंतर जग कितपत बदलेल हे माहीत नाही; पण सार्वजनिक ठिकाणी वाहन चालवतानाच्या अभद्र सवयींमध्ये आपण बदल घडवून आणायलाच हवा.
– डॉ. जयदेवी पवार