करोनाच्या संकटाशी आपला देश सर्व स्तरांवर झुंजत असतानाच पाकिस्तानमार्गे आलेल्या कोट्यवधी टोळांच्या झुंडीने राजस्थान आणि मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांची पिके नष्ट करून आता उत्तर प्रदेशात प्रवेश केला आहे. टोळधाड मोठी असून, वेगाने पुढे सरकत असल्यामुळे संपूर्ण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर तयारी करून ठेवण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात आधीच अलर्ट घोषित करण्यात आला होता. राजस्थानातील ग्रामीण भागात प्रचंड नासधूस केल्यानंतर कोट्यवधींच्या टोळधाडीने जयपूर शहरात दाणादाण उडवून दिली. ही टोळधाड मुख्यमंत्र्यांच्या तसेच इतर मंत्र्यांच्या घरावरही घोंगावत राहिली. वास्तविक, उन्हाळ्याच्या दिवसांत टोळांचा हल्ला फारसा होत नाही.
पूर्वी टोळांचे उगमस्थान केवळ दक्षिण आफ्रिकेत होते. आफ्रिकेतून भारतात येण्यास टोळधाडीला खूप दिवस लागत असत; परंतु गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर या टोळांनी आपले व्युत्पत्तीस्थान निर्माण केले. हे संकट टाळण्यासाठी पाकिस्तानने काहीच पावले उचलली नाहीत. भारताव्यतिरिक्त इराणसुद्धा या समस्येने ग्रस्त आहे. भारताने तर या संकटाशी एकत्रितपणे लढण्याचा तसेच कीटकनाशके पुरविण्याचाही प्रस्ताव दिला होता. त्यास इराणने सहमती दिली होती; मात्र पाकिस्तानने तयारी दर्शविली नाही.
वस्तुतः ही टोळधाड एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राजस्थानात पोहोचली होती. राजस्थानातील 18 आणि मध्य प्रदेशातील 12 जिल्ह्यांत दहशत पसरविल्यानंतर कोट्यवधी टोळांची झुंड उत्तर प्रदेशातील आग्रा आणि झाशी जिल्ह्यांत पोहोचली. टोळधाड एवढी विलक्षण असते आणि टोळांची संख्या एवढी प्रचंड असते की, अनेक एकरमधील पिके हे टोळ काही मिनिटांतच फस्त करून टाकतात. आपल्या डोळ्यादेखत पिकाची होणारी नासाडी पाहण्यावाचून शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरत नाही. टोळधाडीवर नियंत्रण मिळविण्यात राजस्थानात काहीसे अपयश आले आहे आणि त्यामुळेच राजस्थानव्यतिरिक्त अन्य राज्यांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. पाकिस्तानातून दोन टोळधाडी निघाल्या होत्या. त्यातील एक राजस्थानात तर एक पंजाबात घुसली होती. पंजाबातील यंत्रणेला टोळधाडीवर नियंत्रण मिळविण्यात थोडे यश मिळाले होते.
टोळधाडीचा हा हल्ला सुमारे पंचवीस वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर झालेला आहे. परंतु तरीही एवढ्या वर्षांत टोळधाडीचा मुकाबला करण्यासाठी आपली यंत्रणा पुरेशी मजबूत होऊ शकलेली नाही. लाचार आणि हताश झालेला शेतकरी आपल्या डोळ्यासमोर पिकाची नासाडी पाहात आहे. परंतु काहीच करू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. आरडाओरडा करणे, मोठे आवाज करणे, आग पेटवून धूर करणे अशा उपायांव्यतिरिक्त तो अन्य काहीही करू शकत नाही. अनेकदा जोरजोराने भांडी वाजवून टोळांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला जातो. राज्य सरकारे नावापुरती कीटकनाशकांची फवारणी करीत आहेत; परंतु शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार यामुळे टोळधाडीपेक्षा पिकांचेच अधिक नुकसान होत आहे.
सध्या आपण सर्वजण करोनाच्या महासंकटाचा सामना करीत आहोत. लॉकडाऊनमुळे निर्माण झालेली विचित्र परिस्थिती आपल्यासमोर आहे. परंतु आपण आपली अन्नसुरक्षा धोक्यात टाकू शकणार नाही. टोळांना मारण्यासाठी सामान्यतः संध्याकाळची वेळ निवडली जाते. सूर्यास्त झाल्यानंतर टोळ छोट्या-मोठ्या समूहात एकत्र येऊन आराम करीत असतात. परंतु आता टोळांनीही आपली रणनीती बदलली आहे आणि उंच झाडांवर ते आराम करू लागले आहेत. याच कारणामुळे या टोळांच्या झुंडीवर कीटकनाशकांची फवारणी करण्यासाठी राजस्थानात अग्निशमन दलाचे बंब बोलावण्यात आले.
तसेच राजस्थानातही अग्निशमकांना तयारीत राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. आज तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ड्रोन किंवा छोट्या विमानांचा उपयोग टोळांच्या नायनाटासाठी करणे शक्य असताना शेतकऱ्यांचे भवितव्य या आक्रमकांच्या तावडीत देणे योग्य ठरणार नाही. टोळधाडी रोखण्यासाठी केंद्रीय स्तरावर जर एखादी ठोस रणनीती आखण्यात आली नाही, तर ही टोळधाड देशभरात विस्तार वाढविल्याखेरीज राहणार नाही. पावसाळ्यापूर्वी या टोळांचा नायनाट करणे जवळजवळ अशक्य आहे, असे बोलले जाते.
आणखी तीन-चार टोळधाडी पाकिस्तानातून भारतात घुसण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. हवेच्या प्रवाहानुसार या झुंडीही राजस्थानात पोहोचतील. अशा परिस्थितीत या टोळधाडी रोखण्यासाठी युद्धस्तरावर उपाययोजना केल्या जाणे अत्यावश्यक आहे.
एकीकडे कोविड-19च्या संकटाचा सामना करीत असतानाच देशातील अनेक राज्यांमध्ये आता टोळधाडीचे संकट उभे राहिले आहे. पाकिस्तानातून राजस्थान आणि पंजाबात दोन टोळधाडी आल्या. राजस्थानातील टोळधाड मध्य प्रदेशातही दहशत माजवून आता उत्तर प्रदेशात पोहोचली आहे. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेलगतच्या अनेक जिल्ह्यांत ही टोळधाड पोहोचली आहे. टोळधाडींचे संकट रोखण्यासाठी केंद्रीय स्तरावर ठोस रणनीती आखली नाही, तर हे संकट देशभरात पोहोचण्याची शक्यता आहे.
– नवनाथ वारे