जगदिश देशमुख
100 वर्षांपूर्वी जर्मनीमध्ये 24 फेब्रुवारी 1920 रोजी नाझी पक्षाची स्थापना झाली. या पक्षाने जगावर दुसरे महायुद्ध लादले आणि स्वत:च्याच राष्ट्राचे सगळ्यात जास्त नुकसान करून घेतले. मात्र आजच्या घडीला जर्मनीमध्ये संसदीय लोकशाही पद्धती आहे. समाजवादी लोकशाही पद्धतीने राजकारण चालवणाऱ्या पक्षांचे वर्चस्व आहे. नाझी विचारसरणीचे पक्ष आता जवळपास संपुष्टात आले आहेत.
नाझी पक्ष किंवा हिटलर म्हणजे ज्यु विरोध इतका संकुचित अर्थ नाही. नाझीवाद हा थोडा खोलात जाऊन समजून घ्यायला पाहिजे आणि तसा तो समजून घेतला तर नाझीवादाला एकटा हिटलर जबाबदार नव्हता तर त्या काळातील, त्या देशातील जनतेचा स्वार्थही तितकाच जबाबदार होता. कोणतीही संस्था ही मानवी जीवन सुखी करण्यासाठी सुरू केली जाते. मात्र, त्या संस्थांना स्वार्थ येऊन चिकटला की, मग सुरू होतो मानवी संहार. नाझी आणि हिटलर यांच्या बाबतीतही असेच झाले होते. त्यात नाझीवादाची स्थापनाच स्वार्थातून झाली होती. 1919च्या व्हर्साय तहात जर्मनीवर अनेक जाचक अटी लादल्या गेल्या. हा जर्मन नागरिकांना अन्याय वाटू लागला. त्यामध्ये तेल ओतण्याचे काम 1929-32मध्ये आलेल्या आर्थिक मंदीने केले. आधीच अपमानात जगत असलेली जनता त्यात पोटासाठी ब्रेडही मिळणे दुरापास्त झाले. अशा अवस्थेत जगणारा समाज विद्रोहासाठी लगेच तयार होतो. त्यामुळे जर्मनीमध्ये अशी धगधगती जमीन तयार होती त्यावर फुंकर घालून केवळ आग लावण्याचे काम हे नाझी पक्षाने केले. तरी नाझीवादाने केलेले काम हे कधीही समर्थनीय नाही.
हिटलरने लिहिलेले आत्मचरित्र आणि वेगवेगळ्या प्रसंगी केलेल्या भाषणांचा अभ्यास केल्यावर नाझी पक्ष, त्याची विचारसरणी सहज समजते. नाझी पक्षाचे पर्यायाने हिटलरचे जगाबद्दल, सत्ताकारणांबद्दल काही सिद्धांत होते. 1) नाझीवादाच्या दृष्टिकोनाचा, विचाराचा प्रारंभ व्यक्तीपासून होत नाही. राष्ट्र हा या प्रणालीचा केंद्रबिंदू आहे. 2) मानववंशाची उच्चनीचता गृहीत धरूनच त्याने आपल्या तत्त्वज्ञानाची उभारणी केली. नॉर्डिक वंश हाच जगातील सर्वश्रेष्ठ वंश आहे. अन्य वंशातील लोक हे दुय्यम दर्जाचे आहेत. 3) भिन्नभिन्न मानववंशात समानता मानणे हा त्याला गुन्हा वाटे. 4) सिलेक्शन ऑफ द फिटेस्ट, म्हणजे जे लायक तेच जगण्यासाठी निवडले जातात.
नाझीवादी हुकूमशाहीचे एक वैशिष्ट्य नमूद करण्यासारखे आहे. सामान्यतः हुकूमशाही वा सर्वाधिकारशाही म्हणजे अल्पसंख्याकांची बहुसंख्यांवर त्यांच्या इच्छेविरुद्ध लादलेली सत्ता, असा अर्थ काढला जातो; पण हिटलरच्या नाझी पक्षाला जर्मनीत 1933मध्ये झालेल्या शेवटच्या खुल्या निवडणुकीत 44 टक्के मतदान झाले होते. नाझी पक्षासारखीच विचारसरणी असलेल्या अन्य पक्षांचे मतदान हिशेबात घेतले, तर नाझीवादाला पन्नास टक्क्यांच्यावर जर्मन मतदारांनी पाठिंबा दिला होता. बहुसंख्य मतदारांच्या संमतीने स्थापन झालेली आणि त्यावेळच्या वायमार प्रजासत्ताकाच्या संसदेने अधिकृतरीत्या मान्य केलेली आधुनिक काळातील ही एकमेव बहुमताची हुकूमशाही होती. नाझीवादाने खून व दहशत हे आपले अधिकृत धोरण ठरविले होते कारण चर्चा व वादविवाद यांवर त्यांचा विश्वास नव्हता.
चर्चा व वादविवादावर विश्वास नसणाऱ्या जर्मन जनतेला काही कालांतराने इसपूर्व चौथ्या शतकातील सॉक्रेटीसने मांडलेले विचार पटू लागले होते. प्रश्न हे युद्धाने, तलवारीच्या धारेने नाही तर चर्चेने व वादविवादाने सुटतात. त्यामुळेच व्हर्सायच्या तहापेक्षा द्वितीय महायुद्धानंतर जर्मनीची परिस्थिती अधिक भीषण झाली; परंतु तेथे पुन्हा नाझीवादाचा उदय झाला नाही, त्यानंतर शीतयुद्धामध्ये जर्मनीची फाळणी झाली होती. बर्लिनची भिंत बांधली गेली. ती तुटायला 1990 वर्ष यावे लागले. तरी जर्मनीमध्ये प्रखर राष्ट्रवाद कधी उफाळला नाही. दुधाने तोंड भाजल्यामुळे जर्मन ताकही फुकूंन पिऊ लागले आहेत. त्याचाच परिपाक म्हणून जर्मनी आज जगामध्ये पाचवी महासत्ता बनली आहे आणि त्यांची प्रगती सुरूच आहे.
आज जर्मनीच्या प्रगतीकडे पाहिल्यावर आइनस्टाइनपासून ते 2007 मध्ये नोबेल पारितोषिक मिळवणारे पीटर ग्रुनबर्ग असे अनेक संशोधक जर्मनीच्या भौतिकशास्त्रातील योगदानाचा पुरावा देतात. कार्ल झाइसने सूक्ष्मदर्शकामध्ये केलेल्या सुधारणांमुळे जीववैद्यकीय शास्त्रात आमूलाग्र बदल झाला आणि आजची वैद्यकीय प्रगती शक्य झाली. अभियांत्रिकीत जर्मनीची सर्वांत महत्त्वाची कामगिरी म्हणजे मोटरकार. मोटरकारसंबंधित सुरुवातीचे सर्व मुख्य शोध जर्मनीत लागले. निकोलस ओटोने बनवलेले इंजिन आजही मोटरगाड्या व दुचाकी वाहनात वापरले जाते. ट्रक, बस, जीप अशा मोठ्या वाहनांमध्ये वापरले जाणारे डिझेल इंजिन हे जर्मनीत रुडोल्फ डिझेलने प्रथमतः तयार केले. कार्ल बेंझने व त्यानंतर विल्हेम मेबाख आणि गोटलिब डाइमलर यांनी पहिल्या यांत्रिक गाड्या बनवण्याचा बहुमान मिळवला. जर्मनीने त्यावेळेस वाहन क्षेत्रात मिळवलेली मक्तेदारी आजही कायम आहे. साहित्य क्षेत्रामध्येही जर्मन साहित्य हे इंग्रजी साहित्याखालोखाल संपन्न मानले जाते. अनेक अजरामर साहित्यकृतींनी संपन्न आहे.
नाझीवाद किंवा त्यांचे प्रखर राष्ट्रवादाचे विचार जगात आपणच श्रेष्ठ बाकी आपले गुलाम हे विचार आजही जगातल्या कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात अधीमधी डोके वर काढत असतात. नाझीवादासारख्या मानवता व माणुसकीविरोधी शक्ती सुप्तपणे सर्वच समाजात असू शकतात. वंशवाद, आत्यंतिक राष्ट्रवाद, विशिष्ट समाजगटाचा द्वेष, कल्पित वा वास्तव अन्यायाची गैरवाजवी चीड अशा अनेक प्रवृत्तींच्या रसायनांतून हे तत्त्वज्ञान निर्माण होऊ शकते व त्याला व्यापक पाठिंबा मिळू शकतो. म्हणून जगावर व मानवतेवर असे संकट पुन्हा येऊ नये यासाठी या प्रवृत्तींविरुद्ध संपूर्ण जगाने कायम सावधान राहणे आवश्यक आहे.