जयेश राणे
सोशल मीडिया आणि बरेवाईट विचार याचा काडीचाही संबंध नाही, असे अनेकांनी स्वतःच्या मनावर बिंबवले आहे. मात्र, सोशल मीडियाला अश्लीलतेची झालर आहे, असे चित्र सध्या दिसत आहे, हे नाकारता येत नाही. चांगल्या विचारांसोबतच वाईट विचारांचाही सोशल मीडियावर अति वेगाने प्रसार होत असल्याने हे बरेवाईटाचे नवीनच युद्ध समाजात सुरू झाले आहे.
देशाची लोकसंख्या 130 कोटींच्या घरात पोहोचली आहे. लोकसंख्या प्रतिदिन वाढत आहे. त्या तुलनेत स्मार्ट फोन, इंटरनेट यांचा उपयोग करणारेही वाढत आहेत. यामध्ये युवा पिढीचा सर्वाधिक समावेश आहे. अनेक गोष्टी ऑनलाइन झाल्या आहेत, हे वास्तव आहे. या प्रगतीचा सार्थ अभिमान आहे. स्मार्ट फोनचा अर्थात त्यातील सोशल मीडियाचा उपयोग किती करावा?, हा कायम चर्चेचा विषय असतो. समाजसेवा होत नसली तरी सामाजिक प्रसारमाध्यामांवरून (सोशल मीडियावरून) उपदेशांचा प्रचार-प्रसार करणारे पुष्कळ आहेत. समाजसेवा केली तर केलेल्या सेवेमुळे काहीजणांना त्याचा लाभ होईल आणि परोपकारी वृत्ती अंगी वळण्यास साहाय्य होईल. एवढं साधं आणि सरळ समीकरण आहे. पण त्याविषयीची आवड हाताच्या बोटावर मोजता येईल एवढ्याच व्यक्तींना आहे.
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत सोशल मीडियावर शुभ संदेश फिरत असतात. अनेकजण ते केवळ फॉरवर्ड करण्याचेच काम करत असतात. सर्वच संदेश वाचणे शक्य नसते, ते वाचले पाहिजे असे कोणीही म्हणत नाही. तसेच कोणाचा तसा आग्रहही नाही. पण एक गोष्ट अभ्यासली पाहिजे की, जे संदेश आपण वाचत असतो त्याप्रमाणे आपण किती वागतो?, त्याप्रमाणे वागायला आपल्याला का जमत नाही?, तेव्हा कुठे माशी शिंकते? केवळ सोशल मीडियावरील संदेश वाचून उपयोग नाही, तर त्या प्रमाणे कृतीही केली पाहिजे.
समाजातील वातावरण अश्लीलता, पराकोटीचा स्वार्थ, जाती-धर्म यांचा तिरस्कार यांसारख्या गोष्टींनी ढवळून निघाले आहे. सोशल मीडियावर फिरणारे शुभ संदेश चुकीच्या गोष्टींमुळे वातावरण ढवळून टाकणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीत, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरेल. शुभ संदेशातील विचार-उपदेश हे केवळ त्या संदेशापर्यंत ठीक असतात. अशा प्रकारेच वागणूक चालू असल्याने समाजात गोंधळ चालू आहे. मनाला वाटेल तसे वागायचे, राहायचे, बोलायचे वगैरे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याची आवड-उत्सुकता असणे, द्विअर्थी शब्दांचा उपयोग करणे, विवाह झालेला असेल तरी तो झालेला नाही, असे दर्शवण्यासाठी कामासाठी घरातून निघाल्यावर मंगळसूत्र गळ्यातून काढून ठेवणे आणि घरी जाताना पुन्हा घालून जाणे, विवाहित असूनही दुसऱ्या स्त्रीकडे पाहात राहणे, इतरांचे लक्ष आपल्याकडे वेधले जावे यासाठी शक्य तेवढे तंग आणि अंग प्रदर्शन करणारे कपडे घालणे (काय, तर मी आधुनिक!) आदी गोष्टी समाजात पाहण्यास मिळत आहेत. या सर्व गोष्टी एकाच सूत्राभोवती फिरत आहेत आणि ते म्हणजे कामवासना.
शाळेमध्ये फळ्यावर नियमित नवीन सुविचार लिहिला जात असे. किती विद्यार्थी तो सुविचार वाचून त्याप्रमाणे विचार करत होते किंबहुना आताचे करतात. फळ्यावर सुविचार लिहिला गेला, तरी त्याचे आकलन होत होते का? ते झाले शाळेत असताना. पदवी-पदव्युत्तर शिक्षण घेत असताना फळ्याचा आणि सुविचारांचा काही संबंधच येत नाही. इयत्ता दहावीच्या फलकावर दिसणारे सुविचार पुढील इयत्तांच्या फलकांवरून हद्दपार कसे होतात? एवढं सर्व सांगण्याचे कारण हेच की, शाळेत फलकावर प्रतिदिन एक सुविचार वाचायला मिळत होता. आता सोशल मीडिया चालू केला की सुविचारांची रिघ लागते. केवळ माध्यमात पालट झाला. फळ्याऐवजी स्मार्ट फोनवर सुविचार कळू लागले. कळतय पण वळत नाही. असे असल्याने पालथ्या घड्यावर पाणी असे चित्र दिसत आहे.
आपण घरी काय खातो हे पाहण्यासाठी कोणी आपल्या ताटात डोकवायला येत नाही. मात्र, काय परिधान करतो, याकडे मात्र अनेकांचे लक्ष असते. अशी एक सर्वसाधारण विचारधारा आहे. म्हणजे काय तर जमेल तेवढा देखावा निर्माण करायचा. स्वतःकडे नसले तरी दुसऱ्याकडे हात पसरून ते मागून आणून ते परिधान करायचे. काहीजण म्हणतील आम्हाला याची सवय नाही. ठीक आहे. असे असले तरी जे काही स्वतःच्या पैशांनी खरेदी करता ते तरी चांगले असावे. अर्थात अश्लीलता पसरवणारे नसावे.
समविचारी व्यक्तींचे सुत पटकन जुळते. विषम विचारी व्यक्तींचे मात्र वारंवार खटके उडत राहतात. गेल्या काही वर्षांपासून समाजात अश्लीलतेने पाळेमुळे घट्ट रोवल्याने त्या विचारांवर आधारित समाजाची निर्मिती झाली आहे. या स्तरावरील व्यक्तींचे विचार एकमेकांशी चटकन जुळत आहेत. मग ते नोकरी-व्यवसाय-शिक्षण यात कितीही हुशार असले तरी याच विचारांच्या मागे धावण्यात त्यांना आधुनिक जगात वावरत असल्याचे विकृत समाधान मिळते. अशा विचारधारेचा नाही, तर साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या विचारधारेचा समाजच समाजहित आणि पर्यायाने देशाचे हित साधू शकेल, नाहीतर येणारा भविष्यकाळ हा अंधारयुग असेल.