हेमंत देसाई
नवीन राष्ट्रीय सुरक्षा धोरणात पाकिस्तानने पुढील शंभर वर्षांसाठी शांततापूर्ण संबंध आणि आर्थिक नाते प्रस्थापित करणार असल्याचे म्हटले आहे. त्याबाबत…
कोणतेही शत्रुत्व न स्वीकारता तसेच काश्मीर प्रश्नाच्या अंतिम तोडग्याची वाट न पाहता, उभय देशांतील व्यापारीसंबंध सुरळीत व्हावेत यासाठी भारताबरोबर चर्चा करू, असेही या मसुद्यात म्हटले आहे. पाकिस्तानला हा नवा साक्षात्कार कशामुळे झाला, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कारण एकीकडे पाकपुरस्कृत दहशतवाद आणि घुसखोरी थांबलेली नाही. ड्रोन हल्लेही सुरूच आहेत आणि सीमाभागात ड्रग्जची तस्करीही चालू आहे. भारताने जम्मू-काश्मीरमधून 370वे कलम हटवल्यानंतर दोन्ही देशांतील संबंध खराब झाले.
पाकिस्तानने तर भारतासोबत व्यापार करणेच थांबवले. हा निर्णय रद्द होईपर्यंत सामान्य व्यवहार शक्य होणार नाहीत, असे पाकने स्पष्ट केले होते. पाकिस्तानने प्रथम सीमेपलीकडील दहशतवादास मदत करणे थांबवले पाहिजे. त्यानंतरच शांतताविषयक चर्चा करू, अशी भारताची भूमिका आहे. पण पाकिस्तान ऐकायला तयार नाही. चार वर्षांपासून जम्मू-काश्मिरात सक्रिय असलेल्या पाक दहशतवादी बाबरभाई याचा गेल्याच आठवड्यात कुलगाममध्ये सुरक्षा दलांनी खात्मा केला. तरीदेखील आता असे सांगण्यात येत आहे की, भूतकाळ मागे टाकून केवळ अर्थव्यवहारांवर लक्ष केंद्रित करावे, असे पाक लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांचे मत आहे.
गेल्या ऑगस्टमध्ये तालिबानने अफगाणिस्तानात सत्ता प्रस्थापित केली. ही सत्ता मिळवून देण्यासाठी तुम्हाला आम्ही मदत केली. त्याबदल्यात तुम्ही आम्हाला तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी)ला वेसण घालण्यासाठी साह्य करा, अशी पाकिस्तानची मागणी आहे. अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर करून, टीटीपी पाकिस्तानमध्ये हैदोस घालत आहे. आतापर्यंत या संघटनेने पाकमधील 83 हजार लोकांचे बळी घेतले आहेत. अफगाण तालिबान्यांना आतापर्यंत पाकिस्तानने भरपूर मदत केली; परंतु हा दहशतवादी भस्मासूर पाकिस्तानवरच उलटला आहे. अल-कायदाशी आम्ही संबंध तोडून टाकणार आहोत,
असे आश्वासन अफगाण तालिबान्यांनी जगाला दिले होते; परंतु त्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही, असे पाकिस्तानचेच मत बनले आहे. निदान टीटीपी या बंदी घातलेल्या संघटनेला खत्म केल्यास, अफगाणिस्तानमधील हंगामी सरकारवर जगाचा विश्वास बसू शकेल, असे पाकिस्तानला वाटते. 2014 साली पेशावरमधील लष्करी शाळेवर हल्ला करून, टीटीपीने शंभरपेक्षा जास्त लहान मुलांना ठार मारले होते. त्यानंतरही टीटीपीने अनेक बॉम्बस्फोट, आत्मघातकी हल्ले यामुळे पाकला जेरीस आणले होते. आजही टीटीपीचे हिंसक उपद्व्याप सुरूच आहेत आणि त्यामुळे पाकिस्तान मेटाकुटीस आला आहे.
एकीकडे अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले असून, भिकेचा कटोरा घेऊन जागतिक अर्थसंस्थांच्या दारात उभे राहावे लागत आहे. त्याचवेळी अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमा असुरक्षित बनली आहे. म्हणूनच पाकला अचानकपणे शांततेचे गीत गावेसे वाटू लागले आहे. काबूलचा ताबा घेतल्यानंतर अफगाण तालिबान्यांनी टीटीपीचा एक संस्थापक अमीर मौलवी फकीर मुहम्मद आणि अन्य अनेक अतिरेक्यांची मुक्तता केली.
टीटीपीच्या नेतृत्वाच्या दृष्टीने अफगाण तालिबान हे त्यांचे रोल मॉडेल आहेत. या तालिबान्यांनी ज्याप्रमाणे अफगाणिस्तानवर प्रभुत्व मिळवले, तसेच वर्चस्व पाकिस्तानवर मिळवावे, त्यासाठी आर पार की जंग छेडावी लागली तरी बेहतर, असे टीटीपीचे धोरण आहे. टीटीपीने सातत्याने हिंसाचार घडवला असूनही, या संघटनेशी चर्चा करण्याची तयारी पंतप्रधान इम्रान खान यांनी दाखवली आहे.
अफगाणिस्तानात हक्कानी नेटवर्क हे सत्तेत आले आहे. अशावेळी अफगाणिस्तान व पाकिस्तानने दोन्ही बाजूंनी शस्त्रसंधी होईल, असे ठरवले आहे. तरीदेखील टीटीपीने युद्धविरामाचा भंग करण्याचे जाहीर केले आहे. पाकिस्तानच्या कैदेतील 102 अतिरेक्यांची पाक सरकारने सुटका केली नाही आणि आश्वासनाचा भंग केला, असे टीटीपीचे म्हणणे आहे. खरे तर अफगाण तालिबान आणि हक्कानी यांनी मिळून टीटीपीचा बंदोबस्त केला पाहिजे.
टीटीपीला मिळणारी आर्थिक मदत पूर्णतः थांबवली पाहिजे असे पाकला वाटत असूनही, ही इच्छा फलद्रुप झालेली नाही. पंजाबी जिहादी गट, अल-कायदा, बलुच आणि सिंधी राष्ट्रवादी योद्धे तसेच पाकिस्तानातील गुंड टोळ्या यांच्याशी टीटीपीने हातमिळवणी केली आहे, एवढेच नव्हे, तर दाएश (इस्लामी स्टेट इन इराक अँड सीरिया-आयसिस) किंवा आयएसकेपी या दहशतवाद्यांशीही टीटीपीची दोस्ती आहे.
24 जून 2007 रोजी लाल मशिदीत आश्रय घेतलेल्या अतिरेकी गटांनी इस्लामाबादमधील सात चिनी नागरिक आणि दोन पाकिस्तानी पोलिसांचे अपहरण केले. चिनी लोकांच्या सुटकेसाठी पाक सरकारने शर्थीचे प्रयत्न करावेत यासाठी चीनने त्यावेळी दबाव आणला होता. तेव्हा पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी लाल मशिदीला घेराव घातला आणि आत घुसून शंभर अतिरक्यांना ठार मारले. शेकडो अतिरेकी शरण आले आणि त्यात काही बुरखाधारी महिलाही होत्या. पाकिस्तानच्या अध्यक्षांच्या प्रासादाच्या अगदी जवळ घडलेली ही घटना. ऑपरेशन सायलेन्स अंतर्गत ही मोहीम फत्ते करण्यात आली, तेव्हा संतापलेल्या अतिरेक्यांनी मुख्यतः पश्तुन वर्चस्वाखालील वायव्य पाकिस्तानात अनेक बॉंबस्फोट घडवले,
तसेच आत्मघातकी हल्लेही करण्यात आले. दक्षिण वजिरिस्तान आणि स्वात जिल्ह्यात अतिरेकी अधिक संघटित झाले आणि त्यांनी शरियाची कठोरपणे अंमलबजावणी सुरू केली. लाल मशीद घटनेचा परिणाम म्हणजे, बैतुल्ला महसूदच्या नेतृत्वाखाली 2007 अखेर टीटीपीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर लगेचच हाफिझ गुल बहादूर गटाने जवळपास सुरक्षा दलाच्या सातशे सैनिकांना ठार मारले. टीटीपीने लगोलग अल कायदा, अफगाण तालिबान तसेच इसिसशी संगनमत करण्यास सुरुवात केली. 2011 साली पाक नौदलाच्या हवाईतळावर, तर 2014 मध्ये कराची विमानतळावर हल्ला केला. माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांचीही आम्हीच हत्या केली, असा दावा टीटीपीने केला होता.
अशा या पाशवी संघटनेपुढे नरमाईची भूमिका घेणाऱ्या इम्रान खान यांना आपल्या सरकारच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवावासा वाटत नाही का? भारताला आपल्या कारवाईने त्रास देणाऱ्या पाक सरकारलाच आता दहशतवाद्यांनी घेरले असून, त्यामुळेच आगामी शंभर वर्षांत भारताशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्याची भाषा पाकिस्तान करू लागला आहे.