करोनाचा प्रसार जगभर झाला आणि एका वेगळ्याच भीतीची छाया सर्वत्र पसरली. आता लोक एकमेकांना हस्तांदोलन करत नाहीत किंवा एकमेकांना आलिंगनही देत नाहीत. आत्मीयता प्रकट करण्यासाठी शारीरिक जवळीक साधण्याची प्रथाच मागे पडेल की काय अशी धास्ती आहे. “सोशल डिस्टन्सिंग’ ही नवी परंपराच बनू पाहत आहे आणि अशा स्थितीत मानवी नात्यांचे नवे स्वरूप काय असेल, हे हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे.
करोनाचा आजार जगभर पसरल्यानंतर लोकांना सक्तीने “सोशल डिस्टन्सिंग’ची सवय लावून घ्यावी लागत आहे. किंबहुना रात्रंदिवस लोकांना घाबरवून सोडून ही सवय लावून घेणे भाग पाडण्यात आले आहे, असेही म्हणता येईल. आता तर अशी भीती वाटू लागली आहे की, करोनाचे संकट जेव्हा या जगातून नाहिसे होईल, तेव्हा त्याच्या बरोबर “सोशल डिस्टन्सिंग’ची ही सवय नाहिशी होईल की तशीच कायम राहील? मानवी स्वभावाचा अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांना माणसांची ही सवय लवकर जाईल, असे दिसत नाही.
करोना कधी ना कधी निघून जाईल; परंतु मानवी जीवनात त्याचा प्रभाव प्रदीर्घकाळ कायम राहील. ब्रिटनच्या नॉटिंगहॅम ट्रेंट विद्यापीठात समाजशास्त्राचे अध्यापन करणाऱ्या डिंगवॉल यांच्या म्हणण्यानुसार, करोना संकट निघून गेल्यानंतरसुद्धा करोनाच्या धास्तीमुळे लोकांमध्ये निर्माण झालेली सामाजिक अंतराची सवय प्रदीर्घकाळ कायम राहील. मानवी सवयी आणि अंतरंगाच्या बाबतीत करोना काही नवे निकष स्थापित करूनच जाईल. स्पष्टपणे सांगायचे झाल्यास एकमेकांना स्पर्श करणे किंवा मिठी मारण्यासारख्या माणसाच्या सहजप्रवृत्ती आता “साहसी कृती’ ठरतील. काही प्रमाणात तो “मूर्खपणा’ही मानला जाईल. भारताच्या ग्रामीण भागात तर पहिल्यापासूनच हस्तांदोलन करण्याची प्रथा कधी नव्हती.
परंतु अभिवादनासाठी स्पर्शावर किंवा हस्तांदोलन आणि आलिंगनावर ज्या समाजांमध्ये भर देण्यात आला, त्या समाजांचे यापुढे सर्वाधिक हाल होतील. स्पर्शाधारित अभिवादनाच्या सवयी जाणूनबुजून मोडल्यामुळे माणसाचे अंतरंगही बदलू लागतील. हस्तांदोलन करताना माणसे आता करोनामुळे इतकी “कॉन्शस’ होत आहेत, की कदाचित करोना निघून गेल्यानंतरसुद्धा हस्तांदोलन करताना लोकांना अवघडलेपण जाणवत राहील. सावधगिरी बाळगण्याची लागलेली सवय आता कदाचित एक प्रकारची “रिफ्लेक्ट ऍक्शन’ बनून कायम राहील.
ज्याप्रमाणे अचेतन अवस्थेतही आपण काही संकटांपासून स्वतःचा कळत-नकळत बचाव करीत असतो, अशा संकटांमध्ये आता “स्पर्श’ ही गोष्ट सामील होण्याची शक्यता आहे. मुख्य प्रश्न असा की, यामुळे आपले काही भावनिक नुकसान होईल का? याचे उत्तर होकारार्थी आहे. मनोविश्लेषकांच्या मते, युवा पिढीमध्ये यामुळे भावनिक एकरूपता कमी होण्याचा धोका आहे. स्पर्श हा एक आत्मिक विश्वासाचा भाग आहे. अमेरिका आणि ब्रिटनमध्ये केलेल्या अध्ययनानुसार, सध्या तेथील 90 टक्के लोक स्मितहास्य हेच अभिवादनाचे कायमस्वरूपी माध्यम असल्याचे मानू लागले आहेत. अभिवादनाची ही शैली यापूर्वी अस्तित्वात नव्हती, असे नाही. परंतु तिला व्यापक स्वरूपात मान्यता प्राप्त झालेली नव्हती. अभिवादनाचा हा “डिप्लोमॅटिक’ किंवा अतिऔपचारिक प्रकार मानला जात होता. परंतु आता हीच अभिवादनाची सर्वाधिक अनुकूल पद्धती म्हणून कायम राहण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि युरोपातील 50 टक्के युवक आता एकमेकांसमोर आल्यावर हस्तांदोलन करत नाहीत. केवळ “हॅलो’ म्हणणेच ते पसंत करतात.
स्पर्शाच्या बाबतीत माणसामाणसातील वाढणाऱ्या या अंतरावरून समाजशास्त्रज्ञ आणि मानसतज्ज्ञ एवढे चिंतेत का आहेत, हा खरा प्रश्न आहे. मानवी उत्क्रांतीच्या प्रदीर्घ प्रवासात स्पर्श ही एकमेव अशी गोष्ट आहे, जी आपलेपणा, आपुलकी, विश्वास आणि प्रेम व्यक्त करते. त्यामुळेच कदाचित ही चिंता उत्पन्न झाली असावी. शास्त्रज्ञांनी अनेक प्रयोगांती हे स्पष्ट केले आहे की, स्पर्शामुळे माणसे एकमेकांना ताकद देतात. त्यामुळेच करोनाच्या धास्तीमुळे स्पर्श करण्यास जी भीती उत्पन्न झाली आहे, त्यामुळे माणसामाणसातील परस्परविश्वासाची भावना कमी होण्याची भीती तज्ज्ञांना वाटते. जीवनात आज आपण अनेक प्रकारच्या तंत्रज्ञानाचा आधार घेत आहोत. या तंत्रज्ञानाचा जणू महापूरच आला आहे.
आतापर्यंत केवळ हस्तांदोलनापर्यंतच स्पर्शाची भीती सीमित आहे; परंतु पुढे ती सर्वच प्रकारच्या स्पर्शांच्या बाबतीत निर्माण होत राहील आणि स्पर्श न करता भावना व्यक्त करण्याच्या सवयींमध्ये वाढ होईल. या नव्या सवयींमुळे माणसांमधील प्रत्येक प्रकारचे अंतर वाढेल. त्यामुळे मानवी जीवनात तंत्रज्ञानाची झालेली घुसखोरी आणखी वाढेल आणि तंत्रज्ञानच सर्वांत जवळचे वाटू लागेल. मोबाइल फोन आणि अन्य गॅजेट्सनी आपल्या जीवनात जे महत्त्वाचे स्थान प्राप्त केले आहे, त्याची व्याप्ती आणखी वाढेल.
काही काळानंतर सोशल डिस्टन्सिंग हाच समाजाचा स्थायीभाव आणि शिष्टाचार बनेल. कारण व्यवहारात जेव्हा एखादी भीती आपल्या जीवनाचा भाग बनून जाते, तेव्हा जडलेल्या सवयी लवकर जात नाहीत. कोणत्याही वस्तूला बेधडक हात लावण्याच्या सवयी कमी करणे, लोकांशी हस्तांदोलन करताना कचरणे, वारंवार हात धुणे, समाजापासून अंतरावरच राहणे यामुळे येणाऱ्या काळात समाजात मोठे धोके उत्पन्न होऊ शकतात, असे मानसतज्ज्ञ आणि समाजशास्त्रज्ञांना वाटते. कारण हीच स्थिती कायम राहिली, तर एक वेळ अशी येईल, जेव्हा माणसाला एकटेपणाच अधिक सुरक्षित वाटू लागेल.
करोनानंतर विविध कार्यालयांमधील कामकाजापासून शिक्षणापर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये कामकाजाच्या पद्धती बदलून जातील, असे मानले जात आहे. ऑनलाइन किंवा वर्क फ्रॉम होम हाच कामकाजाचा मुख्य प्रवाह बनण्याची शक्यता आहे. जगभरातील शाळा आणि विद्यापीठांमध्ये शिक्षणासाठी व्हर्च्युअल पद्धतीचा अवलंब करण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे भविष्यात शाळेच्या वर्गात जाण्याऐवजी ऑनलाइन क्लासेसच्या माध्यमातून शिक्षण घेणे हीच कायमस्वरूपी शिक्षणपद्धती म्हणून रूढ होण्याचे संकेत मिळत आहेत. करोनानंतरच्या काळात मनोरंजनाची दुनियाही बदलून जाण्याची शक्यता व्यक्त होत असून, चित्रपट हे चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित न होता ऑनलाइन प्रदर्शित होतील, असे मानले जाते. सण, उत्सव, समारंभ आणि मेजवान्याही उद्या ऑनलाइन सुरू झाल्या, तर आश्चर्य वाटायला नको.
एकंदरीत, सार्वजनिकरीत्या एकत्र येण्याची गरज भासणाऱ्या सर्व गोष्टींचे स्वरूप बदलण्याची शक्यता करोनाच्या प्रसारामुळे निर्माण झाली आहे. कदाचित भविष्यकाळात सार्वजनिक ठिकाणे संसर्गमुक्त असल्याचे प्रमाणपत्रही देणे गरजेचे असेल. अशा रीतीने, सर्वच बाबतीत माणूस माणसापासून सक्तीने दूर होत असल्यामुळे भविष्यातील विश्व, त्यातील रीतीरिवाज आणि भावभावना प्रकट करण्याच्या पद्धती या सर्वच गोष्टींवर परिणाम होईल, असे मानले जात असून, त्यामुळे माणसाचे भावनिक नुकसान होणार आहे.
– प्रा. शुभांगी कुलकर्णी