– डॉ. अ. ल. देशमुख
सीबीएसईपाठोपाठ महाराष्ट्र शासनानेही दहावीची बोर्डाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर स्वयंअध्ययन तंत्राचा शिक्षणात किती उपयोग होतो हे आपल्याला बोर्डाच्या परीक्षेच्या निकालावरून समजले असते; पण ती संधी आपण गमावली आहे. दहावीच्या परीक्षांसाठी महाराष्ट्राचा स्वतंत्र पॅटर्न तयार करून तो संपूर्ण देशालाच नव्हे तर जगाला दाखवायला हवा
सीबीएसईपाठोपाठ महाराष्ट्र सरकारनेही दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करून चुकीच्या पावलावर पाऊल टाकले आहे. शिक्षणामध्ये कोणताही निर्णय घेताना घाईगडबड उपयुक्त नसते. शिक्षणामधून दिसणारे परिणामही उशिरा दिसतात. या नियमानुसार परीक्षाच नको या निर्णयाचा परिणामही देशामध्ये काही कालावधीनंतर दिसला तर ते देशाचे मोठे नुकसान असेल. परीक्षा रद्द करण्यामुळे विद्यार्थी आनंदी होण्यापेक्षा निराशच अधिक झाले आहेत.
या निर्णयानंतर वृत्तपत्रांमधून आलेल्या प्रतिक्रियांचे विश्लेषण केल्यास असे दिसून येते की, सीबीएसई व स्टेट बोर्डाच्या 90 ते 95 टक्के शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांनी याविषयी नकारात्मक विचार व्यक्त केले आहेत. संपूर्ण देशभरात आज शहरी भागात डिजिटलायजेशनचा प्रसार पुरेसा झालेला आहे. सर्वसाधारणपणे सीबीएसईच्या शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक सधन आहेत.
त्यांनी डिजिटलायजेशनसाठी आवश्यक असणारी साधनसामग्री पाल्यांना उपलब्ध करूनही दिली आहे, त्यामुळे मुलांना दहावीच्या अभ्यासक्रमाचे मार्गदर्शन शिक्षकांनी व्यवस्थित केले होते. अनेक शाळांमधील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सराव परीक्षा आणि टेस्ट सिरीज घेऊनही विद्यार्थ्यांची तयारी केलेली होती. त्यामुळे विद्यार्थी या परीक्षेला निश्चितपणे यशस्वीरीत्या सामोरे जाऊ शकले असते. कोविडच्या पार्श्वभूमीवर स्वयंअध्ययन तंत्राचा शिक्षणात किती उपयोग होतो हे आपल्याला बोर्डाच्या परीक्षेच्या निकालावरून समजले असते. हा एक संशोधनाचाच प्रकल्प झाला असता. असा सकारात्मक विचार शिक्षणामध्ये करण्याची गरज आहे. सीबीएसई बोर्डाने तो करायला हवा होता.
सीबीएसईची परीक्षा रद्द झाल्यामुळे महाराष्ट्रातील काही नकारात्मक प्रवृत्तींनी लगेच उभारी घेऊन राज्य शिक्षण मंडळाची म्हणजेच एसएससीची परीक्षाही रद्द करावी, अशी मागणी केली होती. आपण मागणी काय करतो आहोत, याचा सारासार विचार करण्याची कुवत या दहा टक्के लोकांमध्ये नाही असे खेदाने म्हणावेसे वाटते; पण राज्य शिक्षण मंडळाने परीक्षा पुढे रद्द केल्या आहेत. कोविडचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विळखा आहे. खऱ्या अर्थाने शाळा दहा-पंधरा दिवसच चाललेल्या आहेत.
त्यामुळे विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापनही प्रभावीरीत्या आणि परिणामकारक पद्धतीने झालेले नाही ही वस्तुस्थिती आहे. यात कोणाचाही दोष नाही. परिस्थितीच अत्यंत बिकट असल्याने आपल्याला आता बहिःस्थ मूल्यमापन म्हणजेच बोर्डाची लेखी परीक्षा हा एकमेव उपाय शिल्लक आहे. म्हणूनच ही परीक्षा उशिरा का होईना, पण राज्य बोर्डाने ती ऑफलाइन पद्धतीनेच घेणे आवश्यक होते.
ऑफलाइन परीक्षा घ्यायची असेल तर आपल्याला पुरेशी तयारी करण्यासाठी जेवढे दिवस लागतील तेवढे दिवस घ्यायला हवे होते. अर्थातच, या दिवसांमध्ये शासनाने पूर्वतयारी जय्यत करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने कुठलेही पाऊल उचललेले दिसले नाही. समाजातील सर्व घटकांना म्हणजेच डॉक्टर्स, इंजिनिअर्स, व्यापारी, शेतकरी, समाजसेवक, पालक, महाविद्यालयीन कर्मचारी, विद्यापीठातील शिक्षणतज्ज्ञ, संस्थाचालक आदींच्या वेगवेगळ्या पातळीवर बैठका घेऊन प्रत्येकाकडे ही परीक्षा ऑफलाइन यशस्वीरीत्या घेण्यासाठी काही तरी जबाबदारी टाकावी आणि हे आव्हान पेलून दाखवावे.
यातच आपले मोठेपण आहे. वास्तविक, दहावीच्या परीक्षांसाठी महाराष्ट्राचा आपण स्वतंत्र पॅटर्न तयार करावा आणि तो संपूर्ण देशालाच नव्हे तर जगाला दाखवावा, ही संधी आपल्याला चालून आलेली होती; पण ती आपण गमावली आहे.
आज आपल्याकडचा शिक्षणाचा दर्जा खालावलेला आहे अशी टीका सर्वत्र ऐकू येते. अशा स्थितीत परीक्षाच न घेता विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात ढकलल्यास शिक्षणाची पातळी अधिकच खालच्या स्तरावर जाईल, याचा विचार आपण करायला हवा होता. परीक्षा न घेतल्यामुळे प्रवेशप्रक्रियेमध्येही मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण म्हणून जाहीर केल्यास अकरावीमध्ये एवढ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची किंवा अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याची आपली क्षमता नाही, याचाही विचार करावा लागेल. दहावीनंतर विविध शाखांच्या प्रवेशाच्या ठिकाणी जागा मर्यादित असतात.
तिथे कोणाला प्रवेश द्यायचा आणि कोणाला नाही अशी समस्या आता यातून उद्भवणार आहे. त्यातून प्रवेशाचा काळाबाजार सुरू होण्याची फार मोठी भीती संभवते. दुसरीकडे चांगल्या, हुशार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही आणि हुशार नसलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याची शक्यताही आहे. तसे झाल्यास याचा हुशार विद्यार्थ्यांच्या मनावर फार मोठा आघात होऊ शकतो. अशा अनेक समस्या परीक्षा न घेतल्यामुळे निर्माण होणार आहेत. त्यामुळे उशिरा का होईना पण ऑफलाइन परीक्षा व्हाव्यात, असे माझे मत आहे.