आता आपल्या जीवनशैलीवरही नियंत्रण ठेवण्यासाठी नियम तयार करण्याविषयी मोठी चर्चा घडवून आणणे आवश्यक आहे.
आपल्याला सर्वांनाच कोणत्या ना कोणत्या स्वरूपात विकासाच्या नावावर डंका पिटायचा आहे; परंतु हवेची गुणवत्ता हा आपल्या समोरील गंभीर चिंतेचा विषय आहे, हे विसरून कसे चालेल? यासंदर्भात नुकताच प्राप्त झालेला एक महत्त्वाचा अहवाल आपल्याला आरसा दाखविण्यास पुरेसा आहे. विकासाच्या बाबतीत आपण काही अंशी यशस्वी झालो आहोत; परंतु त्या सर्व विकासाचा आनंद घेण्यासाठी जीवन आवश्यक आहे आणि जीवनासाठी प्राणवायू आवश्यक आहे, हे आपण विसरलो आहोत. जीवनासाठी पृथ्वीचे रक्षण करावे लागेल. आता जर हवाच आपले प्राण घेऊ लागली, तर आपले सर्व उपक्रम आणि धोरणे यांना मोठ्या प्रमाणावर अंकुश लागेल. हा अहवाल आपल्याला असे सांगतो की, आपला देश हा कितीही विकसित होणारा देश असला, तरी आपण बरेच काही गमावले आहे.
जगातील सुमारे 50 शहरे सर्वाधिक गंभीर वायुप्रदूषण असलेली शहरे म्हणून निश्चित करण्यात आली आहेत. जर त्यातील 35 शहरे भारतातीलच असतील, तर ती अत्यंत चिंताजनक बाब होय. 75 वर्षांपासून ज्या जीवनासाठी देश विकसनशील ते विकसित होण्यासाठी तळमळत आहे, ते गांभीर्याने न घेतल्यामुळे आपण आपले जीवन संकटात टाकले, असे होऊ देता कामा नये. 2021 चा हा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने अनेक निकषांच्या आधारावर तयार केला आहे. आपल्या देशातील 35 शहरे या अहवालाच्या कक्षेत आली आहेत. आयक्यू इयर या स्वीस संस्थेचा हा अहवाल पीएम-2.5 सह वायू प्रदूषणाबाबत आहे. या अहवालात असे सांगण्यात आले आहे की, 2021 मध्ये केवळ दिल्लीत पीएम-2.5 ची पातळी तब्बल 14.6 टक्क्यांनी वाढली आहे.
गेल्या अनेक दशकांपासून वायुप्रदूषणावरून गदारोळ सुरू आहे. या विषयावर सर्वोच्च न्यायालयानेही अनेक वेळा यंत्रणेला फटकारले आहे. परंतु तरीही आपल्याला गांभीर्य समजलेले नाही. पीएम-2.5 च्या 84 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर या 2020 च्या पातळीच्या तुलनेत 2021 मधील पातळी तब्बल 96 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर झाली आहे. पीएम-25 हे घनकण असून, ते आरोग्यास प्रचंड घातक आहेत. राजकीय असो, आर्थिक असो वा सामाजिक असो, या सर्व क्षेत्रांत देशाला दिशा देणाऱ्या दिल्लीची ही अवस्था तर देशाच्या बाकीच्या भागांचे काय? दिल्ली हे देशाचे हृदय आहे, असे मानून भविष्यातील अनेक धोरणे आखली जातात. त्या शहराची अवस्था अशी असेल, तर इतर शहरांसाठी धोरणे कशी आखणार? इतर शहरांची परिस्थिती काय असेल, हे आधी समजून घेतले पाहिजे.
जगातील सर्वाधिक प्रदूषित 50 शहरांपैकी 35 शहरे आपल्या देशातील आहेत. दिल्लीचा विचार अशा दृष्टीनेही केला पाहिजे की, दिल्ली हे नेहमीच गजबजलेले शहर असते. इतर शहरांच्या तुलनेत येथे घडामोडी नेहमीच जास्त घडतात. त्यामुळे दिल्लीचे पर्यावरण बिघडण्याची हीदेखील कारणे असू शकतात, हे समजून घेता येते. परंतु देशाच्या अन्य शहरांमध्येही अशीच परिस्थिती बिकट होत चालली आहे, हे कसे समजून घेणार? आपण ग्लासगो परिषदेत जाऊन कोणतीही भूमिका घेतली असेल, दिल्लीत बसून आपण आपल्या भविष्यातील विकासाचा मार्ग भक्कम करीत असू; पण आता जी आकडेवारी हाती आली आहे,
ती भयावह भविष्याकडे निर्देश करीत आहे, हे निश्चित. आपल्या देशातील परिस्थिती पाहिल्यास 48 टक्के भारतीय शहरांमध्ये हवेची गुणवत्ता 50 ग्रॅम प्रति घनमीटरपेक्षा अधिक आहे. पाच ग्रॅम प्रति घनमीटर या डब्ल्यूएचओच्या निकषाच्या तुलनेत ती दहापट अधिक खराब आहे. यापुढेही असेच होत राहिले तर आपल्या शहरांचे रूपांतर गॅस चेंबरमध्ये होण्याचा दिवस फारसा दूर नाही. ही स्थिती सध्या केवळ 35 शहरांसाठी दाखविण्यात आली असली, तरी आगामी काळात हीच स्थिती देशातील सर्व शहरांची असेल.
या परिस्थितीमागे एक अतिशय स्पष्ट कारण आहे. आपल्या देशात रस्त्यांवरील वाहनांची संख्या आत्यंतिक अनियंत्रित आहे आणि शहरी लोक त्यांच्या विभागानुसार अनेक प्रकारच्या वाहनांचा छंद पूर्ण करतात. एवढेच नव्हे तर बाजारू संस्कृतीने शहरातील संस्कृती आता खेडोपाडी पोहोचली असल्यामुळे गावांमधील रस्त्यावरही गाड्या आणि मोटारसायकलींची संख्या अनियंत्रित झाली आहे. आपण आपली ये-जा आणि वाहतूक इतक्या प्रमाणात वाढविली आहे की, आपल्यासाठी कार्बन उत्सर्जन आणि त्यामुळे होणाऱ्या वायुप्रदूषणाचे ते प्रमुख कारण ठरले आहे. देशाचा विकास होत असून, देशाच्या आगामी योजनांमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासाला सर्वाधिक महत्त्व दिले जात आहे. हेदेखील मोठे कारण ठरणार आहे.
या साऱ्याचा आपल्या पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होईल. याखेरीज, एकीकडे उद्योगांचा पूर आणि दुसरीकडे जंगलांची घटती घनता, मृत पावत चाललेल्या नद्या आणि पाण्याचे अन्य स्रोत हे सर्वकाही आता हळूहळू आपली साथ सोडत आहे. त्याचाही या सर्वांवर विपरित परिणाम होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भातील आपल्याकडे कोणताही अभ्यास झालेला नाही किंवा कोणतीही आकडेवारी आपल्यासमोर नाही. कार्बन शोषून घेणारा महासागरही आज आपल्याला कोणतीच मदत करू शकत नाही. कारण कचऱ्याने भरलेले समुद्र हा एक अतिशय गंभीर विषय बनला आहे.
आता आपल्या जीवनशैलीवरही नियंत्रण ठेवण्यासाठी नियम तयार करण्याविषयी मोठी चर्चा घडवून आणणे आवश्यक आहे. नियम आणि नियंत्रणे या गोष्टी आपले जीवन वाचविण्यासाठी असतील. आपण कोणत्याही प्रकारच्या निर्बंधांना विरोध करता कामा नये, कारण ते एकवेळ आपल्या जीवनशैलीला मानवणारे नसतील; परंतु त्यामुळे आपले जीवन वाचेल. आज जगातील वायुप्रदूषणाचे मोजमाप नव्या निकषांच्या आधारावर केले पाहिजे आणि त्याचा थेट संबंध जीवनशैलीशी जोडला गेला पाहिजे. जीवनच नसेल तर आपण ते कोणत्या शैलीने जगायचे, याचा विचारच निरर्थक ठरेल. किंबहुना तसा विचार करायला वेळच मिळणार नाही.
अनिल प्रकाश जोशी