– सूर्यकांत पाठक
आजच्या घडीला जवळपास सर्वच फास्ट फूड कंपन्या आपल्या उत्पादनात आरोग्यवर्धक निकष पाळत नसल्याचे दिसून येते. फास्ट फूड हे आरोग्य नष्ट करण्याचे काम करते तरीही त्याची चटक कमी होत नाही, ही खरी समस्या आहे.
निती आयोगाच्या तज्ज्ञांनी खाद्यपदार्थांबाबत विशेषत: फास्ट फूडबाबत केलेले खुलासे धक्कादायक आणि चिंताजनक आहेत. गेल्या तीन वर्षांत फास्ट फूडमध्ये अनारोग्य तत्त्वांच्या प्रमाणात 226 टक्के वाढ झाली असून ही बाब आरोग्याला मारक असल्याचे नमूद केले आहे. अशा प्रकारचे खाद्यपदार्थ कधीच आरोग्यासाठी चांगले नव्हते, आता तर यात आरोग्यवर्धक नसलेल्या घटकांची दुपटीने वाढ झाल्याने आपले आरोग्य संकटात सापडू शकते, असे अहवालात म्हटले आहे. विशेष म्हणजे संशोधकांनी फास्ट फूडचे 1787 पदार्थ, संकेतस्थळ आणि डेझर्ट खाद्यपदार्थांचा अभ्यास केल्यानंतर निष्कर्ष काढला आहे. फास्ट फूडबाबत नकारात्मकता दूर करण्यासाठी अनेक फास्ट फूड कंपन्या सॅलेड आणि अन्य आरोग्यवर्धक वस्तूंचा समावेश करून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत, याकडे अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे.
संशोधकांनी म्हटले, की 1986 ते 2016 या काळात फास्ट फूड पदार्थांच्या साखळीत मेनकोर्समधील पदार्थाचा आकार 39 ग्रॅम आणि कॅलरीचे प्रमाण 90 टक्क्यांपर्यंत वाढल्याचे दिसून येते. फास्ट फूडमधीलच अन्य पदार्थांचा विचार केला तर त्याचा आकार चार ग्रॅमने वाढला असून परिणामी 175 ते 217 कॅलरीपर्यंत वाढ झाली आहे. फास्ट फूड साखळीत मिळणाऱ्या डेझर्ट (गोड पदार्थ)चे वजन 71 ग्रॅम आणि कॅलरीचे प्रमाण 186 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. 1985 च्या तुलनेत पदार्थाचे वजन, प्रति प्लेट कॅलरी व प्रोटीनचे प्रमाण यात उल्लेखनीय वाढ झाली आहे. या बदल्यात चुकीच्या आरोग्याच्या सवयी वाढत असून जीवनशैलीत नकारात्मक बदल दिसून येत आहे. याचा सारासार विचार केला तर भारतात फास्ट फूडचे प्रस्थ वाढले असून त्याचे दुष्परिणाम म्हणजे वाढता लठ्ठपणा.
संशोधकांच्या मते, फास्ट फूडची सवय अशीच सुरू राहिल्यास 2025 पर्यंत भारतातील 1.7 कोटी मुलांना लठ्ठपणाचा त्रास होईल आणि 185 देशांच्या यादीत भारत हा दुसऱ्या क्रमांकांवर असेल, अशी भीती व्यक्त केली आहे. सध्याच्या काळात चीनच्या 1.53 कोटी मुलांना लठ्ठपणाचा आजार आहे. गेल्या एक दशकांत भारतातील लठ्ठपणाचा सामना करणाऱ्या लोकांची संख्या दुप्पट झाली आहे. जगात सर्वाधिक संख्या अमेरिकेत असून तेथे 7.94 कोटी ज्येष्ठ नागरिक लठ्ठपणाने ग्रस्त आहेत. चीन दुसऱ्या नंबरवर असून तेथे 5.73 कोटी नागरिक लठ्ठपणाच्या विळख्यात अडकलेले आहेत. आणखी एका अभ्यासात आढळून आले की, थंड पाण्यात 200, पिझ्झात 300, केकमध्ये 120 आणि बर्गरमध्ये 200 कॅलरी असतात आणि ही बाब लठ्ठपणा वाढीसाठी पुरेशी आहे.
असोचेम आणि जागतिक आरोग्य संघटनेकडून जारी एका अहवालात लठ्ठपणाचे प्रमुख कारण फास्ट फूडचे सेवन असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच शालेय विद्यार्थी किंवा महाविद्यालयीन तरुण-तरुणी घरात तयार केलेले गुणवत्ताप्रधान भोजन करण्याऐवजी पास्ता, मॅक्रोनी, चाउमिन, नूडल्स, बर्गर, मॅगी, मोमोजवर भर देत आहेत. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारच्या पदार्थांचे जादा सेवन केल्यास रक्तदाब, मधुमेह, हाडे ठिसूळ होणे तसेच लठ्ठपणा आदी होण्याची शक्यता अधिक राहते.
देशात पूर्वी ज्येष्ठांना मधुमेहाचा त्रास व्हायचा. आता कमी वयातच मधुमेहाचे विकार होताना दिसून येत आहेत. अनेक प्रकारच्या
सर्वेक्षणात फास्ट फूडचे सेवन करणाऱ्या मुलांना मधुमेह होण्याचा धोका अधिक राहात असल्याचे निदर्शनास आले आहे. कारण, प्रत्येक प्रकारच्या फास्ट फूडमध्ये साखरेचा वापर होतो. एवढेच नाही तर फास्ट फूडच्या आहारी गेलेल्या मंडळींचे दात खराब होण्याची शक्यता अधिक राहते. उच्च साखरेचे प्रमाण राहणाऱ्या वस्तू जसे की सोडा, कॅंडी, बेकचा वापर होत असल्याने तोंडाचे विकार वाढण्याचा धोका राहतो. बटाट्याचे चिप्स, फ्रेंच फ्राइज यासारख्या फास्ट फूडमध्ये सोडियमचे प्रमाण अधिक राहते आणि त्याच्या अधिक सेवनाने रक्तदाब आणि स्ट्रोकची शक्यता राहते. तज्ज्ञांच्या मते, 500 मिलीग्रॅम सोडियमचे सेवन केल्याने स्ट्रोक येण्याची शक्यता 17 टक्क्यांनी वाढते.
शरीराला आरोग्यदायी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन्सची गरज भासते. यामुळे शरीराचा निकोप विकास होतो. पण फास्ट फूडमध्ये जीवनसत्त्व नसतात अणि खनिजतत्त्व असून नसल्यासारखे असतात. म्हणून फास्ट फूडचे सातत्याने सेवन करणाऱ्या मंडळींचे शरीर हे सकस, पोषण आहारापासून वंचित राहते आणि जीवनसत्त्व न मिळाल्याने अनेक आजारांना निमंत्रण मिळते. याशिवाय जगभरात कोका-कोला, पेप्सीचे प्रचंड सेवन केले जाते. परिणामी या पदार्थांच्या सेवनाने शरीराची हानी होते. या गोष्टीचा आपल्याला विसर पडतो.
जून 2006 मध्ये “सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट’च्या एका अहवालात कोका-कोला आणि पेप्सीत कीटकनाशकांचे प्रमाण अधिक असल्याचे निष्पन्न झाले होते. “सीएसई’च्या अहवालात म्हटले की, कोका-कोला आणि पेप्सी यांच्या 11 विविध ब्रॅंडमध्ये कीटकनाशकाचा अंश हा 2003 मध्ये शीतपेयात आढळून आलेल्या प्रमाणापेक्षा अधिक होता. कोलकाता येथे तयार केलेल्या कोका-कोलात कॅन्सरला कारण ठरणाऱ्या लिंडेनचे प्रमाण बीआयएस निकषाच्या तुलनेत सुमारे 140 पट अधिक आढळून आले. आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संस्थांनी म्हटले की, फास्ट फूडमुळे भूक भागत असली तरी त्याला शरीरासाठी पौष्टिक आहार म्हणता येणार नाही. या संस्थांच्या मते, फास्ट फूडला रोजच्या आहारात सामील करू नये.
त्यांच्या मते, फास्ट फूड तयार करताना कृत्रिम रंगाचा वापर केला जातो आणि त्यामुळे शरीरात अनेक प्रकारच्या ऍलर्जीचा दुष्परिणाम वाढू शकतो. तज्ज्ञांच्या मते, गरजेपेक्षा शिसे अधिक प्रमाणात शरीरात गेल्यास तब्येत ढासळू शकते. न्यूरोलॉजिकल समस्येबरोबरच रक्तप्रवाहात अडथळे येऊ शकतात आणि मूत्रपिंड विकारदेखील होऊ शकतो. फास्ट फूडच्या सेवनाने मेंदूत धोकादायक केमिकल पोहोचत असल्याचा दावादेखील संशोधकांनी केला आहे. त्यामुळे मेंदू सुस्त राहतो आणि कामात संथपणा येतो. कमी वयाची मुले फास्ट फूडचे सेवन अधिक करत असल्याने त्यांच्या आरोग्यासाठी ही बाब गंभीर आहे. त्यांच्या शारीरिक विकासात अडथळे आणण्याबरोबरच पोटाचे विकारही होऊ शकतात. शिवाय संवेदनशील अवयवांची देखील हानी होऊ शकते. फास्ट फूड हे फास्ट पद्धतीने शारीरिक आरोग्य नष्ट करण्याचे काम करते.