– ब्रिगे. हेमंत महाजन (निवृत्त)
अमेरिकेची गुप्तहेर संघटना “डायरेक्टर नॅशनल इंटेलिजन्स’ने 9 एप्रिल 2021 ला आपला वार्षिक अहवाल अमेरिकन सिनेट समोर ठेवला. यामध्ये पुढच्या एक वर्षांमध्ये अमेरिकेच्या आणि जगाच्या सुरक्षेला जे वेगवेगळे धोके निर्माण होऊ शकतात, त्याविषयी विश्लेषण केले आहे. हा अहवाल मोठा आहे. आपण आपले लक्ष फक्त जे धोके भारतासाठी महत्त्वाचे आहे, यावर केंद्रित करूया.
चीनपासून निर्माण होणारे धोके हे विविध क्षेत्रांत, विविध स्तरांवर 365 दिवस येणार आहेत. यामध्ये चीनच्या सीमेवरच्या कारवाया, त्यांची आक्रमक मुत्सद्देगिरी, भारताच्या शेजारी राष्ट्रांमध्ये होणारी चिनी घुसखोरी, साऊथ चायना समुद्रामध्ये त्यांचे आक्रमक धोरण, चिनी गुप्तहेरांची भारताच्या विविध क्षेत्रांतील घुसखोरी, सायबर ऑपरेशन, चीनचे टेक्नॉलॉजिकल आक्रमण असे विविध विषय यामध्ये लक्षात घेण्यात आले आहेत. यात महत्त्वाचे हे आहे की, या आव्हानांना भारताचे प्रत्युत्तर हे कसे असावे?
हा अहवाल असे सांगतो की, चीन येणाऱ्या काळामध्ये भारतामध्ये विविध प्रकाराने अराजकता पसरवून भारताची आर्थिक प्रगती रोखण्याचा प्रयत्न करेल. भारत-चीन सीमेवरती चिनी आक्रमकता वाढू शकेल. शक्य होईल तेव्हा लष्करी बजेट वाढवण्याची गरज आहे. चीनचे नौदल, हवाईदल आणि स्ट्रॅटेजिक रॉकेट फॉर्सेस यांची ताकद अजून वाढणार आहे. वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन म्हणजे अणुबॉम्ब, क्षेपणास्त्र आणि इतर शस्त्रे यांची संख्या दुप्पट होण्याची शक्यता आहे. चीनची आर्थिक ताकद प्रचंड असल्यामुळे त्यांना अशा प्रकारची महागडी शस्त्रे निर्माण करणे सोपे आहे. भारताने अणुबॉम्ब, क्षेपणास्त्र क्षेत्रामध्ये आपले संशोधन चालू ठेवावे आणि शक्य होईल तेव्हा शस्त्रांची संख्या वाढवावी लागेल. अणुयुद्धामध्ये भारताला सेकंड स्ट्राइक केपॅबिलिटी निर्माण करण्यावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. सध्या मात्र भारताला करोनामुळे लष्करी बजेट वाढवण्याची अजिबात संधी नाही.
अंतराळातील युद्धाची तयारी करा
स्पेस म्हणजे अंतराळातल्या लढाईमध्ये चीन वेगाने प्रगती करतो आहे. चीन आपल्या सॅटेलाइटच्या मदतीने जगावर लक्ष ठेवतो आहे. त्याच्याकडे दुसऱ्या देशांचे सॅटेलाइट पाडण्याची क्षमता आहे, यामुळे अंतराळात होऊ शकणाऱ्या युद्धावरसुद्धा भारताला लक्ष द्यावे लागेल. भारताने अंतराळात असलेले सॅटेलाइट पाडण्याची क्षमता गेल्याच वर्षी दाखवून दिली होती. ही क्षमता येणाऱ्या काळामध्ये वाढवून आपल्याला अशा प्रकारचे सॅटेलाइटविरोधी क्षेपणास्त्र सैन्यात सामील करून तैनात करावी लागतील.
चीनच्या तंत्रज्ञान आक्रमणाचा मुकाबला
तंत्रज्ञानाच्या क्षेत्रांमध्ये चीनची शक्ती प्रचंड आहे. त्यांनी साम, दंड, भेद यांचा वापर करून वेगवेगळ्या देशांचे तंत्रज्ञान चोरले आणि हाच प्रयत्न ते येणाऱ्या काळात चालू ठेवतील. भारतामध्ये त्यांनी अनेक क्षेत्रांमध्ये घुसखोरी करायचा प्रयत्न केला आहे. उदाहरणार्थ बंगलोरमधल्या आयटी सेक्टरमध्ये चीन मोठ्या प्रमाणात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत होता. आता तो थांबवण्यात आला आहे. थोडक्यात, आपल्याला इतरांवर अवलंबून न राहता स्वतः तंत्रज्ञान विकसित करावे लागेल. याला अर्थात वेळ लागेल; परंतु तोपर्यंत आपल्याला इतर मित्रराष्ट्र म्हणजे अमेरिका, जपान, तैवान यांची मदत घेऊन चीनच्या तंत्रज्ञान आक्रमणाचा मुकाबला करावा लागेल.
आक्रमक सायबर ऑपरेशन्स
ज्या क्षेत्रामध्ये चीन अतिशय ताकदवान आहे ते क्षेत्र म्हणजे सायबर जगत. हॅकिंग, ट्रेड सिक्रेट, डिझाईन चोरणे या क्षेत्रांत चीन पुढे आहे. त्याने फॉर्च्यून फाईव्ह हंड्रेड कंपनीचे ट्रेड सिक्रेटसुद्धा चोरले आहेत. आपण केवळ आपल्या देशाच्या महत्त्वाच्या संघटनाचा चीनच्या आक्रमणापासून रक्षण करण्याचा प्रयत्न करतो. भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल रावत यांनी म्हटले आहे की, आक्रमक सायबर ऑपरेशन्स म्हणजेच चीनच्या सायबर जगतामध्ये प्रवेश करून हॅकिंग करणे, किंवा त्यांचे सिक्रेट्स चोरणे यामध्ये भारत खूप मागे आहे. येणाऱ्या चार वर्षांमध्ये आपण चीनबरोबर स्पर्धा करण्याकरता तयार राहू.
चीनने भारताच्या सायबर पद्धतीवर हल्ला केला, (जसा महाराष्ट्राच्या वीजनिर्मितीवर) तर आपल्याला चीनच्या सायबर जगतामध्ये सर्जिकल स्ट्राइक करण्याची क्षमता निर्माण करावी लागेल. याकरता भारतीय सैन्याने डिफेन्स स्पेस, सायबर एजन्सी तयार केली आहे. आशा करूया की, यामध्ये भारतातले बुद्धिमान विद्यार्थी, संशोधन करणारे शास्त्रज्ञ आणि सैन्य हे एकत्रित येऊन काम करतील. त्यामुळे चीनच्या आक्रमणाला प्रत्युत्तर देण्याची आपली क्षमता येणाऱ्या काळांमध्ये वाढेल.
चीनच्या आक्रमणाला सामोरे जाणे
चीन जगामध्ये आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे. यामध्ये ते जगाच्या मीडियाला वेगवेगळ्या पद्धतीने विकत घेत आहे. वेगवेगळ्या देशांच्या निवडणुकांमध्येसुद्धा हस्तक्षेप करीत आहे. म्हणूनच या बाबीवर लक्ष ठेवून आपल्या देशातील चीनचा हस्तक्षेप थांबवावा लागणार आहे. येणाऱ्या काळामध्ये चीन विविध प्रकारांनी भारतावर आक्रमण करत राहील आणि याकरता भारताला सदैव जागरूक राहून चीनच्या विविध प्रकारच्या आक्रमणाला तोंड द्यावे लागेल. चीनचा मुकाबला करण्याकरता आपल्याला लष्करी ताकदीशिवाय इतर विविध क्षेत्रांमध्ये भारताची क्षमता वाढवत देशाकडे असलेल्या सर्वसमावेशक राष्ट्रीय ताकदीचा वापर करून आपल्या विविध सीमांचे रक्षण करावे. आपल्याकडे असलेली साधने आणि बजेट नेहमीच कमी पडेल म्हणून अशा आव्हानांचा मुकाबला करण्याकरता आपल्याला कल्पकता म्हणजे इनोव्हेशन याचा वापर करून चीनचा मुकाबला करावा लागणार आहे.