जयेश राणे
कायद्याने बालविवाहाला बंदी असूनही सध्याचे बालविवाहाचे आकडे पाहता सर्रास हा गुन्हा आपल्या आजूबाजूला घडत असल्याचे दिसते. जागृत नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिल्यास असे विवाह उधळून लावता येतील आणि एका निष्पाप जीवाची सुटका करता येईल.
बालविवाह हा गुन्हाच आहे. बालविवाह करू नये, त्यामुळे मुलीच्या आरोग्याला धोका असतो, याचा विचार प्राधान्याने होताना दिसत नाही. बालविवाहित मुलगी ज्या अपत्याला जन्म देते त्या अपत्याची स्थिती किती नाजूक असते, हे ही दिसत असते. ज्या वयामध्ये मुलीला शिक्षण आवश्यक असते, तिच्या शरीरामध्ये महत्त्वाचे बदल होत असतात, खेळण्याचे दिवस असतात त्याच वयामध्ये विवाह करण्यासाठी सक्तीच केली जाते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
ज्याच्याशी तिचा विवाह होतो. तो मात्र विवाहानंतर तिच्याकडे केवळ उपभोगाचे साधन म्हणूनच पाहत असतो. त्या बाल जीवाची अशा वेळी काय स्थिती होत असेल? एखाद्याला “तोंड दाबून बुक्क्यांचा मार द्यावा’ अशाच अवस्थेत तिला जीवन जगावे लागते. तिच्या शरीराची वाढ होऊ देण्यासाठी प्रतीक्षा करणे, शिक्षण घेण्यास मोकळीक देणे या गोष्टींना तिलांजलीच दिली जाते.
असे असताना तिला तिच्या पद्धतीने जीवन जगण्यास देणे या विचाराला स्थानच राहत नाही. संसार म्हणजे काय? संसाराची जबाबदारी म्हणजे काय? त्याचा डोलारा कसा सांभाळायचा असतो? कठीण प्रसंगातूनही कशी वाट काढायची असते? सासरच्या मंडळींची मानसिकता कशी ओळखावी? आदी अनेक प्रश्न आहेत. त्यांचा बालविवाहित मुलींचा अभ्यास नसतो. किंबहुना पुसटशी ओळखही नसते. अल्पवयात अनेक मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात. प्रसंगी सासरच्या मंडळींकडून मारहाणही सहन करावी लागते. माहेरून पैसे आणण्याचा तगादाही चालू असतो. अनेक मुली या गोष्टी निमूटपणे सहन करत असतात. शारीरिक, मानसिक आणि आर्थिक अशा तिन्ही विवंचनांतून तिला जावे लागते. ज्यांच्यामुळे हे होते ते तिचे वय काय आणि आपण तिच्या सोबत करतो काय? हा विचारही करत नाही. बालविवाहामुळे मुलीची काय घुसमट होत असेल? त्याच्या पिडेने त्या मुलीचा जीव किती तळमळत असेल.
बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरातील फुलेनगर भागात रात्री अकरा वाजता एका नऊ वर्षांच्या बालिकेचे लग्न लावले जात असल्याची गुप्त माहिती माजलगाव पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बालविवाह उधळून लावला. लग्न लावण्याचा आखलेला बेत तेथीलच एका नागरिकांच्या लक्षात आल्याने त्यांनी पोलिसांना त्याविषयी माहिती कळवली. अशी जागरुकता नागरिकांमध्ये अत्यावश्यक आहे. आपल्या विभागामध्ये बालविवाह होतात. हे माहीत असूनही त्याविषयी आवाज न उठवणे म्हणजे त्या गोष्टीस अनुमोदन देणे होय. बालविवाह करून ती मुलगी सुखी होणे अशक्य असते. तरीही मुलीला दुःखाच्या दरीत लोटले जाते, हे संतापजनक आहे.
मुंबई महानगरातील असाच एक प्रकार म्हणजे जन्म दिलेल्या मुलीला सोळा वर्षे वाढवले आणि आईनेच तिचा बालविवाह लावून दिला. पतीने तिचा अनन्वित छळ केला. ते अत्याचार सहन न झाल्याने मुलगी माहेरी आली. मुलीला आधार देण्याऐवजी आईने तिला देहविक्रय करायला भाग पाडले. मुंबईतील मानखुर्द परिसरातून ही घटना उघडकीस आली आहे. मुलीच्या सख्खा भावाने लैंगिक संबंध ठेवण्यासाठी तिला तलवारीने हल्ला करण्याची धमकी दिली. हे सर्व असह्य झाल्यामुळे तिने अखेर पोलिसांत तक्रार केली. शेवटी त्या मुलीलाच आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडावी लागली. अन्यथा तिला हे निमूटपणे सहन करत राहावे लागले असते. यात दुमत नाही.
असे किती प्रकार देशात चालू असतील? वर्ष 2013 ते 2017 या कालावधीत देशभरात बालविवाहाची दीड हजारांहून अधिक प्रकरणे उघड झाली असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी राज्यसभेत दिली आहे. एका प्रश्नाच्या उत्तरात इराणी यांनी बालविवाहांबाबतची गेल्या पाच वर्षांतील माहिती सादर केली. बालविवाहाची सर्वाधिक प्रकरणे वर्ष 2017 मध्ये (395) उघड झाली. वर्ष 2016 मध्ये हे प्रमाण 326, वर्ष 2015 मध्ये 293, वर्ष 2014 मध्ये 280 आणि वर्ष 2013 मध्ये 222 इतके होते, असे इराणी यांनी “नॅशनल क्राइम रेकॉर्डस ब्युरो’च्या माहितीच्या आधारे सांगितले.
वर्ष 2017 मध्ये सर्वाधिक बालविवाह कर्नाटकात झाले. त्या आधीच्या चार वर्षांमध्ये त्याबाबत तामिळनाडू आघाडीवर होते, असेही इराणी म्हणाल्या. सरकारकडे आलेली आकडेवारी लक्षात घेता त्या ही पेक्षा अधिक प्रकार घडत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. बालविवाह रोखण्यासाठी नागरिकांचा सहभाग मोलाचा असणार आहे. तो नगण्य आहे. जे चुकीचे होत आहे, ते कायद्याने रोखण्यास पुढे आले पाहिजे.