विनायक सरदेसाई
हिवाळ्याच्या दिवसांत करोना संसर्ग धोकादायक स्तरापर्यंत वाढू शकतो आणि वायू प्रदूषणाच्या बाबतीत भारतातील परिस्थिती जगात सर्वात वाईट आहे. जर करोनापासून बचावाच्या उपाययोजनांकडे डोळेझाक केली, तर त्याची प्रचंड मोठी किंमत आपल्याला मोजावी लागू शकते.
करोना विषाणूचा फैलाव कसा होतो, यासंदर्भात गेल्या काही दिवसांत नवनवीन चर्चा ऐकायला मिळत आहेत. हा विषाणू हवेतूनही पसरतो, असे सांगण्यात येत असल्याने गांभीर्य वाढले आहे. काही शास्त्रज्ञांनी तर हा विषाणू हवेतून पसरतो, याचे पुरावे अभ्यासातून मांडलेही आहेत. त्यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर राखणे आणि मास्कचा वापर हाच बचावाचा एकमेव उपाय असल्याचे सांगितले होते. दुसरीकडे अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने (सीडीसी) ज्या प्रकारे या बाबतीत भूमिका बदलली, ते पाहता याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
सीडीसीने आधी सांगितले होते की, करोनाचा संसर्ग हवेतून पसरू शकतो. परंतु त्यानंतर हे वक्तव्य मागे घेतले. आता सीडीसीने पुन्हा एकदा हवेद्वारे संसर्ग पसरत असल्याचे नमूद केले आहे. अर्थातच, जर हवेतूनसुद्धा करोनाचा संसर्ग पसरत असेल, तर नागरिकांमध्ये घबराट निर्माण होणे स्वाभाविक आहे. जेव्हा वायू प्रदूषण वाढते, तेव्हा प्रदूषणाचे कण करोना विषाणूंना हवेत तग धरून राहण्यासाठी सर्वाधिक मदत करतात, असे अनेक देशांच्या शास्त्रज्ञांनी अभ्यासांती सांगितले आहे.
करोना विषाणू केवळ संपर्कामुळे पसरतो, असे आतापर्यंत ढोबळपणे मानले जात होते. याखेरीज तोंडाच्या माध्यमातून करोनाचे विषाणू जमिनीवर पडतात आणि त्यापासून संसर्ग पसरण्याचा धोका फारसा नसतो. जर सुरक्षित अंतर राखले नाही, तर एका व्यक्तीमार्फत श्वासातून हवेत सोडले जाणारे विषाणू दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात आणि तिलाही संसर्ग होतो, असे सांगितले गेले. परंतु आता नवेच वास्तव समोर आले असून, हवेतील कणांच्या माध्यमातून करोनाचे विषाणू पसरतात असे समोर आले आहे. हवेत असणारे विविध कण पाच मायक्रोमीटरपेक्षाही कमी आकाराचे असतात. हे कण हवेत सर्वत्र विखुरलेले असतात आणि श्वासामार्फत जे शिंतोडे बाहेर पडतात, त्यांच्या तुलनेत बराच काळ ते हवेत राहतात. नाकातोंडावाटे निघणारे शिंतोडे काही वेळातच जमिनीवर पडतात. परंतु हवेत असलेले प्रदूषणाचे कण जमिनीवर येण्यासाठी सोळा ते अठरा तास लागू शकतात. अशा स्थितीत नाकातोंडावाटे जे शिंतोडे उडतात त्यातील विषाणू हवेतील प्रदूषण कणांना चिकटून बसतात आणि हवेच्या मार्फतच दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात.
हवेच्या कणांमधून विषाणू पसरतो या वास्तवास मान्यता देणारे विधान सीडीसीने जेव्हा मागे घेतले तेव्हा हवेतून विषाणूंचा प्रसार होतो की नाही, याबाबत मोठा वाद उद्भवला. सीडीसीने आपल्या शिफारशी देताना प्रस्तावित परिवर्तनांचा एक मसुदा जारी केला होता.
परंतु त्यावर चर्चा सुरू होताच नंतर तो मागे घेण्यात आला. संसर्गग्रस्त रुग्णाच्या नाकातोंडातून उडालेले सूक्ष्म थेंब म्हणजे शिंतोडे हवेच्या कणांचे स्वरूप धारण करतात. काही काळ ते हवेत तरंगत राहतात आणि विशिष्ट परिस्थितीत ते सहा फुटांपेक्षा अधिक अंतरापर्यंतही पसरतात. अशा दूषित हवेत श्वास घेणाऱ्या निरोगी व्यक्तींना करोनाची लागण होऊ शकते, या गृहितकाला सीडीसीने आधी पुष्टी दिली होती. परंतु सीडीसीने जो नवा परामर्श जारी केला, त्यात विषाणूच्या संभाव्य वाहकांमध्ये हवेच्या कणांचा उल्लेख केलेला नव्हता.
धक्कादायक बाब अशी की, आता सीडीसीने तिसऱ्यांदा आपली भूमिका बदलली असून, हवेतून करोनाचा फैलाव होतो, हे मान्य केले आहे. हवाई कणांमधून करोनाचा संसर्ग होत असल्याच्या सिद्धांताला स्वीकारार्हता खूप उशिरा मिळाली. वस्तुतः त्याचे शास्त्रीय पुरावे पूर्वीच समोर आले होते. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात “नेचर’ या विज्ञान क्षेत्रातील प्रसिद्ध नियतकालिकात प्रकाशित झालेल्या एका लेखात चीनमधील वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या संशोधकांनी पहिल्यांदाच असे सांगितले की, हा विषाणू वायुजनित माध्यमातून पसरू शकतो.
हा लेख अशासाठी महत्त्वाचा आहे की, याच अध्ययनात संसर्ग पसरविणाऱ्या करोना विषाणूची आनुवंषिक ओळख आणि अन्य वैशिष्ट्ये सर्वप्रथम सांगण्यात आली होती. हा विषाणू माणसांच्या पेशीत प्रवेश करण्यापूर्वी पेशीच्या बाहेरील आवरणाच्या संपर्कात येतो, हेही प्रथमच सांगण्यात आले होते. हवाई कणांच्या माध्यमातून संसर्ग पसरत असल्याचे वास्तव स्वीकारण्यास सीडीसीने विलंब केला. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) तर हवेतून करोनाचा प्रसार होत असल्याचे वास्तव जुलैमध्येच स्वीकारले होते आणि जगभरातील दोनशे शास्त्रज्ञांनी लिहिलेले पत्र त्यास कारणीभूत होते. हा विषाणू हवेतून पसरत चालला आहे, हे वास्तव स्वीकारण्याची गरज या शास्त्रज्ञांनी या खुल्या पत्रात व्यक्त केली होती.
यावर्षी फेब्रुवारी महिन्यात जपानच्या किनाऱ्यावर डायमंड प्रिन्स या क्रूज शिपमधून प्रवास करणाऱ्या साडेतीन हजारांहून अधिक प्रवाशांपैकी 171 लोक करोना संसर्गाने ग्रस्त असल्याची माहिती पुढे आली होती. त्यानंतर दक्षिण कोरिया आणि सिंगापूरमधील तुरुंग, वृद्धाश्रम, दक्षिण कोरियातील झुंबा-नृत्याची केंद्रे, ऑस्ट्रियामधील स्की-रिसॉर्ट आणि माउंट वर्नोन आणि वॉशिंग्टनमधील एका चर्चमधून संसर्गाचा फैलाव झाल्याचे दिसून आले होते. या सर्व घटनांमध्ये जी साम्यस्थळे आणि सज्जड पुरावे मिळून आले, त्यामधून हा संसर्ग हवेमधूनच पसरले होते, असे स्पष्ट झाले. हवेतून संसर्ग पसरत असल्याचे पुढे आल्यानंतर हा संसर्ग सहा फुटांपेक्षा अधिक अंतरावरूनही एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पोहोचतो, याचे पुरावे मिळाले.
अशा स्थितीत लोकांना जास्तीत जास्त काळ मास्क वापरण्यास प्रोत्साहित करणे आणि लस उपलब्ध झाल्यानंतरसुद्धा मास्कचा वापर सुरू ठेवणे अधिक फायदेशीर ठरेल. हे सुरक्षिततेची एक अतिरिक्त कवच ठरू शकते. हवेतून संसर्ग फैलावतो, या सिद्धांताला डब्ल्यूएचओ आणि सीडीसीने लवकर मान्यता दिली असती तर वेळीच सावधगिरी बाळगण्याच्या हेतूने लोकांना मास्क परिधान करण्यास लवकर प्रवृत्त करता आले असते आणि संसर्गाचा प्रसारही रोखता आला असता.