– हेमंत देसाई
पंतप्रधान नरेंद मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ची घोषणा केली आहे. आयात केल्या जाणाऱ्या जास्तीत जास्त वस्तू देशातल्या देशात बनाव्यात, हा त्यामागील हेतू. ऍपल या जगद्विख्यात कंपनीने भारतात चेन्नई येथे प्रकल्प सुरू केला. आयफोन-11चे उत्पादन सुरू केले आहे. देशात प्रथमच ऍपलने “टॉप ऑफ द लाइन मॉडेल्स’ बनवण्यास सुरुवात केली आहे. त्यापूर्वी गेल्यावर्षी या कंपनीने आयफोन-एक्सआरची जुळणी करण्याचे काम भारतात सुरू केले होते.
2016 साली ऍपलने बंगळुरूमध्ये आयफोन-एसीचे उत्पादन सुरू केले. लवकरच तेथे आयफोन-एसई2020चे उत्पादन सुरू केले जाणार आहे. फॉक्सकॉन ही कंपनी ऍपलची प्रमुख पुरवठादार आहे. ती भारतात एक अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करून, आयफोन मॉडेल्सच्या जुळणीची क्षमता वाढवणार आहे. ‘मेक इन इंडिया’च्या दृष्टिकोनातून काही पावले पडत असतील, तर त्यांचे स्वागतच केले पाहिजे.
भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाची स्मार्टफोन बाजारपेठ आहे. तसेच मोबाइल उत्पादन करण्यात भारताचा जगात दुसरा नंबर आहे. मात्र, मोबाइलबरोबरच एअर कंडिशनर्स, ध्वनी सामग्री, रेफ्रिजरेटर्स, टेलिव्हिजन संच आणि धुलाई यंत्रांचे देशांतर्गत उत्पादन नजीकच्या भविष्यकाळात वाढेल, असा अंदाज आहे. 2025 पर्यंत या वस्तूंचे उत्पादन सध्या जे 76 हजार कोटी रुपये इतके आहे, ते दीड लाख कोटी रुपयांपर्यंत जाईल, असा अंदाज आहे.
फॉक्सकॉन आणि विस्ट्रॉन या तैवानी कंपन्या भारतात ऍपलसाठी फोन बनवतात. तसेच पेगाट्रॉन ही आयफोनची कंपनी लवकरच येथे उत्पादन सुरू करणार आहे. लाव्हा, पॅडजेट इलेक्ट्रॉनिक्स, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज आणि सोजो मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस या भारतातील स्मार्टफोनमधील बड्या उत्पादक कंपन्या. गेल्या दहा वर्षांत भारतातील मोबाइलचे उत्पादन वाढत आहे. पण मुख्यतः इथे जुळणीचेच म्हणजे असेंब्लिंगचे काम चालते.
अर्थात, फोन चार्जर्स आणि इतर ऍक्सेसरीजही इथे बनतात. भारत सरकारने उत्पादनसंलग्न प्रोत्साहन योजना सुरू केली आहे. त्यामुळे स्मार्टफोनसाठी कॅमेरा मॉड्यूल्स, वेफर्स (एक तांत्रिक घटक) व स्मार्टफोनचे अन्य घटक बनवण्यास चालना मिळणार आहे. भविष्यकाळात भारतात हायएंड फोन्सची निर्मिती व्हावी, असे आपले स्वप्न आहे. मात्र, भारतात हायएंड फोन्सची मागणी अजूनही मर्यादितच आहे. त्यामुळे तेथील बरेचसे उत्पादन निर्यात करावे लागेल. विदेशी कंपन्या भारतात सेमिकंडक्टर फॅब्रिकेशन इतक्यात सुरू करतील, अशी चिन्हे नाहीत. इलेक्ट्रॉनिक्समध्ये चीनची मक्तेदारी आहे. भारतातील इलेक्ट्रॉनिक कंपन्यांना चीनकडूनच कच्चा माल व सुटे भाग आणावे लागतात.
चीनच्या माजोरीपणामुळे अनेक देशांना त्याच्यावरील अवलंबन कमी करायची इच्छा आहे. अशा देशातील इलेक्ट्रॉनिक व मोबाइल कंपन्या भारताकडे वळण्याची शक्यता आहे. अर्थात केवळ चीनच नव्हे, तर या क्षेत्रात व्हिएतनाम, इंडोनेशिया, मलेशिया आणि तैवानशी भारताची स्पर्धा आहे. जगामधील मोबाइलच्या वापरात भारताचे नाव अग्रभागी दिसेल; परंतु मोबाइलच्या उत्पादनात भारत आजवर तरी मागेच राहिला आहे. काही वर्षांपूर्वी मॅक्स मोबाइल कम्युनिकेशन कंपनी मोबाइल ऍक्सेसरीजकडून मोबाइल उत्पादनाकडे वळाली.
परदेशांतून मोबाइल भारतात येतात, तेव्हा वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांची किंमत फुगत जाते. भारतातच उत्पादन झाल्यामुळे इतर खर्च कमी होऊन, मोबाइलची किंमत कमी होईल, या हिशेबाने कंपनीने गुरगाव येथे उत्पादन सुरू केले. दोन वर्षांपूर्वी नवी दिल्लीत सॅमसंग कंपनीच्या जगातील सर्वात मोठ्या कारखान्याचे उत्पादन नोएडा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे इन यांच्या उपस्थितीत झाले.
सॅमसंगच्या या कारखान्यात मोबाइलबरोबरच फ्रिज, टीव्ही व अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे उत्पादन सुरू झाले. सॅमसंगने 1990च्या दशकात भारतात पहिले इलेक्ट्रॉनिक उत्पादन केंद्र सुरू केले. 1997 पासून तेथे टीव्ही बनू लागले आणि 2005 पासून मोबाइल. अलीकडे कंपनीने तेथे सुमारे पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून, त्यामुळे तेथे जे सहा कोटी मोबाइल तयार होत होते, त्याची संख्या आता बारा कोटींवर गेली आहे. यामुळे जवळपास 70 हजार लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
भारत आता जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा उत्पादक देश बनला आहे. आतापर्यंत देशात 300 मोबाइल कारखाने सुरू झाले आहेत. 2014 मध्ये देशात सहा कोटी स्मार्टफोन तयार करण्यात आले होते, तेव्हा केवळ दोन मोबाइल कारखाने भारतात होते आणि मोबाइल उत्पादनाची उलाढाल तीन अब्ज डॉलर्स इतकी होती. हाच आकडा आता तीस अब्ज डॉलर्सच्या पार जाऊन पोहोचला आहे. शाओमीचे 99 टक्के फोन भारतात तयार होत आहेत. कंपनीने पाच वर्षांपूर्वी येथे मोबाइल कारखाना उभारला. आता भारतात तयार होणाऱ्या फोनमधील 65 टक्के भाग स्थानिक पातळीवरच विकत घेतले जात आहेत.
लाव्हा या कंपनीने चीनमधील आपला व्यवसाय गुंडाळण्याचा निर्णय घेतला आणि ती भारतात आली. भारतात 800 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय तिने घेतला. उत्पादन डिझाइन करण्याच्या क्षेत्रात लाव्हाचे चीनमध्ये 650 कर्मचारी होते. हे काम त्यांनी भारतात हलवले. आता भारतातून आपले मोबाइल चीनला निर्यात करावेत, असे कंपनीचे स्वप्न असल्याचे लाव्हा इंटरनॅशनलचे अध्यक्ष हरिओम राय यांनी म्हटले आहे. तसे घडल्यास, ती खूपच आनंददायक बाब म्हणावी लागेल. भारतीय कंपन्या यापूर्वीपासूनच चीनला मोबाइल चार्जरची निर्यात करत आहेत.
विशेष म्हणजे, जगातील आघाडीच्या 22 मोबाइल कंपन्यांनी भारतात उत्पादन करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव दाखल केला आहे. या कंपन्या मोबाइलसंबंधी 15 हजारांपेक्षा अधिक उत्पादने भारतात तयार करणार आहेत. या कंपन्यांनी भारतात उत्पादन सुरू केल्यानंतर तीन लाख प्रत्यक्ष आणि नऊ लाख अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील. वाहन व इलेक्ट्रॉनिक्स किंवा मोबाइलसारख्या क्षेत्रात प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असते. त्यामुळे या कंपन्यांना यथायोग्य पायाभूत सुविधा पुरवून पोषक वातावरण निर्माण करणे, हे सरकारचे काम आहे.