सध्या जगभर सर्वत्र चर्चेत असलेला प्रश्न म्हणजे करोना विषाणूचा संसर्ग. सोशल मीडिया असो किंवा टेलिव्हिजन, सर्वत्र एकच चर्चा… आजचा आकडा किती? या देशाचा? त्या देशाचा? आपल्या राज्याचा आणि आपल्या शहराचा? पण खरंच जास्त महत्त्वाचं काय आहे? हे आकडे, की दुसरंच काहीतरी… जे कदाचित आपल्याला उमगलं नसेल…
खरंतर या विषयावर लिहिण्याचं कारण म्हणजे एक डॉक्टर म्हणून, जेव्हा मी हा आजार, त्याचे सामाजिक आणि वैद्यकीय परिणाम आणि समाजातील विविध स्तरांतून येणाऱ्या सामाजिक प्रतिक्रिया यांचं अवलोकन केलं तेव्हा मला काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. एकीकडे हृदयविकाराचा झटका आलेला असताना, केवळ कोविडच्या भीतीने रुग्णालयामध्ये न गेल्यामुळे जीव गमावलेला रुग्ण आम्हाला दिसतो, (ज्याला वाचवणं कदाचित शक्य होत) आणि दुसरीकडे मला घरी जाताना सर्वच दुकानांसमोर परस्परांमध्ये योग्य अंतर न ठेवता, गर्दी करणारे ग्राहक दिसतात. समाजामधील कोविड विषयीच्या प्रतिक्रियेतील हा विरोधाभास मला माझ्या जनजागृतीच्या सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देऊन गेला, म्हणून हा लेखनप्रपंच…
मला प्रामाणिकपणे असं वाटतं की, या लढ्यात यशस्वी व्हायचं असेल, तर ते फक्त प्रशासन, डॉक्टर्स व वैद्यकीय यंत्रणा यांच्या हातात नसून, एक सूज्ञ समाज म्हणून आपण या परिस्थितीत कसे वागतो, ती कशी हाताळतो यावर खूप मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. कुठेतरी, एका परिपक्व व संतुलित सामाजिक वर्तणुकीची नितांत गरज आहे, करोनाशी यशस्वीपणे लढण्यासाठी.
आतापर्यंत जे वैयक्तिक जीवनशैलीशी निगडीत आजार होते जसे की, हृदयविकार, मधुमेह, स्थूलपणा, रक्तदाब यात आपण भारतीय जगभरात अग्रेसर होतो. वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती व डॉक्टर्स यांच्यामुळे अद्ययावत उपचार पद्धतीने आपण बहुतांशी यावर यशस्वी उपचार करू शकत होतो.
मात्र, करोनाचं चित्र यापेक्षा फारच वेगळं आहे. हा एक संसर्गजन्य आजार आहे, इथे आपल्या वैयक्तिक स्वच्छतेमुळे व सामाजिक वागणुकीमुळे केवळ आपलेच नाही, तर समाजाचे, देशाचे, पर्यायाने कदाचित जगाचे भवितव्य बदलणार आहे. एक व्यक्ती नाही तर एक समाज म्हणून आपली भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणूनच, आपल्याला आपली जबाबदारी समजून घ्यायला हवी. आपल्या व देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर सुसज्ज सेना आहेच, अगदी आपला जीव पणाला लावून. पण तुम्ही आम्ही विनाकारण बाहेर पडू नये. एकमेकांत अंतर ठेवावे, हे सांगण्यासाठी पोलीस दलाला आपले प्राण धोक्यात घालून उभे राहायला आपण भाग पाडणार आहोत का? की वरचेवर परिस्थितीचे गांभीर्य समजून पोलीस असो अथवा नसो, लॉकडाऊन असो अथवा नसो, आपण स्वतःच शिस्त पाळणार आहोत?
करोनाच्या बाबतीत सामाजिक वर्तणूक महत्त्वाची आहे. हा अगदी नवीन विषाणू असल्यामुळे, आपल्याकडे असलेले वैज्ञानिक ज्ञानही काहीसे अपुरे आहे. रोज नवनवीन तथ्ये समोर येत आहेत, जगभरातील डॉक्टर्स एकमेकांच्या संपर्कात असून अनुभवांची देवाणघेवाण करत आहेत. योग्य उपचार करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. अगदी स्वतःचा व कुटुंबाचा जीव धोक्यात घालून. प्रतिबंधक लस निर्माण करण्यासाठी संशोधन चालू आहे. थोडक्यात, उपचार व त्यांच्या यशाबद्दल मर्यादा आहेत. मग आपल्या हातात एकच परिणामी अस्त्र आहे. ते म्हणजे आपलं वागणं.
आता करोनाबद्दलची एक जमेची(?) बाजू… सद्यस्थितीत आपल्याला हा आजार कसा होतो, त्याचा प्रसार कसा होतो व प्रसार रोखता कसा येतो याबद्दलची मात्र पुरेशी माहिती आहे. म्हणजे, आपण एक जबाबदार नागरिक व समाज म्हणून जे योगदान द्यायचं आहे ते फार कठीण आहे का? कदाचित ते फारच सोपं आहे, पण आपल्याला मनापासून पटलं तर!
आपण सर्वांनी स्वयंशिस्त लावावी-
1) मी नितांत गरज असल्याशिवाय घराबाहेर पडणार नाही.
2) प्रत्येक वेळी स्वतःला एक प्रश्न विचारा, हे नाही केलं तर चालणार आहे का?
3) ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया व लहान मुलं यांना अनावश्यक घराबाहेर पडू देणार नाही.
4) रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योग्य आहार, फळे याचे सेवन करेल.
5) मानसिक स्वास्थ्य जोपासण्यासाठी व्यायाम, प्राणायाम, ध्यान, स्तोत्रपठण (ऐच्छिक) किंवा संगीत या गोष्टी करेल.
6) आप्तेष्टांना प्रत्यक्ष भेटणं टाळेल (सोशल मीडिया व ऑनलाइन पर्याय आहेतच)
7) बाहेर पडणे अनिवार्य असेल तर सॅनिटायझर, हात धुणे, मास्क वापरणे, योग्य अंतर पाळणे याचं कटाक्षाने पालन करेल.
8) योग्य त्या वेळी रुग्णालयामध्ये जाण्यास घाबरणार नाही.
9) संसर्गाचे लक्षणं असतील तर ती डॉक्टर व इतर संपर्कातील व्यक्ती यांच्यापासून लपवणार नाही.
10) स्वावलंबी बनेल. स्वतःची शक्य तितकी कामं स्वतः करेल.
प्रत्येक नागरिकाने या स्वयंशिस्तीच्या दशसूत्रीचा अवलंब केल्यास पोलीस, प्रशासन व वैद्यकीय यंत्रणेवर बोजा पडू न देता आपण यशस्वीपणे करोनाचा प्रतिकार करू शकू व टप्प्याटप्प्याने सर्व व्यवहार व पर्यायाने अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचा प्रयत्न करू शकू. सगळ्यात महत्त्वाचे, हे सारं कधीपर्यंत? लॉकडाऊन संपेपर्यंत? नाही, ही एक सवयच अंगी लावावी लागेल. कारण सुधारित जीवनशैली व करोना यांच्यासह मार्गक्रमण करणे आपल्याला क्रमप्राप्त आहे.
– डॉ. क्षमा देवशटवार-उपलेंचवार