– हेमंत देसाई
राहुल यांच्यापेक्षा प्रियंकांचे अपील अधिक असून, त्यात एक भावनिकता व ओलावा आहे, असे दिसते. दोघांच्या शैलीत सूक्ष्म फरक असून, अद्यापही भाजपला गांधी परिवाराची भीती वाटते, हे नाकारता येणार नाही.
सध्या निवडणूक प्रचार जोरात सुरू आहे. पंतप्रधान, जे. पी. नड्डा, अमित शहा, राजनाथसिंग यांचे झंझावाती प्रचार दौरे सुरू आहेत. दुसरीकडे देशातील करोनास्थिती हाताळण्यात केंद्र सरकारला अपयश आले असून, राज्यांना लसींचा अपुरा पुरवठा करण्यात आला आहे, अशी टीका कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एका बैठकीत केली. कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, पंजाबचे मुख्यमंत्री अमरेंद्र सिंग आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे या बैठकीस उपस्थित होते. बघेल यांनी आसामच्या निवडणूक प्रचाराची सूत्रे प्रभावीपणे सांभाळली आहेत. याउलट, सोनियाजींना लेटरबॉम्ब पाठवणाऱ्या नेत्यांपैकी अनेकजण निवडणूक प्रचारापासून दूर आहेत वा त्यांना दूर ठेवण्यात आले आहे. आसाम, केरळ, तामिळनाडू, पुद्दुच्चेरी येथील प्रचारात राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांनी अक्षरशः तुफानी प्रचार केला. एक दिवसाचीही विश्रांती न घेता, राहुल इकडच्या राज्यातून तिकडच्या राज्यात फिरत होते.
इतके दिवस उत्तर प्रदेश पुरतेच आपले कार्य सीमित ठेवणाऱ्या प्रियंका यांनी आसाम व केरळात जबरदस्त प्रचार केला. अर्थात त्यानंतर पती रॉबर्ट वढेरा यांना करोना झाल्यामुळे प्रियंका यांना विराम घ्यावा लागला. पूर्वी जेव्हा जेव्हा लोकसभा वा विधानसभा निवडणुका होत, तेव्हादेखील हे बहीण-भाऊ प्रचारात उतरत असत. परंतु यावेळी त्यांना केवळ भाजपचाच सामना करायचा नाही, तर स्वपक्षातील विरोधकांनाही उत्तर द्यायचे आहे. आम्ही पक्षाला यश मिळवून देऊ शकतो, तेव्हा आमच्या नेतृत्वावर संशय घेऊ नका, हे या दोघांना दाखवून द्यायचे आहे.
मात्र विशेष म्हणजे, पश्चिम बंगालमध्ये राहुल वा प्रियंका गेलेले नाहीत. प. बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशीच लढाई दिसत आहे. तेथे कॉंग्रेस, डावी आघाडी, अब्बास सिद्दीकी यांचा आयएसएफ यांचा संयुक्त मोर्चा अस्तित्वात आला आहे. त्यासाठी जितिनप्रसाद, अधीररंजन चौधरी, प्रदीप भट्टाचार्य व बी. पी. सिंग हे राज्यातील नेते प्रचार करत आहेत. राहुल हे प्रचारात येतील, येतील असे हे नेते सांगत आहेत. प. बंगालातील निवडणूक आठ टप्प्यांत आहे आणि त्यापूर्वी आसाम, तामिळनाडू, केरळ व पुद्दुच्चेरीमधील मतदान पूर्ण होणार आहे.
अद्याप 17, 22, 26 आणि 29 एप्रिल असे चार टप्पे व्हायचे आहेत. मात्र या काळात राहुल व प्रियंका जरी प्रचारास आले, तरी त्यांचा प्रचार मर्यादितच असण्याची शक्यता आहे. कदाचित तृणमूलला पोषक भूमिका घेण्याचीदेखील कॉंग्रेसची भूमिका असू शकते. प. बंगालमधील भाजपविरोधी मते पूर्णतः तृणमूल कॉंग्रेसकडे वळताना दिसत असल्यामुळे, भाजपने आता कॉंग्रेसला टार्गेट करण्याचे ठरवले आहे. खऱ्या अर्थाने तिरंगी लढत झाली, तरच त्याचा भाजपला फायदा होईल, असे आडाखे यामागे आहेत.
केरळ आणि आसाममधील मतदान 6 एप्रिलला पूर्ण झाले. या दोन्ही राज्यांवर प्रियंकाने लक्ष्य केंद्रित केले होते. कधी साडीत, तर कधी कुडत्यामध्ये प्रचार करत अनेक लोकांच्या घरी जाऊन भेटी घेतल्या. त्यांच्याकडे भोजन घेतले. आसाममधील चहामळ्यात जाऊन चहाची पानेही खुडली. आसामात आदिवासींबरोबर नृत्य केले. केरळमधील अनाथालयात जाऊन लहान मुलांशी त्या खेळल्यादेखील. प्रचंड सभांमध्ये आक्रमकपणे भाषण देणे प्रियंकांना लीलया जमते. परंतु त्याचबरोबर लहान मुले, स्त्रिया, वृद्ध व्यक्ती यांच्यातही त्या सहजपणे मिसळून संवाद साधू शकतात, अशी माहिती कॉंग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुष्मिता देव यांनी दिली. माझ्या मते, आजी इंदिरा गांधी आणि प्रियंका यांच्यात दिसण्यापलीकडे जे महत्त्वाचे साम्य आहे, ते म्हणजे प्रभावी संवादकौशल्य. केरळमध्ये तर प्रियंका यावेळी प्रथमच गेल्या. परंतु पहिल्याच वेळी त्यांनी आपल्या उत्स्फूर्त आणि जिवंत अस्तित्वामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला.
गुवाहाटीमधील कामाख्या मंदिर, तसेच अट्टुकल देवळाला भेटी देऊन त्यांनी आपणही सश्रद्ध हिंदू आहोत, असे संकेत दिले. दलित, आदिवासी, मुस्लीम तसेच महिलावर्गात इंदिरा गांधी लोकप्रिय होत्या. प्रियंका यांनाही हीच परंपरा जतन करायची आहे आणि त्याचवेळी कॉंग्रेस हिंदुविरोधी असल्याचा शिक्काही पुसून टाकायचा आहे. मात्र “केवळ फोटो काढून घेण्यासाठी चहामळ्यांना भेटी द्यायच्या, गरीब व्यक्तीला आलिंगन द्यायचे हे ढोंग इंदिरा गांधी व राजीव गांधींपासून सुरू आहे. गांधी परिवाराच्या या चलाखीला लोक बळी पडणार नाहीत’, अशी टीका सिलचर येथील भाजपचे खासदीर राजदीप रॉय यानी केली आहे. भाजप गांधी परिवारावर टीका करत आहे, याचाच अर्थ या परिवाराचा प्रभाव काही प्रमाणात तरी आहे, हेच दिसते.
आसामात प्रियंका यांनी “गामुसा’ परिधान केला आणि “जोइ आई आखोम’ (जननी आसामचा विजय असो) अशी त्रिवार घोषणा देऊनच आपल्या भाषणांना ठिकठिकाणी आरंभ केला. श्रीमंत संकरादेव आणि भूपेन हजारिका या आसामच्या बड्या हस्तींचाही प्रियंकांनी सर्वत्र उल्लेख केला. या कामगारांना दररोज 365 रुपये वेतन तसेच पाच लाख सरकारी नोकऱ्या उपलब्ध करून देणे, ही आश्वासने प्रियंकांनी दिली. केरळमध्ये मोदी यांनी प्रचारात बायबलचा उल्लेख कला. तेव्हा झाशी येथे रेल्वेमध्ये ख्रिस्ती भगिनींना जो त्रास देण्यात आला, त्याबद्दल मोदी यांनी एक शब्दही का उच्चारला नाही, असा सवालही प्रियंका यांनी केला. राहुल यांचा प्रचार मोदींवर आक्रमक हल्ला चढवणारा, तर प्रियंका यांची शैली सौम्य. हास्यविनोद करत बोलणे आणि त्यात उपरोधही ठासून भरलेला असतो.