शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिला शेतकऱ्यांना धीर
नांदेड : अवकाळी पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना झोपडून काढले आहे. या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून बळीराजा पुन्हा एकदा चिंतेत आला आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी शिवेसना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे मंगळवारी नांदेड दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यासाठी जानापुरी येथे आले असता येथील शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या.
उध्दव ठाकरे यांनी जानापूर येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. थेट शेतीच्या बांधावर जाऊन त्यांनी नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. ‘शेतकऱ्यांनी आता रडायचं नाही तर लढायचं’, असा सल्ला त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला. तसेच शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शिवसेना तालुक्याच्या ठिकाणी मतकेंद्र उभारणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जानापूर येथील पाहणी दौऱ्यानंतर उध्दव ठाकरे लोहा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी दाखल झाले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, जयदत्त क्षीरसागर उपस्थित आहेत.
मागील 15 दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेल्या पिकाचे ओल्या दुष्काळामुळे नुकसान झाले आहे. नांदेडमधील सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर यांसारक्या पिकाचे नुकसान झाले आहे.
शेतामध्ये पाणी साचल्यामुळे पिके सडली आहेत, पिकांवर बुरशी चढली आहे. आधीच दुष्काळामुळे हैराण झालेल्या शेतकऱ्याने मोठे कष्ट करुन लावलेले पीक ओल्या दुष्काळामुळे नष्ट झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.