माळेगाव कारखान्याच्या उच्चांकी दराबाबत बचाव कृती समितीची टीका
बारामती – राज्यात सर्वाधिक दर देण्याचा विक्रम माळेगाव सहकारी साखर कारखान्यांनी केला आहे, असा डांगोरा माळेगावचे सत्ताधारी पिटत आहेत. वास्तविक कारखाना कर्जबाजारी करून हा दर देण्यात आला आहे. कारखान्याची आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सत्ताधाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे, त्यामुळे हा उसाचा दर नसून इलेक्शन दर असल्याची खरमरीत टीका करून 3 हजार 600 रुपये प्रति टन दराची मागणी राष्ट्रवादीच्या माळेगाव सहकारी साखर कारखाना बचाव कृती समितीने केली आहे.
उसाला प्रति टन 3 हजार 400 रुपये दर देऊन माळेगाव सहकारी साखर कारखाना राज्यात उच्चांक केला आहे, असे असले तरी केवळ आकड्यांचा खेळ करून उच्चांकी दर दिल्याचा बनाव माळेगावच्या सत्ताधारी मंडळींनी केला असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.
माळेगाव कारखान्याने आधुनिकीकरण व विस्तारीकरणाद्वारे सुमारे 200 कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. गाळपक्षमता 4 हजारवरून 7500 टन प्रतिदिन वाढविलेली आहे. कारखान्याच्या आर्क शाळेची ही विस्तारवाढ करुन जुना प्रकल्प भंगारात काढला.
वीजनिर्मिती प्रकल्पात देखील वाढ करुन तो आता 35 मेगावॅट इतका झाला आहे. हे विस्तारीकरण केल्यानंतर सभासदांना दरवाढ होईल, अपेक्षा होती. मात्र, माळेगावने 3 हजार 400 रुपये भाव देऊन ऊस उत्पादक सभासदांचा अपेक्षाभंग केला आह, असा आरोप विरोधकांनी केला.
बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने 3 हजार 300 रुपये भाव दिला आहे. सोमेश्वर पेक्षा माळेगाव शंभर रुपये भाववाढ केली आहे.आधुनिकीकरण,विस्तारीकरण वीजप्रकल्पामध्ये केलेली वाढ व त्यासाठी केलेला प्रचंड खर्च यामुळे सभासदांना 3600 रुपयांपेक्षा अधिक भाव मिळण्याची अपेक्षा होती, ती फोल ठरली असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. सोमेश्वर कारखान्याने एकुण 10 लाख 4 हजार टन हा 100 टक्के ऊस वेळेत गाळप केला. त्या संपुर्ण टनेजला 3300 रुपये दर दिला. वेळेत गाळप केल्यामुळे सभासदांना प्रतिएकर 41 टन एवढे उत्पादन मिळाले. त्यापासुन एकरी 1 लाख 35 हजार तीनशे रुपये प्रति एकरी उत्पन्न मिळाले.
माळेगाव कारखान्याने एकुण 10 लाख 72 हजार टन गाळप केले. 3 लाख 58 हजार टन ऊसासाठी 2850 रुपये इतकाच भाव दिला आहे. 1001 या जातीचे 15 हजार 91 टन, 8005 या जातीचा 25 हजार 803 टन ऊसास वाढीव 100 रुपये अनुदान देण्यात आले आहे. तसेच फक्त दोन लाख 26 हजार 451 टन खोडव्यास 150 रुपये अनुदान देण्यात आले आहे. माळेगावचा हंगाम इतर कारखान्यांच्या तुलनेत 2 महिने उशीरापर्यंत चालल्यामुळे सभासदांचा ऊस दुष्काळजन्य परीस्थितीत उशीरा गाळप झाल्याने एकरी 35 टन इतके उत्पादन मिळाले. त्यापासुन एकरी 1 लाख 19 हजार उत्पन्न मिळाले. सोमेश्वरपेक्षा 100 रुपये प्रमाणे एकरी 3500 रूपये जादा मिळाले असले तरी एकरी सहा टनाचे 3400 रुपये प्रमाणे 20400 प्रति एकरी नुकसान झाले असल्याचे माळेगाव सहकारी साखर कारखाना बचाव कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले, अशा प्रकरे आकड्यांचा खेळ करुन सोमेश्वरपेक्षा 100 रुपये जादा भाव दिला असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी कृती समितीचे मदनराव देवकाते, तानाजी कोकरे, योगेश जगताप, एस. एन. जगताप, अनिल जगताप, रमेश देवकाते, संजय देवकाते, किरण तावरे, सचिन सातव आदी उपस्थित होते.
तिसरी आघाडी काय म्हणते…
माळेगाव सहकारी साखर कारखान्याने उसाला प्रति टन 3 हजार 400 रुपयांचा दर दिला आहे. वास्तविक पाहता 3 हजार 800 रुपये दर देणे माळेगाव कारखान्याला शक्य होते. मात्र भ्रष्ट कारभारामुळे ऊस उत्पादक सभासदांना 3800 रुपये दर माळेगाव कारखाना देऊ शकला नाही. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन संचालक मंडळाने राज्यात विक्रमी दर दिल्याचा बनाव केला आहे, असा आरोप तीसऱ्या आघाडीचे कारखान्याचे सुरेश खराटे, रामदास आटोळे, अविनाश गोपने, विलास देवकाते, अविनाश देवकाते, लक्ष्मणराव जगताप, राजेंद्र बोरकर, यशवंत भोपळे यांनी केला आहे.
“माळेगाव’ला शोभत नाही…
माळेगाव सहकारी साखर कारखान्याने दिलेला 3 हजार 400 रुपयांचा भाव आम्हाला अमान्य आहे. राज्यात उच्चांकी दर देणे ही माळेगावची अनेक वर्षांची परंपरा आहे. गाळप क्षमता व इतर बायप्रॉडक्ट व कारखान्याचा एकंदरीत आवाका पाहता उत्पादक शेतकऱ्यांना 3 हजार 600 दर मिळणे अपेक्षित होते. मात्र, नियोजनशून्य कारभारामुळे सत्ताधारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हा दर देऊ शकले नाहीत. 3 हजार 400 रुपये दर देऊन राज्यात विक्रम केल्याची वल्गना केली जात असली तरी हा दर माळेगावच्या नावलौकिकाला शोभणारा नसल्याचे बारामती नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष योगेश जगताप यांनी म्हंटले आहे.