नवी दिल्ली: सुशांतसिंह राजपूत प्रकरणात बिहार आणि महाराष्ट्र सरकारमध्ये संघर्ष सुरु आहे. दरम्यान भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. सुशांत सिंग प्रकरणात महाराष्ट्र सरकार कोणालातरी वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे आणि या प्रकरणात लक्ष देत नाही, असा आरोप भाजप नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला आहे.
नारायण राणे म्हणाले, “सुशांतसिंह राजपूत यांनी आत्महत्या केली नाही. त्यांची हत्या झाली. महाराष्ट्र सरकार एखाद्याला वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. सरकारचे या प्रकरणात लक्ष देत नाही.
सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या आत्महत्याची पोलिसांनी चौकशी का केली नाही, माझ्या माहितीनुसार तिने आत्महत्या केली नाही, तर तिची देखील हत्या केली आहे. तिच्यावर बलात्कार करुन तिला मारण्यात आलं आहे. तिच्या गुप्तांगावर जखमा आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्या दृष्टीने तपास करायला हवा. सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलीस कोणाला वाचवतंय?, असा प्रश्न राणे यांनी उपस्थित केला.
बिहार सरकारने देखील या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची शिफारस केली आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली.
बिहारमध्ये याबाबत एफआयआर दाखल झाला. पण मुंबईत 50 दिवस झाले एफआयआर दाखल झाला नाही. आरोपी कोण आहे? हे अजून समोर आलेलं नाही. जगात मुंबई पोलिसांची ख्याती आहे, नामलौकिक आहे. पण 50 दिवसात सुशांतसोबत त्यादिवशी रात्री पार्टीला कोण होतं? त्यांना अटक का करत नाही? त्याला रुग्णालयात नेणारा माणूस दोन तासांनी येतो आणि सांगतो की, मी लटकताना पाहिलंय. तो ठराविक रुग्णवाहिकाच का बोलवतो? ठराविक रुग्णालयात का नेतो? सर्व संशयास्पद घटना असल्याचे नारायण राणे म्हणाले.
सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्ती ही त्याच्यासोबत राहायची. ती 9 तारखेला त्याला सोडून गेली. या प्रकरणातील प्रमुख व्यक्ती तीन-चार दिवसांपासून गायब झाली आहे. पोलिसांना याबाबत माहिती नाही. मुंबई पोलीस अज्ञात असतील, असं मला वाटत नाही. मंत्री असो किंवा कुणीही असो, निरपराध मुलींवर अत्याचार करुन त्यांचा खून करण्याचं या सरकारला लायसन्स दिलेलं नाही. रिया चक्रवर्तीला शोधून तिच्याकडून अधिकची माहिती घेणं आवश्यक असल्याचे नारायण राणे म्हणाले.
सुशांतच्या घराजवळ एक बंगला आहे. तिथे रोज काही मंत्री येतात. ते तिथे तीन तास काय करतात? 13 तारखेला ते तिथे जमले आणि तिथून सुशांतच्या घरी गेले. ज्याअर्थी जेवढा दबाव सरकार आणि पोलिसांवर येतोय, अधिकारी वाचवायचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांना मी सांगू इच्छितो, हे होऊ शकणार नाही. विरोधी पक्ष सक्षम आहे. तो अशा गोष्टी होऊ देणार नसल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.