सोलापूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा या दुकलीच्या हालचाली रशियाच्या धर्तीवर सुरु आहेत. ते दोघे देशाला मोडीत काढत आहेत, असा आरोप करतानाच ज्यांच्यावर आपण विश्वास टाकला होता त्या मोदींनीच केसाने गळा कापला. इतका निर्लज्ज पंतप्रधान पाहिला नाही, अशा शेलक्या शब्दांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी सायंकाळी सोलापुरात झालेल्या विराट जाहीर सभेत मोदी सरकारचा पंचनामा केला.
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांना लक्ष्य केले. “अच्छे दिन’ आणि विकासाच्या गप्पा मारणारे मोदी आणि शहा ही दोन नावे देशाच्या राजकीय क्षितिजावरून गेली पाहिजेत. मोदी आणि शहा हे देशाला हुकूमशाहीकडे घेऊन जात आहेत. त्यांनी शेतकरी आत्महत्या व बेरोजगारीचे आकडे लपविले आहेत. माध्यमांचीसुद्धा गळचेपी केली आहे. इतकेच नव्हे तर शहिद जवानांचे फोटो लावून भाषणे करण्यात येत असून शहिदांच्या नावाने मते मागत आहेत.
नोटाबंदीमुळे सुमारे 4 ते 5 कोटीहून अधिक लोकांना रोजगारावर पाणी सोडावे लागले आहे. देशभरातील नागरिकांनी संपूर्ण बहुमतात सरकार हातात देऊनही त्यांनी देशभरातील जनतेची घोर निराशा केली. मोदी आणि फडणवीस यांचे सरकार आल्यापासून सुमारे 14 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
इंदू मिलमधील जागेत बाबासाहेबांच्या स्मारकाची घोषणा केली. मात्र पाच वर्षात एक वीटही रचली नाही. तसेच मराठा आणि धनगरांसह अन्य समाजाच्या आरक्षणाबाबत सरकारकडून होत असलेल्या फसवणुकीबाबत ठाकरे यांनी खास ठाकरे शैलीत समाचार घेतला. शासनाने रोजगाराच्या माध्यमातून बेरोजगारांना काम दिल्यास प्रामुख्याने मराठा मुला-मुलींना नोकरीत प्राधान्य दिल्यास आरक्षणाची गरज भासणार नाही. मतांसाठी आरक्षणाच्या नावावर दोन समाजात भांडणे लावणे आणि आपली पोळी भाजून घेणे हा सरकारचा उद्योग आहे, असा आरोपही ठाकरे यांनी केला.
भाजप सरकार माझ्या जाहीर सभांच्या खर्चाचा हिशोब मागतोय. मात्र गेल्या साडेचार वर्षात मोदी सरकारने 4 हजार 880 कोटी फेक जाहिरातींवर केलेल्या खर्चाचा हिशोब कोण देणार, असा सवालही ठाकरे यांनी भाजपला विचारला. माझ्या खर्चाची चिंता त्यांनी करू नये, असेही ते म्हणाले.
डिजिटल हरिसाल गावचा गोपालकृष्ण व्यासपीठावर
भाजप सरकारने डिजिटल इंडियाच्या माध्यमातून हरिसाल हे गाव डिजिटल झाल्याचे दाखविले होते. या गावात ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून खरेदी व्यवहार केले जात असल्याचे व 24 तास वायफाय , एटीएम मशीन, मोबाईलचा वापर आदींवर फोकस करत गावातील एका तरुणाला जाहिरातीत दाखविले होते. या डिजिटल गावाची पोलखोल राज ठाकरे यांनी केली. या डिजिटल जाहीरातीमधील गोपाकृष्णाला चक्क व्यासपीठावर आणून हा तरुण नौकरीसाठी पुणे शहरात भटकंती करत असल्याचे निदर्शनास आले असता माणसे कार्यकर्त्यांनी त्याला माझ्या संपर्कात आणल्याचे सांगत मोदी सरकारच्या खोट्या डिजिटल योजनेचा पर्दाफाश केला.