मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मागे ईडीच्या चौकशीचा ससेमीरा लागला आहे. ईडीकडून तीनवेळा समन्स आल्यानंतरही देशमुख चौकशीला उपस्थित राहिले नाही. त्यातच ते काही दिवस नॉट रिचेबल होते. त्यामुळे ते अंडरग्राउंड झाल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र आता अनिल देशमुख यांनीच सर्वांसमोर येऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
अनिल देशमुख अंडरग्राऊंड आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. त्यानंतर देशमुखांचा एक विडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ‘ईडीने माझी 4 कोटींची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. माझा मुलगा सलील देशमुखने २०१६ मध्ये २ कोटी ६७ लाखांची जमीन घेतली होती, तिही जप्त करण्यात आली असून काही वृत्तपत्रांमध्ये ३०० कोटींची जमीन जप्त झाल्याचं सांगण्यात आलं आहे. हे निव्वळ गैरसमज पसरवण्याचं काम असल्याचं त्यांनी नमूद केलं’.
दरम्यान मला ईडीकडून समन्स आला आहे. याविरुद्ध मी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालय यावर जेव्हा निर्णय देईल, तेव्हाच मी ईडीला सामोरं जाणार असल्याचं देशमुख यांनी स्पष्ट केलं.
अनिल देशमुख यांच्या याचिकेवर आता न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. रविवारी देशमुख यांच्या घरावर ईडीने पुन्हा छापे टाकले होता.