जगभर कोरोनाने अक्षरशः धुमाकुळ घातला आहे आणि त्यांतच क्रीडा क्षेत्रातील असंख्य स्पर्धा ह्या आपल्या नियोजित कालावधीत आता नक्कीच होणार नाही हे जवळपास निश्चित झाले आहे. जगभरातील मोठ्या स्पर्धा संयोजकांनी अगोदरच याबाबतीत निर्णयही घेतले आहेत. स्पर्धा आयोजनासाठी झालेला खर्च पाहता हा निर्णय घेणे खरंच योग्य आहे का तर माझ्या मते जोपर्यंत हा धोका संपुर्णपणे जोपर्यंत टळत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारच्या स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि शिबिरे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलणे हे चांगले पाऊल म्हणावे.
प्रेक्षकांनी खचाखच भरलेली स्टेडियम, आपल्या देशांचे राष्ट्रगान, आकाशात उंचावणारा ध्वज हे प्रत्येकालाच आवडणारे चित्र आहे, मात्र ही संधी उपलब्ध करून देणाऱ्या आपल्या खेळाडूंना या अशा जोखमीच्या परिस्थितीत मैदानात उतरवणे आणि प्रेक्षक म्हणून आपण त्यांच्यातील क्रीडा गुणांचा मनमुरादपणे आनंद घेणे हे कोणत्याच परिस्थितीत सकारात्मक पाऊल ठरणार नाही. विविध खेळातील अनेक खेळाडु आपल्या निवृत्तीच्या उंबरठ्यावर असल्याने साहजिकच त्यांना खेळतांना पाहणे सर्व क्रीडाप्रेमींना आवडेल. मात्र सध्याचा धोका इतका घातक आणि गंभीर स्वरूपाचा आहे की त्यांची कल्पनाही करता येत नाही.
संयोजकांनी आपली आर्थिक त्रुट भरून काढण्यासाठी कोणत्याही प्रकारची जोखीम न स्वीकारता स्पर्धा आयोजित न करणे हीच यावेळी शहाणपणाची कृती ठरेल. स्पर्धेदरम्यान एखाद्या खेळाडूला छोटीशी दुखापत झाली तरी प्रेक्षक म्हणुन आपल्याला असह्य होते. विचार करा आपल्या डोळ्यासमोर आपले आवडते हे खेळाडु कायमचे आपल्यातुन निघुन गेल्यास ही पोकळी आपण कशी भरून काढणार? विचार करा आणि अजुनही ज्या स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या नाहीत त्या संयोजकांना विनंती करा शेवटी खेळाडु असतील तर आपल्याला खेळाचा आनंद घेता येईल अन्यथा नाही.
– अविनाश पाटील