मुंबई: पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमातील मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय कायम ठेवत राज्य सरकारची याचिका फेटाळली. त्यामुळे यंदाच्या पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमात मराठा आरक्षणानुसार प्रवेश होणार नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये निराशा पसरली आहे. या निर्णयानंतर मराठा विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. तर विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला दिले आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आज मराठा मोर्चाचे नेते आबासाहेब पाटील, विरेन पवार यांच्या नेतृत्वात मराठा विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण संचालकांना भेटले. यानंतर डॉ. तात्याराव लहाने, मराठा मोर्चाचे नेते आणि विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षा निवासस्थानी गेले.
त्याआधी प्रवेश प्रक्रिया झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश कायम राहावे अशी मागणी आबासाहेब पाटील यांनी केली होती. तर मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत तोडगा निघाला नाही तर आक्रमक आंदोलन केले जाईल, असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला.
सध्या प्रवेश प्रक्रिया थांबवली असल्याची माहिती डॉ. लहाने यांनी दिली आहे. जर निकाल आल्यावर सरकार तत्काळ प्रवेश रद्द करतं तर आता विद्यार्थ्यांसाठी काही निर्णय घेण्यासाठी तत्परता शासन का दाखवत नाही असा सवाल मराठा विद्यार्थ्यांनी केला. जे प्रवेश झालेले आहेत ते कायम राहावे, जर असं झालं नाही तर आम्ही जे काही करू त्याला शासन जबाबदार राहील, असा इशाराही विद्यार्थ्यांनी दिला आहे.
मराठा विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन त्यांनी विद्यार्थ्यांना दिले आहे. न्यायालयात सरकारी वकिलांनी राज्य शासनाची बाजू नीट मांडली नाही, असा आरोप यावेळी विद्यार्थ्यांनी केला. दरम्यान, कॅन्सलेशनची नोटीस तत्काळ रद्द करावी, अशी मागणी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे काही विद्यार्थ्यांनी केली. यावेळी एका विद्यार्थ्याने चंद्रकांत पाटील यांना फोनवरून आत्महत्या करण्याचा इशारा दिला.