मुंबई – करोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असताना राज्यात राजकारणही चांगलेच तापले आहे. सरकार चालवणे आणि सरकारला पाठिंबा देणे या दोन भिन्न बाबी असल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले होते. यावरून आता विरोधकांनी काँग्रेसवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींचे विधान दुटप्पीपणाचे आहे. काँग्रेस सत्तेसाठी लाचार झाली आहे, अशी टीका भाजप ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले कि, महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला निर्णय घेण्याचा अधिकार नाही. त्यामुळे जनाची नाही, मनाची असेल तर सत्तेबाहेर पडा, असा टोला त्यांनी लगावला आहे.
तसेच, काँग्रेस दोन्ही बाजूने ढोलकी वाजवत आहे. सत्तेत राहून मलीदा चाखण्याचं काँग्रेसचं काम सुरु आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे राज्यातील जनता हवालदिल झालेली असताना मंत्री गायब झाले आहेत. काँग्रेसचे मंत्री मुंबईत जावून का थांबलेत..? राज्याच्या अवस्थेला शिवसेना, राष्ट्रवादी सोबत काँग्रेसही तेव्हढीच जबाबदार असल्याचा आरोपही विखे पाटील यांनी केला आहे.
कोरोनाचे संकट निवारण्यात उद्धव ठाकरे सरकार अपयशी ठरलं आहे. राज्यातील जनता कोरोना संकटात होरपळी असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडायला तयार नाहीत. मुख्यमंत्री फेसबुकवरच संवाद साधतात. त्यामुळे सरकारचा कारभार यापुढे आता फक्त फेसबुकवर चालणार का?, असा खोचक प्रश्नही राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.