मुंबई – एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार मुळापासून हाललं आहे. शिंदे गटात सेनेचे ३९ आमदार असून याचाच दाखल देत विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बहुमत चाचणीची मागणी राज्यपालांकडे मंगळवारी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने देखील बहुमत चाचणीचाच निकाल दिला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अखेर राजीनामा दिला आहे.
उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं हे निश्चित झालं आहे. मात्र महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर सोशल मीडियावर उद्धव ठाकरे यांनी ज्या खेळीमेळीने राजीनामा दिला, त्याचं कौतुक होत आहे.
दरम्यान बंडखोर शिवसेना आमदारांकडून सातत्याने हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत बाहेर पडल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र हा मुद्दा सोशल मीडियावर खोडून काढण्यात येत असून हे ‘हिंदुत्व नव्हे तर ईडीत्व’ आहे, अशी टीका अनेकजण करत आहेत.
या व्यतिरिक्त अनेकांनी केंद्रीय संस्थांचाच हा विजय असल्याचा दावा केला आहे. तर प्रभातच्या जनमतमध्ये अनेकांनी उद्धव ठाकरे यांच्या कारभाराला १० पैकी १० गुण दिले आहे.
दुसरीकडे अनेकांनी देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करत पुढील कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या मागील अडीच वर्षातील संघर्षाचे अनेकांनी कौतुक केले आहे.