कुठे कर्मचारीच नाहीत, तर कुठे अर्धवट कामे
पुणे – शहरातील स्मशानभूमींच्या देखभाल दुरुस्तीसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येतात. पण, सोयी-सुविधा आणि नियोजनाअभावी अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. कुठे देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली महिनोनमहिने स्मशानभूमी बंद ठेवण्यात येत आहे, तर कुठे अपुरे कर्मचारी असल्याने अनेकदा स्मशानभूमीला टाळे लावून कर्मचारी गायब होत आहेत.
परिणामी, अंत्यविधीसाठी आलेल्या मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना इतरत्र स्मशानभूमी शोधण्याची वेळ येत असून अनेकदा स्मशानभूमीतच बाजूला जागा मिळेल तेथे अंत्यविधी करावे लागत असल्याची बाब समोर आली आहे. खराडी स्मशानभूमी आणि वडगाव बुद्रुक येथील स्मशानभूमीत अशा ढिसाळ कारभाराने मृतांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागल्याचे प्रकार नुकतेच उघड झाले आहेत.
या भागासाठीची ही प्रमुख स्मशानभूमी असून तिची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली होती. त्यामुळे, दोन वर्षांपूर्वी तिच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. त्यावेळी निधी आहे, की नाही याची वाट न पाहता तातडीची बाब म्हणून सुरू करण्यात आले. मात्र, आता हे काम अतिशय संथगतीने सुरू आहे.
त्यामुळे या ठिकाणी जागा मिळेल तेथे नागरिक अंत्यसंस्कार करण्यास प्राधान्य देत आहेत. या प्रकराबाबत अनेकदा स्थानिक नगरसेवकांकडून महापालिका आयुक्त, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर यांच्याकडे तक्रार करून या कामासाठी आवश्यक निधी तसेच तातडीने काम पूर्ण करण्याची विनंती करण्यात आली. मात्र, प्रत्येक वेळी केवळ आश्वासन दिले जात आहे. त्यात, पावसाळ्यात तर या ठिकाणी अनेकदा अंत्यविधी सुरू असतानाच पाऊस आल्याने अनेक मृतदेह अर्धवट जळाल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे पुढील पावसाळ्यापूर्वी तरी हे काम पूर्ण करावे, या मागणीसाठी आपणच चितेवर झोपून आंदोलन केल्याचे नगरसेवक जाधव यांनी या आंदोलनाबाबत सांगितले.
वडगाव ब्रदुक येथील स्मशानभूमीत दि. 2 मार्च रात्रीच्या वेळी कर्मचारी स्मशानभूमीतील डिझेल दाहिनीला कुलूप लावून गेल्याने एका कुटूंबास त्यांच्या नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी दोन तास ताटकळत थांबावे लागल्याचा प्रकार समोर आला आहे. त्या दिवशी वडगाव धायरी येथील एका 78 वर्षीय व्यक्तीचे सायंकाळी सहा वाजता निधन झाले. त्यानंतर त्यांच्या घरातील व्यक्ती मयतपास तसेच इतर सोपस्कर पूर्ण करून अंत्यविधीसाठी वडगाव पुलाजवळील स्मशानभूमीत रात्री 10 वाजता आले.
यावेळी तिथे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये एक अंत्यविधी सुरू होता. त्यामुळे या ठिकाणाच्या कर्मचाऱ्याकडे विद्युत दाहिनीबाबत विचारणा केली. त्यावेळी त्याने ती दुरूस्तीसाठी बंद असल्याचे सांगितले. हा प्रकार यावेळी उपस्थित असलेल्या काही व्यक्तींनी भाजपचे सरचिटणीस दीपक नागपुरे यांना कळवला. त्यानंतर नागपुरे यांनी स्मशानभूमीत येत कर्मचाऱ्याकडे विचारणा केली असता डिझेल दाहिनीचा कर्मचारी जेवायला गेल्याचे समजले.
त्यानंतर, कर्मचारी परत आल्यानंतर रात्री 12 वाजता या व्यक्तीचा अंत्यविधी करण्यात आला. त्यामुळे नातेवाईक दोन तास स्मशाभूमीतच होते. दरम्यान, हा प्रकार गंभीर असून याची तक्रार नागपुरे यांनी आरोग्य विभागाकडे केली आहे. तसेच, “महापालिकेने 3 शिफ्टमध्ये तातडीने आवश्यक असलेले कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत,’ अशी मागणी केली आहे.