पुणे -“राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील कोणावरही दबाव टाकण्याचा प्रश्नच नाही. उलट लोकांनी तुमच्या नजरेला घाबरून थांबायला पाहिजे. तेवढा तुमचा धाक पाहिजे. पण, आम्ही नजर टाकली, की लोक पक्षात येतात. भ्रष्टाचारी लोक घेणार नसून, विकासाच्यादृष्टीने जी महत्त्वाची त्यांनाच पक्षात घेणार आहोत,’ असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी सांगितले.
दरम्यान, राज्याचा मुख्यमंत्री भाजप, शिवसेना, आरपीआय, रासप, शिवसंग्राम, रयत संघटना अशा सर्वांच्या महायुतीचा होणार असून, “अब की बार 220 के पार’ आमदार निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राज्याचा मुख्यमंत्री हा महायुतीचाच असणार आहे. परंतु, देवेंद्र फडणवीस की आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणार या प्रश्नाला मात्र, तावडे यांनी बगल दिली.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा अंतिम टप्प्यात
तमिळ भाषेच्या याचिकेवर 2 वर्षे गेली. त्यामुळे मराठीला अभिजात दर्जा मिळण्यास विलंब होत आहे. ही फाईल साहित्य अकादमीकडे आली आहे. प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून मराठीला अभिजात भाषेचा लवकरच दर्जा मिळेल, असेही तावडे म्हणाले.