देवेंद्र फडणवीस यांची राज्य सरकारवर टीका
मुंबई : आम्ही बदल्याच्या भावनेने कधीही वागलो नाही. तीन महिन्यात या सरकारने एक काम अत्यंत प्रामाणिकपणे केले आहे. आतापर्यंत जी कामे सुरळीतपणे सुरू होती त्या कामांना स्थगिती देण्यातं काम सरकारने केले आहे. त्यामुळे हे प्रगती सरकार नसून स्थगिती सरकार असल्याची टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आम्ही सत्तेत आल्यानंतर जुन्या सरकारच्या चांगल्या योजनांना स्थगिती दिली नाही, उलट जनतेसाठी त्या सुरू ठेवल्या असेही ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे. या चर्चा असून यामध्ये तथ्य नाही असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ठ केले आहे. फडणवीस म्हणाले, मी मैदान सोडून पळणाऱ्यांपैकी नाही. या महाराष्ट्रात जोपर्यंत पुन्हा सरकार येत नाही तोपर्यंत मी महाराष्ट्र सोडून जाणार नाही. संघर्ष करून पुन्हा सरकार आणणार. जनतेने आपल्याला जागा दिल्या आहेत. हे जनतेने निवडून दिलेले सरकार नाही. लोकशाहीमध्ये जनतेच्या मनातल सरकार चालतं त्यामुळे हे सरकार फार काळ टिकणार नाही.
तीन पक्षाचे सरकारपूर्वी सांगितल्याप्रमाणे ऑटो रिक्षा सरकार आहे. हे तीन चाकाची सरकार वेगळ्या दिशेने काम करते. सरकार फार काळ टिकणार नाही. विरोधी पक्षात बसवून या सरकारला हलवण्याची आपल्यामध्ये ताकद आहे. एवढंच नाही तर शिवस्मारकाचं काम या सरकारने जाणीवपूर्वक थांबवलं असाही आरोप फडणवीस यांनी केला.
लोकशाहीची मूल्य या सरकारला मान्य नाहीत असंही त्यांनी म्हटलं आहे. आमच्या कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला तर आम्हीही रस्त्यावर उतरवू आणि तुम्हाला तुमची जागा दाखवून देऊ असा इशाराही फडणवीस यांनी दिला. एवढ्या लवकर सत्तेचा माज डोक्यात जाऊ देऊ नका असाही खोचक सल्ला फडणवीस यांनी दिला.