नवी दिल्ली : दिल्लीच्या उत्तर पूर्व भागात हिंसाचाराने कळस गाठला आहे. तेथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या आठ कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. त्यात शिघ्र कृती दलाच्या दोन आणि महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या एका पथकाचा समावेश आहे. जाफराबाद आणि मौजपूर भागात केलेल्या दगडफेकीत एका पोलिसांसह दोन जण मरण पावले तर 37 पोलिस जखमी झाले आहेत. या शिवाय सुमारे 20 नागरिक यात जखमी झाले असून त्यांपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर गुरू तेज बहादूर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
केंद्रीय गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी तेथे अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचा दावा केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी केला. जाफराबाद, सीलामपूर, मौजपूर, गौतमपुरी, भजनपूरा, चांद बाग, मुस्तफाबाद, वझीराबाद आणि शिवविहार या भागांत तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्लीत सोमवारी उफाळलेल्या हिंसाचरात एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झला. एका मुलाला वाचवताना हा कर्मचारी जखमी झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरू असताना जगप्रवेशचंद्र रूग्णालयात मृत्यू झाला. दरम्यान हिंसाचार उफाळलेल्या भागात जमावबंदी लागू करण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात आण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्यात आले आहे. दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी मुख्यमंत्री अरविंद केरजरीवाल यांनी गृहमंत्री अमित शहा आणि राज्यपाल अनिल बैजल यांच्याकडे केली आहे.
दिल्लीतील शांतता आणि सौहार्दाच्या वातावरणाला गालबोट लागल्याची अत्यंत दुर्देवी बातमी हाती येत आहे. कायदा आणि सुव्यवस्था पुनर्प्रस्थापित करणुयासाठी मी गृहमंत्री आणि राज्यपालांना गांभीर्याने विनंती करत आहे. कोणालाही कायदा हातात घेण्याची परवानगी देऊ नये असे ट्विट केजरीवाल यांनी केले आहे. दरम्यान पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, हवालदार महंमद सलीम हे एका मुलाला जमावापासून वाचवताना जखमी झाले. त्याची बोटे आणि मनगट प्रॅक्चर झाले होते. त्यांना सीलाम येथील जगप्रवेशचंद्र रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पोलिसांनी दुपारी एक निवेदन जारी केले. त्यात त्यांनी उत्तर पूर्व दिल्लीतील नागरिकांनी शांतता पाळावी. अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. तसेच समाजकंटकांवर आणि हिंसाचार भडकावणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असे त्यात म्हटले आहे.
सुधारीत नागरिकत्व कायद्या विरोधातील निदर्शक आणि या कायद्याचे समर्थक यांच्यातील चकमक दुसऱ्या दिवशी सुरूच राहिल्या. यात दोन घरे पेटवून देण्यात आली. दोन्ही गटांनी परस्परांवर तुफानी दगडफेक केली.