नवी दिल्ली : देशभरात थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढताना जाणवत आहे. त्यातच आता उत्तर भारताला थंडीने चांगलीच हुडहुडी भरली आहे. देशाच्या राजधानीत शनिवारी दिल्लीतील तापमान हे 6 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. तर आज सकाळी हवामान विभागाच्या वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत 4.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर कमाल तापमान हे 18 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
राष्ट्रीय राजधानीत निरभ्र आकाश आणि थंड वारे वाहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर राजस्थानमधील चुरुमध्ये उणे 1.1 तापमानाची नोंद झाली आहे. त्याठिकाणी बर्ष पडत असल्याचे चित्र दिसत आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये शनिवार हा हंगामातील पहिला ‘थंड दिवस’ होता. वायव्य वाऱ्यांमुळे शहरात किमान तापमान 6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. कमाल तापमान 17.8 अंश सेल्सिअस नोंदवले होते. जे सामान्यपेक्षा पाच अंशांनी कमी आणि हंगामातील सर्वात कमी तापमान आहे. जेव्हा किमान तापमान 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी असते आणि कमाल तापमान सामान्यपेक्षा किमान 4.5 अंश सेल्सिअसने कमी नोंदवले जाते तेव्हा तो थंड दिवस असल्याचे म्हटले जाते.
दरम्यान, सफदरजंगमध्ये सकाळी दाट धुक्यामुळे दृश्यमानता 1800 मीटरवर नोंदवण्यात आली आहे. याशिवाय डोंगरावरील बर्फवृष्टीचा परिणाम अनेक राज्यांवर होत आहे. उत्तर प्रदेशातही कडाक्याची थंडी आहे. त्याचबरोबर पंजाब, हरियाणा, बिहारमध्येही थंडी वाढली आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, दिल्लीत थंडीची लाट पाहता यलो अलर्ट ३ दिवस कायम राहणार आहे.