मुंबई -भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला घवघवीत यश मिळवून दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवसेनेकडून मुक्तकंठाने प्रशंसा करण्यात आली. जनमताचा कौल पाहता पुढील 25 वर्षे कुणीच मोदींचा सामना करू शकणार नाही, असे शिवसेनेने म्हटले.
लोकसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी येथे पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. संपूर्ण देश मोदीमय बनला आहे. मोदींचा सामना कुणीच करू शकत नाही हे वास्तव आता स्वीकारले जायला हवे. राफेल करारासारख्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी मोदी यांच्या विरोधात भ्रमाचे वातावरण निर्माण केले. मात्र, जनतेने विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
लोकशाहीत विरोधी पक्षांची गरज आहे. मात्र, जनतेने आपल्याला का नाकारले याचे आत्मचिंतन करण्याची गरज विरोधी पक्षांना आहे. बालेकिल्ल्यांत आपला पराभव का झाला? जनता आपल्याविषयी संतप्त का आहे, यावर त्यांनी विचार करावा, असेही राऊत म्हणाले.