94 वे नाशिक संमेलन : “डिजिटल प्रभात’च्या पाहणीचा निष्कर्ष
पुणे – कुंभनगरी नाशिक येथे यावर्षी होणार असलेल्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोण असतील याची उत्सुकता सर्वच मराठी जनांना आहे. यानिमित्त “डिजिटल प्रभात’ने केलेल्या पाहणीमध्ये निसर्गकवी ना. धों. महानोर आणि “पानिपत’कार विश्वास पाटील यांना वाचकांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. त्यानुसार वयोवृद्ध निसर्गकवी महानोरच संमेलनाध्यक्ष व्हावेत, असे एकंदरीत जनमत असल्याचे दिसून येत आहे.
करोना व्हायरसच्या फैलावामुळे कोविड-19 ची साथ जगभर आली आणि सर्वच कार्यक्रमांना सर्वत्र कात्री लागली. सुरुवातीला कडक लॉकडाऊन आणि नंतर अनलॉकच्या विविध फेऱ्या, यामधून साहित्य संमेलन तरी होणार की नाही, याबाबत अनिश्चितता होती. मात्र, औरंगाबाद येथे नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत आगामी 94 वे संमेलन नाशिक येथे घेण्याचा निर्णय झाला.
पूर्वी संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी असलेली वादग्रस्त निवडणूक प्रक्रिया आता होत नसल्याने, महाराष्ट्रातील आघाडीच्या साहित्य संस्था आणि राज्याबाहेरील सहयोगी संस्थांच्या 20 पदाधिकाऱ्यांची एक समिती संमेलनाध्यक्ष ठरवत असते. त्यानुसार प्रथम डॉ. अरुणा ढेरे आणि नंतर फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची अनुक्रमे यवतमाळ (2018) आणि उस्मानाबाद (2019) येथील संमेलनांच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. केवळ 1100 मतदार असलेली निवडणूकपद्धतीच मान्य नसल्याने अनेक नामांकित साहित्यिक या सन्मानापासून वंचित राहिले आहेत. आता संमेलनाध्यक्षांच्या निवड समितीने प्रख्यात निसर्गकवी, “पद्मश्री’ विजेते ना. धों. महानोर यांची निवड करावी, असे मराठीजनांना वाटते.
यासंदर्भात “डिजिटल प्रभात’ने केलेल्या सर्वेक्षणात पाच साहित्यिकांची नावे देण्यात आली होती. त्यामध्ये महानोरांव्यतिरिक्त “पानिपत’ या कादंबरीने प्रकाशात आलेले कांदबरीकार विश्वास पाटील, बेंगलुरू आणि जपान-अमेरिकेसारख्या अमराठी मुलुखात राहून संवेदनशील लेखन करणाऱ्या कथाकार सानिया अर्थात सुनंदा कुलकर्णी बलरामन, संमेलनाची निवडणूक याआधी लढवलेले कथाकार भारत सासणे तसेच साक्षेपी समीक्षक आणि कवयित्री डॉ. प्रभा गणोरकर अशी नावे देण्यात आली होती.
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या सन्मानात पती-पत्नींनी अध्यक्षपद मिळवण्याचा मान कवी अनिल अर्थात आत्माराम रावजी देशपांडे (1961 ग्वाल्हेर, 43 वे संमेलन)आणि कुसुमावती देशपांडे (2012 चंद्रपूर, 85 वे संमेलन) यांना मिळाला होता. डॉ. गणोरकर यांचे पती वसंत आबाजी डहाके हे यापूर्वी संमेलनाध्यक्ष (2012 चंद्रपूर, 85 वे संमेलन) झाले होते. त्यामुळे या विक्रमाची पुनरावृत्ती करण्याची संधी डॉ. गणोरकर यांना आहे.
साहित्य संमेलनाच्या इतिहासात आजवर पाचच महिलांना अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. त्यामध्ये कुसुमावती देशपांडे यांच्यानंतर दुर्गा भागवत (1975 कऱ्हाड, 51 वे संमेलन), शांता शेळके (1996 आळंदी, 69 वे संमेलन), डॉ. विजया राजाध्यक्ष (2001 इंदूर, 74 वे संमेलन) आणि डॉ. अरूणा ढेरे (2018 यवतमाळ, 92 वे संमेलन). हा विचार करता आता पुन्हा एकदा डॉ. गणोरकर अथवा सानिया यांना संधी मिळावी, असाही एक कल या चाचणीत दिसून आला.
कसबे, पठारेंसह अन्य नावांचाही विचार…
भारत सासणे आणि विश्वास पाटील यांची लोकप्रियता आणि त्यांचे मराठी साहित्यातील योगदानही निर्विवाद असल्याने त्यांच्या नावांनाही संमेलनाध्यक्षपदासाठी प्रतिसाद उत्तम मिळाला आहे. याशिवाय काही जणांनी डॉ. यशवंत मनोहर, डॉ. रावसाहेब कसबे, नाटककार महेश एलकुंचवार, रंगनाथ पठारे, डॉ. सुधीर रसाळ, “ज्ञानपीठ’ विजेते (साहित्य संमेलनांचे विरोधक) भालचंद्र नेमाडे, कथाकार आशा बगे यांच्यासह ललित लेखक श्रीनिवास विनायक कुलकर्णी तसेच प्रा. सुरेश द्वादशीवार यांचीही नावे वाचकांनी सुचवली आहेत.