- क प्रभागातील आधार केंद्रावर नागरिकांना त्रास : महापालिकेचे नियंत्रण नाही
– प्रकाश गायकर
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क प्रभाग कार्यालयामध्ये आधार नोंदणी व दुरुस्तीचे काम केले जाते. याठिकाणी आधारचे काम करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चालकाची नोंद करण्यात आली आहे. मात्र यावर स्थानिक स्वराज्य संस्थेला नियंत्रण ठेवण्याचा अधिकार नाही. परिणामी कोणाचेही नियंत्रण नसलेले केंद्रचालक बेफाम झाले आहेत. येणाऱ्या नागरिकांचा अपमान करणे, त्यांच्या अंगावर धावून जाणे, केंद्र बंद करण्याची धमकी देणे, नियोजनाचा अभाव असल्याने नागरिकांमध्ये नंबरसाठी आपसात वाद असे प्रकार सातत्याने घडत आहेत. अशा केंद्रचालकांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क प्रभागातील आधार केंद्रावर दररोज मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. या गर्दीवर महापालिका प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नसल्याने करोना विषयक सर्वच नियमांचे याठिकाणी सर्रास उल्लंघन केले जाते. क प्रभागातील केंद्रावर अनेक गोरगरीब नागरिक आधार कार्ड संदर्भात कामे घेऊन येतात. त्यामध्ये काही जणांना आधार नोंदणी करायची असते. तर काहींना आधारमध्ये दुरुस्ती करून हवी असते. माहितीअभावी नागरिक पुरेसे कागदपत्र घेऊन येत नाहीत. अशा नागरिकांना केंद्र चालकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. अनेक ज्येष्ठ नागरिकांना कागदपत्रांमधील गोंधळ लवकर समजून येत नाही. अशा नागरिकांनाही अपमानाचा सामना केंद्रावर करावा लागतो. त्यामुळे त्या नागरिकांना आधार नको पण अपमान आवर असे बोलण्याची वेळ येते.
हलायचे नाही, येथेच थांबा
ऑनलाइल अपॉईंटमेंट घेऊन आलेल्या नागरिकांना देखील निश्चित वेळेवर प्रवेश मिळत नाही. त्यांना देखील थांबावे लागेल, असा फलकच याठिकाणी लावण्यात आला आहे. अर्थात ऑनलाइन बुकींगलाही येथे वेटिंग आहे. त्याशिवाय अपॉईंटमेंटशिवाय येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असते. अशा नागरिकांना फॉर्मवर नंबर टाकून दिला जातो. परंतु फॉर्म घेतल्यावर तिथेच थांबायचे, बाहेर जायचे नाही, असा अघोषित नियम येथील चालकाने बनविला आहे.
कोणत्याही कारणास्तव जागा सोडल्यास नंबर जातो आणि नंबरसाठी अक्षरश: येथे नागरिकांमध्ये आपसात भांडणे होतात. सकाळी दहा वाजल्यापासून आलेल्या नागरिकांना येथे दिवसभर ताटकळत बसावे लागते. सोशल डिस्टन्सिंगचा तर पुरता फज्जा येथे रोज उडतो. लहान मुलांचे आधारकार्ड काढण्यासाठी येणाऱ्या आई-वडिलांचे येथे खूपच हाल होताना दिसत आहे. याबाबत क्षेत्रीय अधिकारी व केंद्र चालक कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. त्यामुळे चिमुकल्यांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
आधार नोंदणीचे कार्यालय जिल्हाधिकाऱ्यांमार्फत स्थापन केले जाते. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून महापालिकेला जागा देण्यासाठी सूचना येते. त्याप्रमाणे पालिका त्यांना जागा उपल्बध करून देते. मात्र ज्याठिकाणी जागा उपलब्ध करून दिली आहे तेथील प्रभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांचे त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे. जागा उपलब्ध करून दिल्यानंतर क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी त्यावर ओघाने नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. त्यामुळे नागरिकांना तक्रार करायचे म्हटले तरी ते तक्रार करू शकत नाही.
आधार केंद्रांची जबाबदारी आपल्याकडे नाही. जिल्हाधिकारी कार्यालयांकडून आपल्याला फक्त जागा उपलब्ध करून देण्याबाबत आदेश येतो. त्याप्रमाणे आपण त्यांना जागा उपलब्ध करून देतो. त्यांच्यावर आपले नियंत्रण नाही.
– आण्णा बोदडे, क्षेत्रीय अधिकारी “क’ प्रभाग
—
केंद्रावर गर्दी असल्याने काही बाबतीत होत असेल; मात्र कोणालाही काही अरेरावी केली जात नाही. अनेक केंद्रांमध्ये दिवसाला 30 ते 40 आधार नोंदणी केली जाते. “क’ प्रभागातील केंद्रावर दिवसाला 80 आधार नोंदणी केली जाते. नागरिकांमध्ये किरकोळ वाद सुरू असतात. यापुढे आम्ही सगळ्या बाबतीत खबरदारी घेऊ.
– विश्वनाथ शेटे, केंद्रचालक