दहावीनंतर बारावीच्या गुणपत्रिकेवरूनही “अणुत्तीर्ण’ शेरा हटणार
पुणे – दहावीच्या धर्तीवर आता बारावीच्या गुणपत्रिकेवरून अनुत्तीर्ण (नापास) हा शेरा हटवून त्याऐवजी “पुनर्परीक्षेस पात्र’ असा शेरा नमूद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. येत्या बारावीच्या निकालात गुणपत्रिकेवर अनुत्तीर्ण हा शब्द वापरण्यात येणार नाही, असेही शालेय शिक्षण विभगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे दहावीनंतर आता बारावीच्या गुणपत्रिकेवर नापासाचा शेरा हद्दपार होणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत बारावीची परीक्षा घेतली जाते. सध्या बारावीची परीक्षा सुरू आहेत. बारावीची परीक्षेतील यशापशावर विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक भवितव्याची दिशा ठरत असते. बारावी परीक्षेत बसणारा विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास, विद्यार्थ्यांच्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्यावर विपरित परिणाम होतो. त्यामुळे दहावीप्रमाणे बारावीच्या गुणपत्रिकेत अणुत्तीर्ण हा शब्द हटविण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा शासननिर्णय आज शालेय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केला आहे.
बारावीच्या गुणपत्रिकेत आता सुधारित शेरे दिसतील. विद्यार्थी नियमित परीक्षेतील सर्व विषयात उत्तीर्ण असल्यास त्याला उत्तीर्ण असा शेरा मिळेल. तसेच एक किंवा दोन विषयात अनुत्तीर्ण असल्यास पुनर्पपरीक्षेसाठी पात्र असा शेरा असेल. त्याचप्रमाणे बारावी फेरपरीक्षेतील विद्यार्थ्यांचा हाच शेरा दिला जाणार आहे. मात्र फेरपरीक्षेत तीन किंवा त्यापेक्षा अधिक विषयात अनुत्तीर्ण असल्यास, त्या विद्यार्थ्याला “कौशल्य विकास कार्यक्रमास पात्र’ असा शेरा दिला जाणार आहे.
बारावीच्या गुणपत्रिकेतील सुधारित शेरे
तपशील : सुधारित शेरे
नियमित परीक्षेतील सर्व विषयात उत्तीर्ण : उत्तीर्ण
एक किंवा दोन विषयात अनुत्तीर्ण : पुनर्परीक्षेस पात्र
त्यापेक्षा अधिक विषयात अनुत्तीर्ण : पुनर्परीक्षेस पात्र