पाणी प्रश्नाचे गांभीर्य नाही : शहरवासियांना फक्त आश्वासने
– प्रकाश गायकर
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहर नव्याने आकार घेत आहे. मोठ-मोठे प्रकल्प, प्रशस्त आणि चकचकीत रस्ते शहराच्या सौंदर्यात भर टाकत आहे. महामेट्रोसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारले जात आहेत. अलिशान टुमदार महापालिकेचे स्वप्न बघितले जात आहे. परंतु जीवनावश्यक असलेल्या पाण्यासाठी मात्र वणवण होत आहे. त्याबाबतीतच प्रशासन आणि राज्यकर्ते तत्परता का दाखवत नाही हा प्रश्न आहे.
कधी नव्हे ते बारा महिने पुरेल एवढा पाणीसाठा यंदा पवना धरणामध्ये झाला. त्यामुळे यावर्षी नागरिकांना दररोज समान पाणीपुरवठा होईल अशी अपेक्षा होती. मात्र आयुक्तांनी पाणीकपातीचा निर्णय घेत शहरवासियांचा अपेक्षाभंग केला. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणामध्ये मुबलक पाणीसाठा आहे. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून पवना धरणातून जलवाहिनीद्वारे पाणी शहरात आणण्याची योजना हाती घेण्यात आली आहे. मात्र हा प्रकल्प 2011 पासून रखडला आहे. त्यामुळे पाण्यासाठी पवना धरणावरच शहरवासियांना अवलंबून राहावे लागत आहे. या सगळ्या गोष्टींना राजकीय अनास्थेचे ग्रहण लागले आहे. जेएनएनयूआरएम अंतर्गत महापालिकेच्या वतीने पवना धरणातून पाणी आणण्याची योजना आखली.
परंतु मावळमधील शेतकऱ्यांनी याला विरोध केला. त्यामुळे त्यावेळच्या राष्ट्रवादी व कॉग्रेस सरकारच्या काळात या प्रकल्पाला गती मिळाली नाही. त्यानंतर 2014 मध्ये भाजपा-शिवसेनेचे सरकार राज्यात स्थापन झाले. त्यापाठोपाठ 2017 साली महापालिकेवरही युतीने झेंडा फडकावला. त्यामुळे विरोधी पक्षात असताना शहरातील भाजपा व शिवसेनेच्या नेत्यांनी लावून धरलेला पवना बंदिस्त जलवाहिनीचा मुद्दा आता आकार घेईल, असा समज शहरवासियांचा झाला. मात्र सत्तेत आल्यावर युतीच्या नेत्यांनीही कागदी घोडे नाचवत शहरवासियांच्या तोंडाला पाने पुसली. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीनंतर मोठ्या नाट्यमय घडामोडीनंतर शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस या तिघांचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले. आता भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप या मुद्यांवर अधिवेशनात लक्षवेधी मांडणार असल्याचे सांगत होते. सत्ता गेल्यावर शहाणपण येणे याच गोष्टीला म्हणत असावे.
आंद्रा, भामा आसखेडचा पर्याय
पिंपरी-चिंचवड शहराला मावळातील पवना धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो. पवना धरणातून महापालिका दररोज 480 एमएलडी पाण्याचा उपसा करते. शहराची लोकसंख्या सद्यस्थितीत सुमारे 27 लाखांच्या घरात आहे. आंद्रा धरणातून प्रतिदिन 100 दशलक्ष आणि भामा-आसखेड धरणातून प्रतिदिन 167 दशलक्ष लिटर असे एकूण 267 दशलक्ष लिटर पाणी पिंपरी-चिंचवड शहरासाठी 2014 मध्ये मंजूर करण्यात आले आहे. हे पाणी शहरवासियांना त्वरित मिळणे अपेक्षित होते. या मंजूर झालेल्या पाण्याचा फायदा शहरातील चिखली, मोशी, डुडुळगाव, दिघी या भागातील रहिवाशांना होणार होता. मात्र राजकीय इच्छशक्तीच्या अभावाने हा प्रकल्प फक्त कागदावरच राहिला. धरणांमधून पाणी आणण्यासाठी कोणत्याही हालचाली केल्या जात नाहीत. त्यासाठी या कामाची निविदा प्रक्रिया लवकर होणे अपेक्षित आहे. जेणेकरुन पिंपरी-चिंचवड शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होणार नाही. पाणी पुरवठा प्रकल्प शहरासाठी अतिशय महत्वाचा असून यामुळे 27 लाख नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे.
अपयशांवर पांघरुण
पाणी समस्येवर तात्पुरते उपाय व प्रस्तावित योजना दाखवून अपयशावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासन व राज्यकर्त्यांकडून केला जातो. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आतापर्यंत स्काडा प्रणाली, 24 तास पाणीपुरवठा, अमृत योजना, पाणी पुर्नवापर धोरण हे प्रकल्प हाती घेतले गेले. तर, लोकसंख्या आणि वाढते शहरीकरण विचारात घेवून पवना धरणाबरोबर भामा-आसखेड धरणातील 167 एमएलडी आणि आंध्रा धरणातील 100 एमएलडी पाणी पिंपरी-चिंचवडसाठी आरक्षित केले. मात्र, पवना बंद जलवाहिनीप्रमाणे आंद्रा, भामा आसखेड धरणातील पाणी बंद जलवाहिनीने शहरात आणण्यास विलंब होत आहे. आतापर्यंत आलेल्या प्रत्येक आयुक्तांनी पाणीप्रश्नावर बोलायचे एक आणि करायेच भलतेच अशीच भूमिका घेतली. मात्र या प्रकल्पांसाठी ठोस निर्णय घेऊन शहरवासियांना हक्काचे पाणी मिळवून देण्याची क्षमता एकाही आयुक्तांनी दाखवली नाही. मात्र पाणीपुरवठ्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या नवीन यंत्रणा, योजना नागरिकांच्या माथी मारल्या. त्यामधून शेकडो कोटी रुपयांच्या निविदा जिरवून कररुपी पैशावर डल्ला मारला आहे.
प्रशासन, राज्यकर्तेच संशयाच्या भोवऱ्यात
पाणीप्रश्नावरून नेहमीच महापालिका प्रशासनावर ताशेरे ओढले जात आहेत. अस्वच्छ व अनियमित पाणीपुरवठा हे शहरवासियांना नवीन नाही. सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडूनही नागरिकांना पाणीकपातीला सामोरे जावे लागत आहे. शहरात पाण्याचा तुटवडा असताना टॅंकरलॉबी मात्र जोरात सुरू आहे. ठिकठिकाणी टॅंकर सुरू आहेत, सोसायट्या, खासगी शाळा, अनेक कार्यालये यांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पाण्याची समस्या एवढी उग्र असताना शहरातील बांधकामे मात्र जोरात सुरू आहेत. ही टॅंकर लॉबी जिवंत ठेवण्यासाठीच नागरिकांच्या माथी पाणीकपात मारली जात आहे का?