आंबेगावचे माजी उपसरपंच निलेश कोंढरे यांची प्रशासकीय कामावर टीका
आंबेगाव बुद्रुक – पुणे महानगरपालिकेत आंबेगाव बुद्रुक परिसराचा समावेश होऊन चार वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाल्यानंतरही येथील समस्या सुटलेल्या नाहीत. परिसराचा नियोजनबद्ध विकास होण्यासाठी नगरसेवक नावाचा रबरी शिक्का नको तर काम करणारे स्थानिक नेतृत्व हवे, असा रोखठोक मुद्दा माजी उपसरपंच निलेश कोंढरे यांनी मांडला असून आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
आंबेगाव बुद्रुकमध्ये पाऊस झाल्याने रस्ते पाण्याखाली गेले, खड्ड्यांत पाणी साचले असून सांडपाणीही रस्त्यांवर आले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी भर पावसाळ्यात टॅंकरने पाणी मागवावे लागत आहे. गावाचा समावेश पालिकेत झाल्यानंतर मूलभूत समस्या सुटतील, अशी आशा नागरिकांना होती. परंतु, ती फोल ठरली आहे.
गावात पाणी आले नाही, कचरा साचला तर त्याच्या असंख्य तक्रारी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन धडकत होत्या. परंतु, आता कर घेऊनही गावाला पाणी नाही. महानगरपालिका कचरा व्यवस्थापनासाठी जवळपास 500 कोटींचा खर्च करते, असे असताना घरातील कचरा उचलण्यासाठी नागरिकांना पैसे मोजावे लागत आहेत. आंबेगावातून महापालिका कर कशासाठी घेते, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
ग्रामपंचायतीचा कर भरल्यानंतर सरंपचासह तलाठी, ग्रामसेवकाला जाब विचारता येत होता. आता, आमच्या भागाचा नगरसेवक कोण? हेच अनेकांना माहीत नाही तर क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी जागेवर सापडत नाहीत, अशावेळी तक्रार करायची तरी कोणाकडे, असा प्रश्न नागरिकांपुढे निर्माण झाला आहे.
महानगरपालिका प्रशासनाकडे आम्ही येथील समस्यांबाबत वारंवार पाठपुरावा करीत आहोत; परंतु पालिका प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी या भागाकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे प्रशासनासह या भागाकडे नगरसेवकांनीही लक्ष द्यावे.
– निलेश कोंढरे, माजी उपसरपंच आंबेगाव बुद्रुक