बिबवेवाडीत नियोजनशून्य कामांमुळे नागरिक त्रस्त
बिबवेवाडी – बिबवेवाडी परिसरात सुरू असलेल्या रस्ते विकासकामांमुळे वाहूतक कोंडी होत असल्याने ही कामेच नागरिकांसाठी आता डोकेदुखी ठरू लागली असून रस्ता नको.., आता वाहतूक कोंडी आवरा.., असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
बिबवेवाडीत रस्त्याचे काम सुरू असल्याने झालेल्या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकून पडल्याने एक दाम्पत्याचा मृत्यू झाला होता. ही घटना घडूनही याचे कोणतेच गांभीर्य मनपाचा पथविभाग व वाहतूक पोलिसांना नसल्याचे दिसून येत आहेत. या ठिकाणी रस्ते विकसनाचे काम सुरू असताना वाहतुकीसाठी अन्य कोणतेही पर्याय ठेवण्यात आलेले नाहीत. कामाचे साहित्यही रस्त्यावरच अस्ताव्यस्त पडलेले असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. या सगळ्या गोष्टींकडे पालिका प्रशासनासह ठेकेदाराचेही दुर्लक्ष आहे.
एकच वेळी दोन्ही भागातील रस्त्यांची कामे सुरू असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. पदपथावरील दुकाने कामे सुरू करण्यापूर्वीच काढणे आवश्यक होती. पण, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाकडून कोणतीही हालचाल केली गेली नसल्याने काम सुरू आणि दुकान उघडे, असे चित्र दिसत आहे. रस्ते कामात कोणतेच नियोजन नसल्याने अपघातजन्य स्थिती निर्माण झाली आहे.
कामाचे बिलं मार्च महिन्यांत काढण्यासाठी स्थानिक राजकीय नेते, मनपा अधिकारी व ठेकेदारांची धावपळ सुरू आहे. यात कामाचा दर्जा राखण्याकडे दुर्लक्ष होत आहे. कामासाठी वेळ कमी असल्याने जमेल तसे करा.., अशा पद्धतीने कामे सुरू आहेत.
यातून सामान्य नागरिकांची मात्र परवड सुरू आहे. सिमेंटचे रस्ते तयार करताना पावसाळी वाहिनीचे काम केलेले नाही. आता, या कामासाठी पुन्हा रस्ता खोदला जात आहे. नियोजन शून्य कामातून पालिका ठेकदारांवर नागरिकांच्या कररूपी पैशाची उधळण करीत आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विशाल शिंदे यांनी केला आहे.
रस्त्याच्या कामाबाबत कोणतेही नियोजन करण्यात आलेले नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूला काम चालू आहे. विकासकामे सुरू असताना वाहनचालकांना काही पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे होते; परंतु ढिसाळपणाचा उच्चांक ठेकेदाराने गाठला आहे. वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त आहेत.
– विशाल शिंदे, मनसे