जिल्ह्यात भुरट्या चोऱ्या, हाणामाऱ्यांसह आता आरोपीचे पलायन
नगर – शहरासह जिल्ह्यात भुरट्या चोऱ्या, रस्तालुट, हाणामाऱ्याच्या घटना घडत असताना नुकताच एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पकडलेला आरोपी कोतवाली पोलीसांच्या तावडीतून पळून जात असल्याने प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांचाच वचक पोलीस प्रशासनासह गुन्हेगारांवर राहिला नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे जिल्ह्याला खमक्या अधिकाऱ्याची प्रतीक्षा असल्याचे बोलले जात आहे.
नुकतीच पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी गांजा वाहतूक करणाऱ्या दोघांना मुद्देमालासह पकडण्यात आले होते. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र त्यातील एकाची प्राकृती खालविल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र आरोपीने लघूशंकेची बतावणी करून कोतवाली पोलिसांच्या हातावर तुरी दिल्या. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शहरात दिवसेंदिवस गुन्हाच्या आलेखात वाढ होत आहे. मात्र झालेले गुन्हाचा तपासाचा उलगडा होताना दिसत नाही. तसेच कोतवाली पोलीस ठाण्याहद्दीत सर्रासपणे अवैध धंदे सुरु असून त्याकडे पोलिसांचे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहेत. त्याच पाठोपाठ तोफखाना, भिंगार कॅम्प, एमआयडीसीसह तालुका पोलीस ठाण्याचे दुर्लक्ष झाले आहे.
त्यामुळे अवैध धंदे चालक मोकाट सुटले असून त्यांच्यावर कुणाचाच वचक राहिला नसल्याचे दिसत आहे. त्यातच पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी पकडलेला आरोपी कोतवाली पोलिसांच्या हातावर तुरी देत पलायन केल्याने शहरातच एकच चर्चा सुरु आहे. त्यामुळे वरिष्ठ कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्यावर कारवाई करणार का? असा प्रश्न ही उपस्थित केला जात आहे.