पुणे – शिवसेना ही आघाडीत असून, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले आहे. बीएमसीसी येथे आयोजित व्याख्यानापूर्वी जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
एल्गार आणि एनआयए चौकशी आणि एनपीआर याबाबत शिवसेनेकडून भाजपला पूरक भूमिका घेतल्या जात आहेत. या प्रश्नांवर जयंत पाटील म्हणाले, शिवसेना ही आघाडीत असून, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळात एनपीआरबाबतीत असलेल्या प्रश्नावलीत या केंद्र सरकारने नवीन प्रश्नावली समाविष्ट केली आहे. जनगणना करण्यास कोणाचा विरोध नाही. मात्र, प्रश्न कोणते विचारणार, यावर आम्ही चर्चा करणार आहोत. त्यावर एकविचाराने आम्ही लवकरच निर्णय घेऊ.
उद्धव ठाकरेंची दिल्लीवारी….
पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुक्रवारी होत असलेल्या भेटीबाबत ते म्हणाले, आमचे सरकार आल्यापासून केंद्राने जीएसटीचा फरक उशिरा द्यायला सुरुवात केली आहे. राज्य सरकारला केंद्रीय करातला वाटा उशिरा मिळत आहे. कारण केंद्र सरकारची आर्थिक अवस्था फारशी बरी नाही, असा माझा अंदाज आहे. ते मुद्दाम उशिरा निधी देत आहेत, असं माझे मत नाही. मात्र, राज्याचा हक्काचा वाटा आहे, तो वेळेवर मिळावा, असा आग्रह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार आहेत.