अकोले -महाविकास आघाडी हे शेतकऱ्यांचे सरकार आहे. खावटी योजनेचे श्रेय कोणी घेऊ नये, तो आदिवासी समाजाचा अधिकारच आहे, असे आमदार डॉ.किरण लहामटे यांनी माजी आमदार वैभव पिचड यांचे नाव न घेता शरसंधान केले आहे.
महाविकास आघाडी सरकारने शेतकरी वर्गाला दिलेला शब्द पाळला आहे, असे सांगून आ. डॉ.लहामटे यांनी सांगीतले की 11 हजार 966 कोटी 21 लाख रुपयांची कर्जमाफी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. 31 मार्चअखेर राज्यातल्या 18 लाख 89 हजार 528 शेतकऱ्यांचा समावेश आहे. जिल्हा सहकारी बॅंकांच्या माध्यमातून 10 लाख 40 हजार 935 शेतकऱ्यांच्या खात्यात 5 हजार 40 कोटी 713 लाख, तर, व्यापारी बॅंकांच्या माध्यमातून 8 लाख 48 हजार 593 शेतकऱ्यांच्या खात्यात 6 हजार 559 कोटी 80 हजार रुपये जमा करण्यात आले आहेत, असे स्पष्ट करून खावटी योजने संदर्भात काही राजकीय विरोधक आपण ही योजना नव्याने मंजूर केल्याचे भासवत आहेत. जर ही योजना मध्ये बंद पडली तर विरोधक स्वतः लोकप्रतिनिधी म्हणून विरोधी पक्षात कार्यरत होते. तर त्यांनी या कार्यकालात कोणता प्रयत्न केला की विधानसभेत आवाज उठवला याचे उत्तर द्यावे असे आवाहन केले.
लोकप्रतिनिधी असताना खावटी योजना बंद पडली. ती त्यांना चालू करता आली नाही ते आता पराभव झाल्यानंतर सांगत आहेत की, खावटी योजनेस हिरवा कंदिल मिळाला. यामुळे ही पराभवातून सावरण्याची इच्छा ईश्वर त्यांना देवो असा टोला आ. डॉ. लहामटे यांनी वैभव पिचड यांना नाव न घेता लगावला.
अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच आपण स्वतः व सर्व सत्तेतील व विरोधक आदिवासी आमदार यांनी एकत्र येत ही योजना पुन्हा कार्यन्वित करण्यात यावी, या संदर्भात आदिवासी विकासमंत्री के.सी. पाडवी यांच्याशी चर्चा केली होती. खावटी योजना भाजप सरकार काळात बंद झाली होती. ती पुन्हा चालू करावी, अशी मागणी केली होती. तेव्हाच ना. पाडवी यांनी मान्य केले होते, असे सांगत आपल्या राजकीय विरोधकांना आता कुठे आदिवासी जनता आपली असल्याचे स्वप्न पडत आहे हे हास्यास्पद आहे, असा टोला लगावला.