कोईमतूर – तमिळनाडूत आम्हाला सत्तेवर येण्यापासून कोणतीही शक्ती रोखू शकत नाही, असे प्रतिपादन द्रमुक पक्षाच्या नेत्या कनिमोळी यांनी केले आहे. तमिळनाडूत रजनीकांत यांनी राजकारणात उडी घेण्याची अधिकृत घोषणा केल्यानंतर द्रमुक पक्षाकडून आलेली त्यांची ही पहिली प्रतिक्रिया आहे.
कनिमोळी या गेल्या दोन दिवसांपासून राज्यव्यापी दौऱ्यावर गेल्या आहेत. त्या काल येथे पत्रकारांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, राज्यातील विद्यमान अद्रमुक सरकारच्या विरोधात जनतेच्या मनात प्रचंड रोष आहे. लोक हे सरकार बदलायला उत्सुक आहेत. द्रमुक आघाडीतील पक्ष बदलणार आहेत काय, असे विचारता त्या म्हणाल्या की त्या विषयी पक्षाचे प्रमुख स्टॅलिन हे निर्णय घेतील.
रजनीकांत यांच्या भवितव्याविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, ज्या व्यक्तीने अजून आपला राजकीय पक्ष स्थापनही केला नाही त्या विषयी मी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. लोकशाही पद्धतीत कोणतीही व्यक्ती राजकीय पक्ष स्थापन करू शकते, पण त्यामुळे आमच्या हिताला कोणतीही बाधा येणार नाही.