कवठे -किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना 50 हजार शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे. या सभासदांशी व कामगारांशी बांधिलकी जपली आहे. राजकारण व सहकार यांची कधीही गल्लत केली नाही, तरीही अडचणी येत राहिल्या. या अडचणींवर मात करण्याचा पुरुषार्थ दाखवला, त्यापासून मागे हटलो नाही. त्याच जिद्दीने आर्थिक प्रश्न निकालात काढण्यात यश येत आहे किसन वीरचा पन्नासावा गळीत हंगाम यशस्वी होणारच आहे. शेतकऱ्यांनी, कामगारांनी कारखान्याची पाठराखण केली असून त्याचे ऋण उभ्या जन्मात फिटणार नाही. किसन वीरच्या या शक्तीला कोणीही रोखू शकणार नाही, असा विश्वास अध्यक्ष मदन भोसले यांनी व्यक्त केला.
किसनवीरनगर (भुईंज), ता. वाई येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या पन्नासाव्या गळीत हंगामातील बॉयलर अग्निप्रदिपन उत्साहात झाले. त्यावेळी ते बोलत होते. डॉ. सौ. नीलिमा भोसले, संचालक सचिन साळुंखे, मधुकर शिंदे, चंद्रसेन शिंदे, प्रकाश पवार-पाटील, विजय चव्हाण, अरविंद कोरडे, कार्यकारी संचालक अशोकराव जाधव, माजी संचालक शिवाजीराव गायकवाड, रोहिदास पिसाळ, ऍड. धनंजय चव्हाण, ऍड. विजयराव भोसले, मोहनराव साबळे, डॉ. दत्तात्रय फाळके, जयवंत साबळे, ऍड. मेघराज भोईटे, सुनील शिवथरे, हणमंतराव गायकवाड, संभाजी शिंगटे, अनिल वाघमारे, आनंद जाधवराव, अमर धुमाळ, विशाल मोरे, बाबा खुडे, अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते. भोसले म्हणाले, उत्तम परिस्थिती असताना शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा 325 कोटी रुपये जादा दिले होते. अपघात विमा, अनुदाना, सवलतींच्या योजनांची मोजदाद करायला वेळ पुरणार नाही.
20 गुंठ्याचा मालक असलेल्या शेतकऱ्याला कोटी-सव्वाकोटीच्या ऊस तोडणी यंत्राचा मालक केले; परंतु या गोष्टी काही लोक विसरले असले तरी शेतकरी व कामगारांनी आम्हाला पाठवळ दिले. अफवांकडे दुर्लक्ष करुन शेतकऱ्यांच्या जोरावर कारखाना दणक्यात सुरू होणारच. अडचणी आल्या म्हणून हरणारा मी नाही. माझे दायित्व फक्त सभासदांशी आहे. त्यामुळे इतरांना उत्तरे देण्यात वेळ वाया घालवणार नाही. कामाच्या याच पद्धतीमुळे यंदाचा हंगाम सुरू होण्यात कोणतीही अडचण नाही. ज्यांचा या कारखान्याला ऊस नाही, काही देणंघेणं नाही, असे अफवा पसरवण्यात आघाडीवर आहेत. खासगीकरणाच्या रेट्यात शेतकऱ्यांची मालकी मोडीत काढण्याचा घाट अनेकांनी घातला आहे. मी असेपर्यत ते घडू देणार नाही.
प्रारंभी सौ. अनिता व मितीन भोईटे (वाघोली, ता. कोरेगाव), सौ. पद्मा व गजानन धायगुडे (खेड बुद्रुक, ता. खंडाळा), सौ. नंदा व रामचंद्र पवार (शेते, ता. जावळी), सौ. संगीता व प्रकाश कदम (बावधन, ता. वाई), सौ. संगीता व राजेंद्र जाधव (गोवे, ता. सातारा) यांच्या हस्ते बॉयलर प्रज्वलित करण्यात झाला. माजी मंत्री, वनाधिपती विनायक पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. चंद्रकांत इंगवले यांनी प्रस्ताविक केले. नंदकुमार निकम यांनी सूत्रसंचालन केले. प्रताप यादव-देशमुख यांनी आभार मानले.