नवी दिल्ली – देशातील 146 जिल्ह्यांमध्ये गेल्या 7 दिवसांपासून कोविडचा एकही नवीन रुग्ण आढळला नाही. तसेच 18 जिल्ह्यांमध्ये 14 दिवसांपासून, तर 6 जिल्ह्यांमध्ये 21 दिवसांपासून, तर 21 जिल्ह्यांमध्ये 28 दिवसांपासून कोविडचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. देशात आजवर 19.5 कोटींपेक्षा जास्त कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत.
यामुळेच करोनावर मात करण्यात आपल्याला यश मिळाले, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली. तसेच सध्या देशात दररोज 12 लाख चाचण्या करण्याची क्षमता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. हर्ष वर्धन यांच्या अध्यक्षतेखाली आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून कोविड-19 विषयक मंत्रीगटाची बैठक पार पडली. या बैठकीस परराष्ट्र व्यवहार मंत्री. डॉ. एस. जयशंकर, नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंह पुरी, अश्विनी चौबे, नित्यानंद राज आणि मनसुख मांडवीय, नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. विनोद के पॉल देखील सहभागी झाले होते.
डॉ. हर्ष वर्धन म्हणाले, कोविडचा प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी स्थापन करण्यात आलेला हा मंत्रीगट एक वर्षापासून कार्यरत आहे. देशात कोविडचा पहिला रुग्ण 30 जानेवारी 2020 रोजी आढळला होता. त्यानंतर लगेचच म्हणजे 3 फेब्रुवारी रोजी कोविडविषयक मंत्रीगटाची पहिली बैठक झाली होती.
यानंतर “संपूर्ण सरकार’ आणि “संपूर्ण समाज’ असा दृष्टीकोन ठेवून भारताने या महामारीला नियंत्रणात ठेवण्यात यश मिळवले. गेल्या 24 तासांत देशभरात 12,000 पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत. सध्या देशात सक्रीय रुग्णांची संख्या 1.73 लाखांपर्यंत कमी झाली आहे, असे त्यांनी सांगितले.
मुंबई, तिरुअनंतपूरम, एर्नाकुलम आणि कोझीकोडे या चार जिल्ह्यांमध्ये सध्या सर्वाधिक सक्रीय रुग्ण आहेत. महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यांमध्ये एकूण रुग्णसंख्येपैकी 70% रुग्ण आहेत. पुढच्या काही दिवसात ऋतुबदल होण्याची शक्यता असल्यामुळे तसेच, ब्रिटनमधून आलेल्या नव्या स्वरूपातल्या करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कोविडविषयक नियम आणि प्रतिबंध काटेकोरपणे पाळले जावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.