मुंबई – सप्टेंबर महिन्यात करोनाच्या तिसऱ्या लाटेचे भीषण रूप दिसू शकते, महिन्यात देशात दररोज 4 ते 5 लाख नवीन करोना रुग्ण वाढू शकतात, अशी भीती नीति आयोगाने व्यक्त केली आहे. आयोगाचा यासंदर्भात एक अहवाल देखील प्रसिद्ध झाला आहे. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी खुलासा केला आहे.
“नीती आयोगाच्या ज्या पत्राची राज्यात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. ते जून महिन्यातील पत्र आहे. त्यात आताची कोणतीही माहिती नाही. निती आयोगाने जून महिन्यात तिसऱ्या लाटेबाबत अंदाज व्यक्त केला होता. त्यामुळे पॅनिक होऊ नये. राज्य सरकारची तिसऱ्या लाटेसाठी तयारी झालेली आहे,” असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
तसेच राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहूनच शाळा, कॉलेज, मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेतला जाईल. राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये करोनासंख्या वाढत असली तरी काळजी करण्याचे कारण नाही. त्या ठिकाणी लसीकरण वाढण्यात येणार आहे. डेल्टा व्हेरियंटचे संक्रमण होत असले तरी त्याची लक्षणं सौम्य असल्याचेही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.