लखनौ – बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी पुन्हा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका करताना देशाला चहावाला किंवा चौकीदाराची गरज नसून खऱ्या पंतप्रधानांची गरज आहे असे म्हटले आहे. दुहेरी भूमिका करणाऱ्या या व्यक्तीला आता लोक कंटाळले आहेत या भूमिकेतून लोकांना आता गंडवता येणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
देशाने सेवक, मुख्य सेवक, चायवाला, चौकीदार अशा भूमिकेतला नेता पाहिला आहे. त्याने लोकांची कायम दिशाभुल केली. पण आता देशाला खऱ्या पंतप्रधानांची गरज आहे जो घटनेच्या तत्वानुसार लोककल्याणाचेच काम करेल असे त्या म्हणाल्या. अशा दुहेरी व्यक्तीमत्वाच्या नेत्याने देशाला खूप फसवले आहे आता लोकांना या पद्धतीने फसवता येणार नाही. मोदी सरकारचे जहाज आता डुबत चालले असून त्याची सर्वांनाच कल्पना आली आहे. आता संघानेही मोदींची साथ सोडली आहे हे त्याचे मुख्य लक्षण आहे असेही मायावती यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते मला निवडणूक प्रचारात कोठे अंगझाडून काम करताना दिसले नाहीत. त्यामुळे मोदींना घाम फुटला आहे अशी टिपण्णीही त्यांनी केली आहे.